Sunday, 4 December 2022

पुरे झाली महापुरुषांवरची चिखलफेक

'कुप्रसिद्धी नावाचा शब्द अस्तित्वात नसतो. असते ती केवळ प्रसिद्धी.' हा नियम लागू होतो तो  चित्रपट जगतताला. कारण चित्रपट जगतातील सर्व कलाकार कोणत्याही प्रकारे आपला चित्रपट प्रसिद्ध व्हावा आणि अमाप पैसा त्यातून मिळवा, प्रसिद्धी मिळवी यासाठी प्रयत्न करत असतात. मग कोणत्याही स्तराला जाऊन त्याच्यासाठीचा प्रसार प्रचार ते करत असतात.

परंतु हीच गोष्ट आता राजकारणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लागू होत असताना दिसते. एक काळ होता ज्या काळामध्ये राजकीय पक्ष हे एका ठराविक विचारांसाठी तयार झालेले असायचे.  त्यांची तत्व असायची.  आणि त्या तत्त्वांना, मूल्यांना धरूनच पुढच्या सर्व निवडणुका आणि त्यांच्या सरकार स्थापन झाल्यानंतर त्या दिशेने ते कार्य करत असायचे.

परंतु गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय पक्ष आणि अन्य काही सामाजिक संघटना यांच्यामध्ये खूप मोठी विचारांची कमतरता पाहायला मिळते. कदाचित त्यांच्याकडे आता विचार शिल्लक नाहीत असेही असू शकते. 

तत्त्वांसाठी विरोधाचा एक काळ होता. विरोधासाठी विरोधाचा देखील एक काळ होता. परंतु प्रसिद्धी च्या झोतात राहून सदैव चर्चेत राहण्याचा काळ आला आहे. आणि मग ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी जुने प्रकाराने उकरून काढत महापुरुषांवर चिखलफेक केली जाते.

राहुल गांधी यांना गांधी घराण्याचा प्रचंड मोठा आणि समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. परंतु विरोध करण्याचे कोणतीही मुद्दे शिल्लक राहिलेले नाही म्हणून की काय ते असे मुद्दे उपस्थित करत आहेत की जेणेकरून आपण सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहू. मग त्याकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती त्यांनी पुन्हा पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये चिखलीफेक केलेली आहे. ज्या सावकारांबाबत स्वतः म. गांधींनी सदैव आदर केला आहे, ज्याचा उल्लेख त्यांच्या अनेक पात्रातून आपल्याला पाहायला मिळतो. याच गोष्टीचा खोलवर जाऊन विचार केला तर असे लक्षात येते कि एका अर्थाने राहुल गांधी म. गांधींचे विचार नाकारत आहेत.

इथे केवळ मुद्दा राहुल गांधीं पुरता मर्यादित नाही.  तर एकंदरीत अशी मानसिकता होत चालली आहे, हे भयावह आहे. 

आणि तीच गोष्ट हिंदू महासभेने म. गांधींच्या बाबतीत केली आहे, असे निदर्शनास येते. केवळ एका घटनेकडे आणि ते ही दूषित दृष्टिकोनातून पाहायचे आणि म. गांधींनी केलेल्या महान कार्याला विसरून केवळ विरोध करायचा आणि तो देखील इतका पराकोटीचा करायचा की जेणेकरून समाजामध्ये त्यांच्या प्रति घृणा निर्माण होईल.  अशा वागण्यापर्यंतचे  कृत्य हिंदू महासभेने केलेले आहे. जे की अत्यंत निंदनीय असे आहे.

मुळात भारत वर्ष काही गेल्या १०० वर्षात निर्माण झालेले नाही.  भारताचा इतिहास राष्ट्र म्हणून आपण जर पाहिला तर तो हजारो वर्षांचा आहे.आणि म्हणूनच भारतवर्षामध्ये अगदी ठराविक राष्ट्रपुरुष आहेत असेही नाही. तर या राष्ट्राच्या उभारणीत अनंत असे संत, महंत, क्रांतिकारक, नेते, राजे यांचे अनेकांचे योगदान आहे. आणि अशा सर्वच राष्ट्रपुरुषांनी त्या त्या काळामध्ये त्या त्या काळाला अनुसरून राष्ट्राच्या उभारणीमध्ये महत्त्वाचे असे योगदान दिलेले आहे. या सगळ्यांनीच घेतलेल्या त्या त्या वेळेसच्या निर्णयाकडे आपण जर तुकड्यांमध्ये पाहायला लागलो, तर केवळ आपण आपल्या संकुचित बुद्धीचेच प्रदर्शन करत असू.

