Sunday, 31 May 2020

खरेमामा-खोटेमामा


अंदाजे इयत्ता तिसरीच्या सुट्ट्या संपून चौथीच्या वर्गात गेलो होतो. शाळेच्या अगदीच पहिल्या काही दिवसांमध्ये केवळ सुट्ट्यांमध्ये केलेली धम्माल मजा एकमेकांना सांगणे, हा एकमेव उद्योग वर्गात सुरू होता. आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गावी जाणे म्हणजे 'मामाच्या गावा'ला जाणे हेच होते. त्याकाळी देखील 'मामाच्या गावाला जाऊया...' या गाण्याप्रमाणे सगळ्या सुट्ट्या अनुभवून आलेलो आम्ही सगळे होतो.

वर्गातील प्रत्येक जण आपापली गंमत, मस्ती, मजा सगळं काही अगदी आनंदाने सांगत होता. मी देखील या उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेली धम्माल मजा सांगितली.

मी अगदी सबंध बालपणात आठवणीत राहिल एवढा माझा जीव की प्राण तो 'आंबा' रोज सकाळ-संध्याकाळ खाल्ला होता. मला आंबा खूप आवडतो, म्हणून मामा रोज आंबा आणायचे. आमरसला अगदी एकही दिवस खंड पडला नव्हता. शिवाय बहीण-भावासोबत खेळलेलो खेळ याची मजा होतीच. पण स्मरणात राहिले ते मामांनी रोज आणलेले आंबे.

पण तेवढ्यात एक जवळच राहणारा मित्र म्हणाला, "का रे, तू तर मागच्या सुट्ट्यात वेगळ्याच मामाच्या गावी गेला होता. आणि या सुट्ट्यात वेगळ्या?"
त्याला बहुदा माझे नातेवाईक, माझे आजोळ माहीत असावे.

त्यावर मी म्हणालो, "अरे! तसे नाही. या वेळेस मी ज्या मामाच्या गावी गेलो होतो ना, ते माझ्या आत्याकडूनचे माझे मामा आहेत."

त्यावर क्षणार्धात तो मित्र म्हणाला, "म्हणजे तू खोट्यामामांच्या गावी गेला होता."

माझा चेहरा एकदमच पडला. मला दुःख कसे व्यक्त करावे ते कळत नव्हते. जणू त्याने माझ्या सर्व आनंदावर विरजण टाकले होते. मी हा धक्का न पचवून स्तब्ध होऊन उभा होतो. बहुदा त्याला माझी व्यथा कळाली असावी.

म्हणून स्पष्टीकरण देत तो म्हणाला, " अरे! असे बघ, आईच्या भावाला आपण नेहमीच 'अरे-तुरे' करत असतो. पण आत्याच्या नवऱ्याला करतो का? नाही ना! म्हणूनच ते नंतर झालेले मामा असतात. आणि म्हणूनच ते खोटेमामा असतात."

त्याच्या तर्कावर मी काहीही बोलू शकलो नाही. केवळ आठवत होतो, मामांनी केवळ आंबे आणलेले नव्हते. तर ते आणत असताना जीवही त्यामध्ये ओतला होता. आणि शिवाय स्वतःच्या मुलांना जेवढा जीव लावला, प्रेम लावले तितकेच मला देखील दिले होते.

पण माझा आनंद मी माझ्या पोटात ठेवून घेऊन गेलो.

त्यानंतर बालपण ओसरत गेले. तारुण्यात पोहोचलो. आणि नंतर शिक्षण आटोपून नोकरीला देखील लागलो. आणि आता जबाबदारीचे दिवस ही पटापट मागे पडत होते. जवळजवळ नोकरी लागल्यानंतरच्या पाच-सहा वर्षानंतर परत एकदा मामांच्या गावाला जाण्याचा योग आला.

मामांच्या गावाजवळ तालुक्याच्या ठिकाणी काम होते. सोबत ऑफिसची गाडी होती. दिवसभराचे काम आटोपले. आणि आता एकदा मामांना फोन करून त्यांच्या गावी जाऊन येऊ म्हणून त्यांना फोन केला. तर मामा नेमकेच तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांना जाऊन भेटलो. मी मामांच्या पाया पडणार तोच त्यांनी माझी गळाभेट घेतली.
खूप ऊर भरून आला.

मग आम्ही दोघेही गाडीत बसलो, मामांच्या गावी जाण्यासाठी. (होय! मी आजही 'मामांच्या गावी' असेच म्हणतो. आत्याचा उल्लेख तर त्यात आहेच, ती तर हक्काची आहेच, म्हणुन..) मामांनी आत्याला फोन करून कळवले, आम्ही येत आहोत म्हणून.

