नागपूरमधील लक्ष्मीनगर परिसरांत आठ रस्ते एकत्र येतात त्या जागेला ‘आठ रस्ता’ असे नाव आहे. असेच सोलापूर शहरांत सात रस्ता’ आहे. तर मुलूंड शहरांत पाच रस्ता आहे. आणि उर्वरीत सर्वच शहरांत चौक अर्थात चार रस्ते एकत्र येतात अशा जागा आहेत.
परंतू तीन रस्ते एकत्र येतात अशाही जागा असलेली शहरे आहेत. परंतू अशा जागांना काय म्हणतात हेच ठाऊक नाही. छ. संभाजीनगरमध्ये अशा जागा आहेत, त्यांना ‘टी-पॉइंट’ (हर्सूल टी-पॉइंट, जळगांव टी-पॉइंट किंवा हडको टी-पॉइंट) असे नाव प्रचलित झाले आहे.
माय मराठीच्या गौरवशाली आणि समृद्ध वारश्यातील ‘तीठा’ अर्थात तीन रस्ते एकत्र येतात ती जागा एव्हाना हरवली आहे. ती अपवादानेच कोकणांत सापडते. उदा. कासरडे तीठा किंवा फणसगाव तीठा.
इथे विषयाला दुसरी बाजू देखील आहे. आधुनिकीकरणाच्या काळात प्रगती होत असताना इंग्रजीला दोष देऊनही चालणार नाही. तर प्रगती करत असताना आपण आपली मातृभाषा किती जपतो, हा खरा प्रश्न आहे.
या ठिकाणी केवळ एक शब्द हरवलेला नाही आहे. तर संकल्पना हरवली आहे. ती म्हणजे 'तीठा'.
खरंतर काळाच्या ओघात अशा अनेक संकल्पना हरवल्या असतील. परंतु त्या वस्तूंशी संबंधित असतील. प्रचलित काळानुसार अनेक वस्तू बदलल्या आणि नवनवीन वस्तू व्यवहारात आल्या. त्यामुळे वस्तू समोर नसेल तर तो शब्द किंवा ती संकल्पना हरवणे स्वाभाविक आहे. परंतु इथे प्रत्यक्ष तीन रस्ते एकत्र येतात. परंतू त्या जागेला काय म्हणतात, हे आपल्याला माहीत नाही, हे चिंताजनक आहे.
अशा संकल्पना केवळ जपणे नाही तर व्यवहारात आणत जगणे, हे महत्त्वाचे आहे. असे झाले तर अशा अनेक 'तिठां'ना नकळतपणे एक संजीवनी मिळेल.
आणि माय मराठी अमृताते पैजा जिंकले, हे निश्चितच.
©️हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९