खरे तर अशा प्रकारची महापुरुषांवरची चिखलपेक करून आपण आपल्या येणाऱ्या भावी पिढीसमोर एक चुकीचे उदाहरण प्रस्थापित करत आहोत. बहुदा या गोष्टीची जाणीव अशा चिखलफेक करणाऱ्या कोणत्याही राजकीय नेत्यास नाही एवढेच या सगळ्यातून दिसते.

खरेतर कोणत्याही व्यक्तीशी जेव्हा आपण नातं जोडतो तेव्हा त्या व्यक्तीला आपण तिच्या सर्व गुण देशदोषांसह स्वीकारत असतो.

जर आपण आपल्या वैयक्तिक जीवनात हा नियम पाळत असू तर सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाचा विचार करत असताना हाच विचार आपण व्यापक स्वरूपात नेत नाही, हेच वास्तव आहे.

असे म्हटले जाते की, प्रत्येक व्यक्तीस मातृऋण  पितृऋण आणि ऋषीऋण असते. मात्यापित्यांबद्दलची कृतज्ञता आणि त्यांच्याबद्दलचं ऋण आपण त्यांची सेवा करत पूर्ण करत असतोच. परंतु ऋषीऋण म्हणजे अर्थात समाजाचे ऋण असतं.  ज्या समाजामुळे आपण वाढतो, आपण आपलं कार्य करू शकतो, व्यवहार पूर्ण करू शकत असतो  त्या समाजाबद्दल देखील आपण काहीतरी करणं अभिप्रेत असतं, अपेक्षित असतं. आणि अशा समाजासाठी जे एक व्यापक स्वरूपाचं काम करतात असे जे समाजपुरुष आणि राष्ट्रपुरुष असतात ते मग समग्र समाजाचा विचार करणारे असतात.  म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना तुकड्यांमध्ये पाहता येणार नाही.  पण काही समाजकंटकांना या गोष्टीची भान नसते.

अगदी टोकाचा विचार करून सांगायचे झाले तर आपले आई-वडील यांच्याकडे देखील आपण केवळ एक व्यक्ती म्हणून जर पाहायला लागलो तर ते देखील त्यांच्या जीवनामध्ये कधी न कधीतरी चुकले असणारच आहेत, परंतू त्याबद्दल आपण त्यांना कधीही दोषी धरतो का? निश्चितच असे कृत्य जगातील कोणतीही व्यक्ती करणार नाही.  मग हाच नियम राष्ट्रपुरुषांना आणि महापुरुषांना लागू होणार नाही का? आपण सर्व अर्थाने प्रत्येक राष्ट्रपुरुषाचे या राष्ट्राच्या उभारणीत योगदान हे परिपूर्ण आहे, असे समजूनच सर्व राष्ट्रपुरुषांना स्वीकारले पाहिजे. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे.  असं जर केलं तरच आपल्या देशाचं, वर्तमानपिढीचं आणि भावीपिढीचं भविष्य हे उज्वल आहे असे होईल.

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९



Sunday, 27 November 2022

एकात्मता मंत्र - स्वैर मराठी भावानुवाद


झाले पुराणकाळी

ऋषी मंत्रद्रष्टे अनेक

संबोधले तयांनी 

भगवंतास सुरेख


यम, मातरीश्वान, इंद्र आणि

संबोधीले वेदांती ब्रह्मपाणी

तो तर आहे जगन्नियंता

कधी कुमारस्वामी कधी शास्ता


बौद्ध म्हणती 'बुद्ध' जयांस

संबोधती 'अर्हन' जैन तयांस

निनादती शिखसंत 'सत् श्री अकाल' करोनी

तो स्वामी, तो पिता, तो ची जननी


तो ची गा परमात्मा

एकची अद्वितीय जाणा...


संगीत - डॉ.चारुदत्त देशपांडे

अनुवादक - हेमंत पोहनेरकर

Tuesday, 15 November 2022

अलक


त्याला तत्वज्ञान विषयात पीएचडी करायची होती.

परंतु गुरूंनी त्याच्या कडून तीन वर्ष सेवा करवून घेतली.