अंतर अगदीच सतरा-अठरा किलोमीटरचे होते. खूपच कमी. पण त्यात ही पूर्णवेळ मामा बोलत होते. गावात झालेले बदल, नवीन आलेल्या गोष्टी ऐकत अंतर जणू क्षणार्धात निघुन गेले. घर जवळ येताच मामांनी गाडी थांबवली. म्हणाले, "तू पुढे हो. मी आलोच."

मी घरी पोहोचलो. आत्याची भेट घेतली. हात-पाय धुतले. तेवढ्यात मामा आले. तर त्यांच्या हातात आंब्याची पिशवी होती.
ती माझ्या हातात देत म्हणाले, "मला अजूनही लक्षात आहे, तुला आंबा खूप आवडतो. पण आता आमरस तर नाही होऊ शकणार. म्हणून तुला सोबत देत आहे."

आत्याने माझ्यासाठी 'भजी-भाता'चा बेत केला होता. पण जेवत असताना माझे सगळे लक्ष मामांनी आणलेल्या आंब्यांच्या पिशवीकडे होते.

नंतर जेवणे आटोपली. थोडावेळ गप्पा मारल्या. आणि मामांच्या, आत्याच्या पाया पडून निघालो. गाडीत बसलो. आंब्याची पिशवी शेजारी ठेवली. नि त्या बालमित्राची आठवण आली. वाटून गेले, 'कोणत्या तोंडाने मामांना मी 'खोटेमामा' म्हणू किंवा समजून देखील...'

नाही. माझ्या मनात त्या बालमित्र विषयी राग मुळीच नाही आहे. उलट मला त्याची आठवण स्वाभाविकपणे राहीलच. कारण जणू त्याचा तर्क खोटा करण्याकरिता माझ्या जीवनात 'खरेमामा' 'खोटेमामा' बनून आले होते. 

काही वर्षांपूर्वी मामा जात राहिले.

एव्हाना मी देखील 'खरामामा'ही झालो आहे. आणि 'खोटामामा' देखील.
पण आता केवळ एकच अपेक्षा आहे, 'माझ्या 'खोट्यामामां'प्रमाणे (बालमित्रांच्या म्हणण्यानुसार) मला 'खरेमामा' होता आले म्हणजे माझ्या मामांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे होईल...'

माहितीस्तव - माझे खरेमामा -
स्व. उदय संतुकराव पांडे, ढाणकीकर
मु.पो.ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Wednesday, 20 May 2020

गर्दीची मानसिकता

कामानिमित्त नेहमीच बाहेर गावी जाणं होत असतं. असेच एकदा पहाटे पहाटे उठून तीन-चार तास प्रवास करून परगावी कामाला गेलो. दिवसभराचे काम आटोपले. जेवण केले. साधारण रात्रीचे नऊ-सव्वा नऊ झाले असतील. परतीच्या प्रवास सुरू झाला. बस पूर्णपणे भरलेली होती. मला अगदी शेवटच्या सीटवर जागा मिळाली. आणि दिवसभर बहुदा पायी चाललो असल्यामुळे की काय आणि नंतर पोटभर जेवण झाल्यामुळे स्वभाविकच बस निघाल्या निघाल्या डोळा लागला.

थोडेसे अंतर पुढे गेल्यानंतर रस्त्यात बस अचानक थांबली. तेव्हा जोराचा आरडाओरडा सुरू झालेला होता. 'बॉम्ब- बॉम्ब' असे प्रवासी ओरडत होते. जो तो जीव मुठीत घेऊन खाली उतरण्याची धडपड करत होता. बायका,मुले, वृद्ध सगळेच घाबरलेले होते. परंतु बसमध्ये अचानक उसळलेल्या या गर्दीमुळे काहीच कळत नव्हते. प्रत्येक जण केवळ एकमेकाला ढकलत बाहेर पडायची घाई करत होता. आणि पुढच्या काही वेळातच सगळे प्रवासी खाली उतरले. परंतु मी आणि माझ्या सीटवरील पाच प्रवासी स्तब्ध होऊन उभे होतो.

कारण आमच्या सीटच्या समोरील सीट खालूनच धूर निघत होता. आणि तो सगळ्या बसमध्ये पसरला होता. परंतु आमच्यापैकी कोणाचीही धाडस झाले नाही त्या सीटच्या पुढे जाण्याचे. बसमधील मागची आपत्कालीन खिडकी उघडण्याचा ही बराच प्रयत्न केला. पण ती खिडकी तारेने भरलेली होती. कारण माहित नाही.
कदाचित काळ आला होता.

पण बहुदा वेळ आलेली नव्हती. रस्ता देखील अगदीच निर्मनुष्य होता. दुसरे कोणते वाहन ही शेजारून गेले नाही. आणि दूरपर्यंत कुठेही प्रकाशही दिसत नव्हता.

