Sunday, 28 October 2018

बाबा



बाबा. बाबा म्हटलं की डोळ्यासमोर उभ राहतं एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व. अगदीच धाक, दरारा हे जरी आमच्या पिढीने अनुभवलेल नसलं. तरी एक आदरयुक्त भीती नेहमीच अनुभवली. आई जवळ सगळा हट्ट चालायचा. पण बाबांना मागायची बिषाद नसायची. पण आईमार्फत तो बाबा पर्यंत पोहोचला की काही क्षणात पूर्ण देखील व्हायचा.

पण आता काळ एवढा वेगाने बदलतो आहे की, हा मधला मार्ग आता राहिला नाही. पूर्वी पिढी विस-पंचेवीस वर्षाला बदलायची. आता तर ती अगदीच पाच-सात वर्षात बदल बदलते आहे.
'प्राप्तेतू षोडशे वर्षे पुत्रं मित्र वदाचरेत', हे विधान एव्हाना पाच सहा वर्ष वयापर्यंत येऊन पोहचल आहे.

म्हणूनच की काय आता 'ओ बाबा' 'ए बाबा' झाला आहे.

मुलांना मारणे तर खूप दूरचा विषय, त्यांना रागवणे देखील कधीतरी होतं.
तसं पाहता हे काही काळाच्या प्रवाहात वाहण्यासारखा नाही. कारण नवी पिढी अधिक प्रगत होत चालली आहे आणि प्रगल्भ देखील.

आमच्या पिढीला बाबासोबत खेळल्याच कधी आठवत नाही.  पण आता नवी पिढी बाबा खेळायला नसेल तर रुसून बसते. बाबा कामावरून आला की, काय काय करायचं याचे जणू वेळापत्रकच तयार असतं.

बाबा आता साखरेच पोत होतो. बाबा जेवू घालतो, प्रसंगी न्हाऊ घालतो. अगदी डायपर बदलतो, शी सुद्धा काढतो.
घरात सगळ्यात जास्त धिंगाणा कोण करतं, तर उत्तर येते बाबा.
'बाबा तू कुठे जायचं नाही'. 'बाबा आज सुट्टी घे'. 'बाबा किती काम करतोस'?  'बाबा जरा आराम करत जा'. अशा सूचना आता सर्रास ऐकू येतात.

बाबाला आता सुट्टीच नियोजन कराव लागत नाही. शॉपिंगची काळजी करावी लागत नाही.
'बाबा या रविवारी डोंगरावर जाऊ'. 'बाबा आज रात्री आईस्क्रीम खायला जाऊ'. एवढेच काय कोणत्या हॉटेलमधे जेवण कसं आहे इथपासून ते बाबांना कोणते कपडे घातले तर चांगले दिसतात, हे पण ठरवलं जातं.

थोडक्यात काय तर प्रेम, विश्वास आणि आदर हा पूर्वीच्या बाबांकडून मिळालेल्या वारश्यामध्ये नव्या पिढीचा बाबा मित्रत्वाची भर घालतोय एवढेच.

@हेमंत विनोद पोहनेरकर

Sunday, 21 October 2018

निजरुप तुझे

                                               

'सांज खुलणे' हे निसर्गाच्या अनेक लोभस रूपांपैकी एक रूप. आनंद, प्रसन्नता, मंगलमय, शांत आणि तरीही तेजस्वी असे हे रूप मनाला नेहमीच भुरळ घालत आलं आहे.

त्यादिवशीही अशीच सांज खुलली. आणि थेट माणुसकीच्या कोलाहलातून बाहेर पडलो. शांत अशा निर्जन स्थळी जाऊन थांबलो. निसर्गाच्या या रूपाचा आनंद मनमुराद घेण्यासाठी.

काळ आणि वेळेच्या पाशातून मन विचलित होऊन परतताना असंच एक प्रगल्भ, सुंदर आणि मनमोहक स्त्रीरूप दिसलं आणि मन अजूनच उल्हसीत झालं.

 लोकलज्जेचं भान न ठेवता थेट मागणी घालावी इतकं प्रेम निर्माण झालं. मंगल्याच्या या मूर्त रुपात आपल्याला न्हाता येईल याचा मनस्वी आनंद झाला.

नि तत्क्षणी सौदामिनी कडाडावी असा साक्षात्कार झाला. बालपणी गायलेल्या सायं प्रार्थनेच्या ओळी आठवल्या, 'ज्या ज्या स्थळीये मन जाय माझे, त्या त्या स्थळीये निजरूप तुझे'.

माझं प्राक्तन तर कधीच भरून गेले आहे, याची जाणीव झाली. अशी प्रेममय रुपं तर मला पदोपदी मिळणार आहेत. मग मी एका रूपात कसा स्वतःला सामावून घेणार?

म्हणून त्या अनंताच्या रुपाचं स्मरण करत, तिन्हीसांजेची कृतज्ञता व्यक्त करून परत निघालो.



©हेमंत पोहनेरकर 
९५९५९६९९८९

Wednesday, 10 October 2018

आनंद

जीवनाला एकदा खूप दु:ख झालं.
म्हणून त्याने 'जीवन' संपवायचं ठरवलं.

खरे तर ती आत्महत्याच होती. 
परंतू 'आत्मत्याग' या गोंडस नावाखाली त्याने एक पत्र लिहिण्यास घेतलं.

दु:खाचे पाढे लिहित असतांना, जीवनाला जाणवले की,
'जीवनात कधी आनंदाचे प्रसंगही आले असतील (!)
ते ही लिहावे.'

असे वाटून त्याने ते ही लिहिण्यास सुरुवात केली.

नि लिहीता लिहीता, एका आनंदाच्या क्षणी जीवनाने पाहिलं की,
आनंदात आपण स्वतःला सामावून घेतलं होत, म्हणून आपण आनंदी होतो.

पण दु:खाशी मात्र परकेपणाने वागलो.

म्हणून एका अनामिक भावनेने जीवनाने दु:खाला गाढ आलिंगन दिलं.

आणि जीवनाला आनंद झाला.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...