ती पूर्ण झाल्यावर तो म्हणाला, "आता मला तत्वज्ञान विषयात पीएचडी करायची गरज नाही."

गुरु शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. 

तो पुढे म्हणाला , "कारण जाणीव ते नेणीव हा माझा प्रवास तुम्ही अगदी सहज पूर्ण केला आहे." 

Monday, 14 November 2022

अलक


 ती - तुझा द्विधा मनस्थितीचा स्वभाव आता बदलला पाहिजे.

तो - ठिक आहे. प्रयत्न करतो.

       परंतु आजवर गोष्टी तुझ्या आवडीच्या करण्याच्या विचारात असायचो.


Sunday, 16 October 2022

सिंबा



सिंबा नेहमीप्रमाणे त्याच्या आई-बाबांसोबत सिंह आणि सिंहणी सोबत खेळत होता. गवतात लोळणे, झाडावर चढणे, उंचावरून पाण्यात उडी मारणे, नदीत पोहणे, आई-बाबांच्या पाठीवर बसून जंगलाची सैर करणे, धमाल मस्ती छोट्याशा सिंबाशी अशी रोज सुरू असायची.

एके दिवशी खेळता खेळता तो आई-बाबांपासून दूर गेला. आणि नेमका तिथे रानडुकरांचा कळप आला. छोट्याशा सिंबाला एकदा पाहून त्यांना वाटले, 'वा! आज तर आपल्याला सिंहाची मेजवानी आहे'. म्हणून मग एकत्रितपणे रानडुकरांनी सिंबाला सगळ्या बाजूंनी घेरले.

सिंबाला खूप भीती वाटली. तो मोठमोठ्याने रडायला लागला. त्याने अशी कधीही एवढी रानडुकरे एकदाच पाहिली नव्हती. रानडुकरे सिंबावर हल्ला करणार तोच त्यांना सिंहगर्जना ऐकू आली. 

आता घाबरून जायची वेळ रानडुकरांची होती. सुरुवातीला डरकाळीचा आवाज दुरून आला. पण काही वेळातच पुन्हा तीच सिंहगर्जना साक्षात जंगलाचा राजा देत समोर उभा आहे, असे पाहताच रानडुकरांनी पळापळ सुरू केली. काही क्षणातच रानडुकरे दिसेनाशी झाली.

परंतु सिंह त्यांना मारण्यासाठी त्यांच्या मागे धावला नाही. तो सिंबा जवळ केला. त्याने सिंबाला कुशीत घेतले. घाबरलेल्या सिंबाला आता खूप छान वाटत होते. तितक्यात सिम्बा आई देखील आली.

सगळा प्रकार लक्षात आल्यावर ती सिंबाला म्हणाली,  "तू जंगलाचा भावी राजा आहेस. तेव्हा तू असे घाबरायचे नाही. आणि रडायचे तर मुळीच नाही."

"पण एकदम एवढी रानडुकरे पाहिल्यामुळे काय करावे मला कळत नव्हते. आणि समोर तुम्ही दोघे देखील नव्हता. मग मी काय करायचे?", रडवलेल्या स्वरात सिंबा म्हणाला.

सिंहिन म्हणाली, "शुराप्रमाणे ठाम उभे राहायचे. आणि गर्जना करायची." सिंहीणीचे बोलणे मध्येच थांबवत सिंबा म्हणाला, "हो मला देखील तुमच्याप्रमाणे गर्जना करायची आहे."

"वेडा कुठला", सिंबाला पाठीवर घेत सिंह म्हणाला, "अरे गर्जना करणे हा तर आपल्यातील उपजत गुण आहे. तुला शिकायची गरज नाही. तू जसा जसा मोठा होत जाशील तशी तुला देखील गर्जना करता येईल." काहीतरी कळल्यासारखे करत मान डोलवत सिंबा बाबांच्या पाठीवर बसून पुन्हा जंगलाची सर करण्यास निघाला.

काही दिवस असेच निघून गेले. सिंबा आता मोठा होत होता. त्याचे खेळणे बागडणे सुरू होतेच.

आणि एके दिवशी असेच खेळता खेळता सिंबाला झाडाझुडपांमध्ये लपलेल्या एका महाकाय अजगरान पकडले. सिंह आणि सिंहिन त्याच्यापासून दूर होते. पण बहुदा त्याने काय होत आहे हे त्यांना दिसत नव्हते.