काही क्षण नीरव शांतता पसरली. उतरलेल्या प्रवाशांचाही आता आवाज येत नव्हता. थोड्या वेळाने बसमधील तो धूरही बाहेर पडत होता. थोडेसे दिसायला लागले होते. तसा एक तरुण बसमध्ये त्या धूर निघणाऱ्या सीटच्या दिशेने येत होता.
आता बाहेरील प्रवासी पुन्हा ओरडायला लागले. 'नको जाऊ. नको जाऊ', असे ते ओरडत होते. पण तो अगदी शांतपणे त्या सीट जवळ आला. आणि त्याने त्या सीट खाली पडलेली एक छोटीशी सिलेंडरची टाकी बाहेर काढली. आणि बस बाहेर परत चालत गेला. आम्ही देखील त्याच्या मागे अगदी सावकाश आणि खूप अंतर ठेवून खाली उतरलो.

खाली उतरल्यावर तो तरुण म्हणाला, "ही नायट्रोजन सिलेंडरची टाकी आहे. ती आडवी पडल्यामुळे यातून धूर बाहेर आला. पण घाबरण्याचे काहीच कारण नाही. ही टाकी फुटणार नाही आहे."

सगळ्यांना एकदम हायसे वाटले. पण लोकांनी त्याला मारायचेच शिल्लक ठेवले होते, एवढे त्याला बोलले होते. सगळ्यांनी मिळून दिलेल्या शिव्या खाऊन तो तरुण गयावया करायला लागला, रडायला लागला. पण थोड्यावेळानी प्रकरण निवळले. आता सगळ्या प्रवाशांची बस मध्ये परत चढण्याची घाई परत सुरु झाली होती.

मी अगदी बसच्या दाराशी उभा होतो. मी बसमध्ये चढणार तोच अचानक मी मागे वळून प्रवाशांकडे पाहिले आहे. कारण काहीतरी वेगळे वाटत होते. तर लक्षात आले की, प्रत्येक प्रवाश्याच्या हातात स्वतःची पिशवी, बॅग असे अगदी सगळे प्रवासी संपूर्ण सामानासह खाली उतरलेले होते. मी लगेच बस मध्ये चढून फळ्यांवर पाहिले, आता धूर तर मुळीच नव्हता. पण बसमध्ये अगदी नावापुरती देखील एकही बॅग सामानाच्या फळीवर नव्हती.

मी आचंभित होऊन पाहत राहिलो. आताही मनात पूर्वी इतकीच भीती तयार झाली होती. पण तिचे कारण वेगळे होते.
'एकीकडे अत्यंत निष्काळजीपणे सिलेंडरची टाकी घेऊन प्रवास करणारा तो तरुण. आणि दुसरीकडे जीवावर बेतलेला प्रसंग आला असतानाही सगळ्या सामनासह खाली उतरलेले प्रवासी..."

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Saturday, 16 May 2020

छंद

'शाळा सुटली, पाटी फुटली' म्हणत शाळेतून घरी परततानांचा आनंद अनुभवलेले दिवस आजही अगदी स्पष्ट आठवतात. विशेषतः शनिवारी दुपारची अर्धी शाळा संपल्यानंतरचा आनंद खूप असायचा. कारण शनिवारचा अर्धा दिवस आणि रविवारचा पूर्ण दिवस केवळ सुट्टी. म्हणजे खेळणे. धमाल-मस्ती करणे. मनसोक्त त्या सुट्टीचा आनंद घेणे. एवढेच सरळ सोपे जीवन असायचे.
आणि हो! 'छंद' म्हणून करावे असे खरंतर त्या वेळी काही माहीत नव्हते. कळत नव्हते किंवा डोळ्यासमोर तसे फारसे कोणाचे उदाहरणही नव्हते.

काळ मागे पडला. वेगाने पुढे सरकला. इतका की ते दिवस इतिहास जमा झाले असे वाटावे. ते खेळणे, ती धमाल-मस्ती, त्या सुट्ट्या सगळेच केवळ आठवणीत राहिले होते.

परंतु निसर्गापुढे सगळेच हतबल. 'न भूतो, न भविष्यती' असा जागतिक महासंकटाचा, महामारीचा सामना करावा लागेल, असे कुणालाही वाटणे अशक्यच. पण तसे झाले. सगळेच 'स्थानबद्ध' झाले. (मी मुद्दामहूनच 'स्थानबद्ध' हा शब्द वापरत आहे. 'संचारबंदी' सारख्या शब्दांनी परत अनुभवायला मिळणारे बालपण कोमेजेले, ही भीती. एवढेच.) पण ते दिवस कदाचीत अनुभवण्याची परत वेळ आली.

आणि आता घरात मुलांसोबत मनसोक्त खेळ, मस्ती, धिंगाणा करत घालायला सुरुवात झाली. मुलांनाही कधी नव्हे ते आई-बाबा एवढा वेळ घरात म्हणजे पर्वणीच होती. खाणे-पिणे, रोज नवीन पदार्थ, भारतीय, परदेशी सगळेच खाऊन मज्जा सुरू झाली. आणि मग घरात जुने बालपणीचे खेळ ही भरपूर खेळलो.