आता मात्र प्रसंग ओळखून सिंबा सावरला. नि त्याने एकच मोठी गर्जना केली. सगळे जंगल त्या गर्जनेने दणाणून निघाले. अजगराला तर घाम फुटला. त्याला कळालेच नाही की, आपण प्रत्यक्ष जंगलाच्या राजाला पकडले आहे. अजगराने घाबरून क्षणाच्या आत सिंबाभोवतीचा पिळ सोडला.

 सिंबा लगेच त्याच्या तावडीतून सुटला. पण पळून न जाता समोर उभा राहिला. नि त्याने पुन्हा एकदा सिंहगर्जना केली.

तितक्यात सिंबाच्या आई-बाबा देखील आले. आता अजगर दिसेनासा झाला होता. झाडाझुडपात गुडूप झाला होता.

 सिंबा ने दिलेल्या पहिल्या गर्जेनेमुळे त्याच्या आई-बाबांना सिंह आणि सिंहिनीला प्रचंड आनंद झाला होता. त्यांनी सिंबाची खूप माया केली.

 परत एकदा सिंहगर्जना करत सिंबा आई-बाबांचा पाठीवर न बसता त्यांचा सोबत डौलाने चालत चालत जंगलाचा फेरफटका मारायला निघाला.

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 2 October 2022

अलक

 मुले मोठी होत गेली तशी त्याने मुलांना लावलेली वाचनाची सवय देखील वाढत गेली.

मुलीचे लग्न ठरले. तेंव्हा ती म्हणाली, "बाबा, मला माझ्या रुखवतावर केवळ पुस्तकेच हवी आहे."

तो म्हणाला, "अश्या अवघड कल्पना राबवताना खूप अवहेलना स्वीकारावी लागते."

ती स्मित हास्य करत उत्तरली, "हि प्रगल्भता यावी म्हणूनच तुम्ही आम्हाला वाचनाची सवय लावली ना !"

Sunday, 18 September 2022

नाटक - 'दादा एक गुड न्यूज आहे' ... - एक समीक्षा

 


 'फ्लॅशबॅक' हा प्रामुख्याने चित्रपटांचा विषय. तर नाटकांना असते ती थीम. अत्यंत छोटा, अत्यंत सूक्ष्म असा विषय घेऊन, गाभा घेऊन नाटककार नाटक लिहीत असतो. जो की विषय प्रामुख्याने एखाद्या छोट्याशा अशा कथेचा होईल असे वाटते, तो विषय नाटककार त्याच्या कौशल्याने सबंध नाटकाचा बनवत असतो. मूळ त्या विषयाकडे पाहिले तर सुरुवातीला आपल्याला असे वाटते की, हा विषय इतका सूक्ष्म आहे की याचा एक वटवृक्ष तयार होईल का नाही. परंतु नाटककार त्याच्या कौशल्याने त्या सूक्ष्म अशा विषयाला न्याय देत सबंध नाटकाची रचना करत असतो. आणि नेमकं याच पद्धतीने 'दादा एक गुड न्यूज आहे' हे नाटक कल्याणी पाठारे यांनी अत्यंत कौशल्याने लिहीले आहे.

धक्का तंत्र तर सर्वच ठिकाणी वापरावे लागत असते. परंतु नकळतपणे नाटकाच्या सुरुवातीलाच जो काही नाटकांमध्ये विषय मांडायचा आहे तो अगदी पहिल्या पाच मिनिटातच जाहीर करून टाकणे म्हणजे नाटक खूप समर्थपणे पेलण्याचे ते एक दर्शनच आहे. आणि नेमकेपणाने 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या सुरुवातीच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये अवघ्या वीस वर्षांची धाकटी बहीण दादाला गुड न्यूज देते. आणि खरे तर नाटकाच्या काही वेळानंतर हा विषय फुलवत जात समोर येईल आणि मग नाटकाच्या मूळ गाभ्यापर्यंत जाऊ आणि नेमकेपणाने तो विषय कळेल अशा आशयामध्ये अशा विचारांमध्ये रसिक प्रेक्षक असतो. परंतु नाटकाच्या सुरुवातीलाच नाटकाचा विषय जाहीर प्रकट केल्यामुळे या नाटकाला एक छान अशा स्वरूपाची उंची प्राप्त झालेली आहे.

अगदी सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे नाटकातील प्रत्येक प्रसंग अगदी नेमकेपणाने लिहिण्यात आलेला आहे. नाटकातील विषय तोच तोच पद्धतीने समोर न येता कोणत्याही क्षणाला आपण नाटकाच्या मूळ विषयापासून सुटून दूर चालले आहोत, असे कुठेही जाणवत नाही, याचे श्रेय कल्याणी पठारे यांना दिलेच पाहिजे.

आणि सोबतच नाटकाचे दिग्दर्शक अद्वैत दादरकर आणि सर्व कलाकार यांनी ते समर्थपणे पेलले आहे. आपल्या अभिनयातून नाटकाचा विषय प्रेक्षकांपर्यंत यथार्थपणे घेऊन जाण्यामध्ये सर्वजण यामध्ये यशस्वी ठरले आहेत. त्याबद्दल नाटकाच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.

आता नाटकाच्या थीम विषयी थोडेसे.

अवघी वीस वर्षाची धाकटी बहीण ज्यावेळेला दादाला गुड न्यूज देते त्यावेळेस 'घाबरलेल्या आणि सावरलेल्या दादा'ची भूमिका उमेश कामत यांनी छानपणे साकारलेली आहे. बाबांपर्यंत पोहोचण्याच्या आधी नक्कीच प्रत्येक वेळेला प्रत्येक मुलाच्या बाबतीमध्ये आई सहाय्यकारी ठरत असते. परंतु त्यासोबतच दादा जर असेल तर आई-वडिलांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सुखकर होत असतो. कारण 'दादा' नावाप्रमाणे सगळा अनुभवही घेतलेला असतो. आणि नकळतपणे त्याच्या दादागिरीचा कुठे ना कुठेतरी धाकट्या भावंडांना लाभ देखील होत असतो.

म्हणूनच गोष्ट कळाल्यानंतरचा सुरुवातीचा चिडचिडपणा आणि नंतर मात्र वडील भाऊ या भूमिकेत जाऊन दादा म्हणून नंतरचं धाकट्या बहिणीला सावरून घेतल्याचा एकंदरीत सगळा भाग हा अत्यंत समर्थपणे यामध्ये आला आहे.

परंतु दादाला दिलेलं एकंदरीत सगळं काही महत्त्व, मानपान, प्रेम हे सगळं सादर करत असताना, कुठेतरी वडिलांना मात्र अगदी ठरवून वाईट ठरवलं, याचं अत्यंत वाईट वाटतं.

'दादा गुड न्यूज आहे' या नाटकात दादा आहे प्रमुख पात्र असल्यामुळे कदाचित नाटककाराला हे नकळतपणे करावं लागलं असेलही. परंतु याच्या ऐवजी नकळतपणे कुठेतरी वडिलांना वेगळ्या भूमिकेतही नक्कीच दाखवता आलं असतं, ही खंत मात्र कुठे ना कुठेतरी जाणवते.

बाकी नाटकातील सर्व जागा कलाकारांनी अत्यंत सुंदरपणे भरलेल्या आहेत. अद्वैत दादरकरची गाणं म्हणताना ची जागा तर विशेष टाळ्या घेऊन जाते. आणि वन्स मोर घेतल्याशिवाय नक्कीच राहत नाही.


आजची तरुण पिढी आव्हान झेलणारी, स्वतःचं करियर करत असताना हा असा वेगळा विषय देखील घेऊन समोर आपल्या येते, ही गोष्ट नाटककाराने खूप छान पद्धतीने नाटकाच्या माध्यमातून मांडली आहे.

अर्थातच नाटकाचे संपूर्ण कथानक सांगणे या ठिकाणी अपेक्षित नाही. तसेच नाटकाचा शेवट सांगणे हे तर निश्चितच नाही. परंतु वेगळा विषय घेऊन मांडलेले नाटक नक्कीच पाहिले पाहिजे, हे मात्र अगदी खात्रीने सांगू शकतो. तेव्हा अवश्य पहा... 'दादा एक गुड न्यूज आहे...'

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

अलक

तो प्रत्येकाला ओळख करून घेत असताना त्यांचे '' आधी विचारायचा.

एकदा एका गृहस्थाने थेट म्हणाले,

"नावाच्या आडून '' माहीत करून घेण्याची सवय आता सोडली पाहिजे".