परंतु काही दिवस उलटल्यानंतर वर्तमानपत्र, टीव्ही किंवा आताच्या अमाप सामाजिक प्रसारमाध्यमांतून सगळ्या स्तरावरच्या घरात असलेल्या लोकांनी जोपासलेले छंद प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली.
खरंतर बालपणीची आपल्याला आवडणारी गोष्ट, आपला 'छंद' कदाचित पुढचे शिक्षण आणि त्यानंतर अंगावर पडलेली जबाबदारी यामध्ये कुठेतरी हरवून गेलेला. परंतु बहुतेकांनी तो जोपासला. परत स्वतःला नव्याने अनुभवण्याचा किबहुना स्वतःच बालपण जगण्याचा तो क्षण. कित्येकांनी या क्षणांचं सार्थक केलं. या संधीचं सोनं केलं.

अशी ही कला जोपासणाऱ्या, छंद जगणाऱ्या सगळ्या अभिजात आणि अज्ञात कलाकारांचे अभिनंदनच. परंतु अशा या सगळ्या अज्ञात कलाकारांच्या कलांच्या सादरीकरणाचा अनुभवणारा आजचा हा काळ वेगळा आहे. खरंतर नुसता वेगळा किंवा नवा असता तर ठीक होते.

पण हा काळ स्पर्धेचा आहे.
होय. 'कलेमध्ये स्पर्धा' ही संकल्पनाच, गोष्टच मुळात पूर्णपणे चुकीची आहे. पण ते आजचे दाहक वास्तव आहे. खरंतर जिथे कला नांदते तिथे केवळ निर्भेळ आनंद असतो. आणि जिथे कलेमध्ये स्पर्धेचा शिरकाव व्हायला सुरुवात होते, तिथे स्तुती मिळवण्याचा हव्यास व्हायला सुरुवात होते. परंतु मनुष्य नकळतपणे या सगळ्यामध्ये ओढला जात असतो. इतरांनी केलं की, 'आपल्याला ते यावं', 'आपणही ते करावं', किंवा 'आपणही काहीतरी छंद जोपासू या आणि आपल्या मुलांना ही तसे शिकवू या' असे कुठेतरी वाटायला सुरुवात होते.

पण मी माझ्या बालपणात मागे वळून पाहिले. मी ज्या ठिकाणी वाढलो, त्या ठिकाणी असे चित्रकला, संगीत, नृत्य, दुर्मिळ गोष्टींचा संग्रह करणे इत्यादी असे काहीच नव्हते. मी तसा आठवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मला काहीच आठवले नाही. आठवत होते ते म्हणजे कुठलीही साधने नसताना सुट्ट्यांमध्ये मित्रांसोबत मनसोक्त आनंदात घालवलेले दिवस. कधीच कंटाळा आला. (नाही, नाही आता तर 'बोअर' असा शब्द वापरायला हवा.) असे बोअर कधी झालेच नाही. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक वेळेस मनसोक्त खेळणे आणि आनंद मिळवणे हाच जणू 'छंद' असायचा.

माझं स्वतःचं बालपण असं असताना मग मी माझ्या मुलांवर ओझं का टाकावं. आणि कला ही तर अभिजात असते ना! मग इतरांची मुले करत आहेत म्हणून मी माझ्या मुलांवर एका अर्थाने अवास्तव ताण तणाव का आणावा. शिक्षणाच्या जगात स्पर्धा आहेच. पण कलेच्या, छंदाच्या जगाला स्पर्धेचे रुप का द्यावे.
आणि मुलांवरही त्याचे ओझे का टाकावे.

मी स्वतः कलाकार कधीच नव्हतो. आणि आता बनणे ही शक्य नाही. सामान्यपणे जीवन जगत असताना सगळ्या अभिजात कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेणे आणि त्यांना मनमुराद दाद देणे, मात्र मला नेहमीच जमत आलेले आहे.
कदाचित तो आनंद मिळवणे हाच माझा छंद असू शकतो!

म्हणूनच मी ठरवले आहे, माझ्या मुलांना कलेसारख्या आनंदाच्या क्षेत्राचा कलाकार बनण्या सोबतच ती कला एक रसिक म्हणूनही अनुभवता येते, निर्भेळ आनंद मिळवता येतो, याचे स्वतः उदाहरण बणून त्यांच्यासमोर ठेवायचे आहे.
म्हणजे त्यांना कलेचे खरे दर्शन होईल.
आणि मग ते ठरवतील की त्यांचा 'छंद' कलाकार होऊन जीवन जगण्याचा आहे की रसिक होऊन...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...