Saturday, 17 September 2022

अलक

 डिजिटलायझेशनचा काळात तो एकदा म्हणाला, "उपवास अन्नचाच करायचा असतो".

त्याचे मित्र त्याला 'ऑर्थोडॉक्स' म्हणाले.

त्यावर तो उत्तराला, "अनादी काळापासून आपली संस्कृती कशामुळे टिकून आहे, हे तुम्हाला अजून कळायचे आहे."

Friday, 16 September 2022

अलक

 एव्हाना त्याचे व्यसन खूप वाढले होते. सर्व इलाज करून झाल्यावर आई वडील त्याला एका महाराजांकडे घेऊन गेले.

सर्व समजावून घेतल्यावर महाराज म्हणाले,

"'तृष्णे ने तृष्णा' कधीच शमत नाही. त्याला 'कृष्णा'वर ध्यान देण्यास सहाय्य करा".

Thursday, 15 September 2022

अलक

 'कवीकल्पना' या नावाखाली एका कवीने 'चावट पाऊस' अशी कविता सादर केली.

अर्थातच ही एक अत्यंत वाईट अशी कवीकल्पना होती.

परंतु लगेचच दुसऱ्या एका कवीने शीघ्र कविता करत 'कवी आणि रवी' यांची सामाजिक जबाबदारी मांडली.


Wednesday, 14 September 2022

अलक

मंगळावर मानवाने आता वस्ती केली होती.

त्यावर एक महान साहित्यिक म्हणाले,

"आता 'आकाश ठेंगणे झाले' हा वाक्प्रचार प्रत्यक्षात आला."

Tuesday, 13 September 2022

अलक

 एका शहराला केंद्र सरकारने 'पर्यटन राजधानी' म्हणून घोषित केले.

त्या शहरातील नागरिकांनी मोठा उस्तव साजरा केला.

परंतू काही व्यापाऱ्याांनी एकत्र येऊन निर्णय केला, 'या निमित्ताने येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ केवळ आपल्या उद्योगालाच झाला पाहिजे.'

Monday, 12 September 2022

अलक

 एमबीए झाल्यानंतर त्याने पर्सनल गोल सेट केले. ते पाहून त्याचे वडील "अपूर्ण", असे म्हणाले.

त्यावर तो म्हणाला, "मी त्यात कुटुंबाचा देखील विचार केला आहे."

स्मित हास्य करत वडील उत्तरले, "वैश्विक कुटुंबाच्या जबाबदारीचा देखील एक गोल सेट कर."

Sunday, 11 September 2022

अलक


"उत्साह आणि उत्सव रोज असला पाहिजे", एक महाराज त्याला म्हणाले.

त्यावर तो म्हणाला, "उसनं अवसान आणता येईल. परंतु रोज उत्सव कसा असेल?"

"तीच तर गमंत आहे", महाराज उत्तरले, "जीवनाचा उत्सव छोट्या छोट्या प्रसंगात शोधत साजरा करायचा असतो."

Thursday, 8 September 2022

अलक

 गणेश मंडळाच्या कार्यक्रमात गल्लीतील मुलांनी आपआपल्या आवडीप्रमाणे गायन, नृत्य, भाषण, विनोद, सूत्रसंचालन इत्यादी गोष्टी सादर केल्या.

एका किशोरवयीन मुलाला घरी गेल्यावर त्याचे वडील रागावत म्हणाले, "गाढवा, बघ त्या मुलांकडे. तुझ्यात एकही कलागुण नाही!"

"आहे ना!", वडिलांना अगदी शांतपणे उत्तर देत तो म्हणाला, "एक रसिक, आस्वादक असण्याचा".

Tuesday, 6 September 2022

अलक


आज दिवसभरात काहीच लिहिले नाही, म्हणून तो विचार करत होता. 

तोच स्वयंपाक घरातून आवाज देत बायको म्हणाली,

"अहो, महिना संपत आला आहे, किराणाची यादी लिहून काढा ना !"

Sunday, 4 September 2022

अलक

 सुरवंटाचे फुलपाखरू होत असताना पाहून त्याला प्रचंड आनंद झाला. नि तो विचारत पडला.

घरी गेल्यावर आईला म्हणाला, "आई, असा बदल कधी जन्मलेल्या बाळात का होत नाही?"

बालवयातील मुलाचे कुतूहल पाहून आईने त्याची माया केली.

नि मनातल्या मनात म्हणाली, 'खरेतर माणसाचा जन्म आतून बदल करण्यासाठी असतो'.

Sunday, 28 August 2022

अलक

 त्यां दोघांत बऱ्याच दिवसांत भांडण झाले नव्हते.

दोघांनाही काहीतरी चुकल्याचुकल्या सारखं वाटत होतं.

मग त्याने तिच्या माहेरचा विषय काढला.

Monday, 22 August 2022

अलक

 जरठ- कुमारी विवाह प्रथा बंद झाली, हे कुटुंब कल्याण विभााचे फार मोठे यश आहे, असे मानत शासनाने मोठा कार्यक्रम घेतला.

त्याची बातमी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्रकाशित करण्यात आली.

त्याच शेजारी दुसरी बातमी छापलेली होती, 'सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याचा नवोदित तरुण अभिनेत्रीशी प्रेमविवाह.'

Sunday, 21 August 2022

हेल-बॉपचा धूमकेतू

 

अवकाश विज्ञाना विषयी हा लेख नाही. परंतु मनातील एका अविष्कारा विषयी निश्चितच आहे. नव्हे मनातील अवकाश एवढे विस्तृत आणि विशाल असते की, त्यात अनेक धूमकेतूंची भावतरंग उठत असतात. असो.

हेल आणि बॉप या दोन वेगवेगळ्या खगोलशास्त्रज्ञांनी एकाच दिवशी अवकाशातील एका नव्या धूमकेतूंची नोंद केली. ही घटना साधारण १९९५-९६ च्याकाळातील आहे. वर्तमानपत्रातून यावर प्रकाशित झालेले अनेक लेख वाचले. ग्रहताऱ्यांचे, आकाशगंगे विषयीचे कुतूहल होतेच. परंतु या घटनेत मुख्य लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे 'एकाच वेळी दोन वेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या शास्त्रज्ञांनी एकाच गोष्टीचा लावलेला शोध'.

वैज्ञानिक इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे होते की, दोन भिन्न व्यक्ती एकाच वेळी एकाच गोष्टीचा शोध लावला. ही गोष्ट वारंवार मनात घोळत राहिली.

आणि जाणवले की, चांगल्या-नव्या गोष्टींच्या शोधा करिता आपण प्रयत्न केला नाही तर त्याच वेळेला त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणारा अन्य कुणी तरी यशस्वी होऊ शकतो. अर्थात नवनवीन कल्पना या आपल्या प्रमाणे इतरांच्याही मनात येत असतात. आणि कदाचित हुबेहूब तीच कल्पना जी की आपल्या मनात आहे, ती कोणताही फरक न असता.

पण आपण त्या दिशेने पावले उचलली, प्रत्यक्ष कल्पना साकार करण्याकरीता अपार कष्ट घेतले. तर खचितच ती कल्पना आपल्या स्वतःच्या नावाने नवारुपास येईल. अन्यथा तिचे प्रकटीकरण व मालकीहक्क अन्य कोणी तरी घेऊन जाईल.

एक मराठी किंवा भारतीय व्यक्ती म्हणून बहुदा आपण 'श्रेयसा' पासून दूर रहावे असेच आपल्याला बालपणापासून शिकवले जाते. याउलट पाश्चात्त्य जगात अतिरेक असेलही. परंतु चांगल्या गोष्टींचा शोध, मांडणी, सादरीकरण आणि त्यावर स्वतःचे नाव कोरणे, हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे आहे.

आणि विशेष म्हणजे अगदी सामान्यतः सर्वसामान्यांच्या मनात अनेक नवनवीन कल्पनांचे तरंग उठत असतातच. पण 'त्या तरंगांची तीव्रता म्हणाला भिडते का? वस्तुस्थिती काहीही असो, परिस्थिती कशीही असो, ती कल्पना साकार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातात का?' तर कदाचित नकारात्मक उत्तरच अधिक असेल. अपयशाची भीती, चाकोरीबाहेर जाण्याचे धाडस नसणे, नेहमीपेक्षा वेगळं काही करायचं तर समाज काय म्हणेल, अशा कितीतरी गोष्टी असतील. आणि कदाचित त्याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे 'आळस'. हा खरंतर खूप मोठा शाप आपणांस आहे.

बहुतांश मराठी माणसाचा स्वभाव भिडस्त. स्वतःहून नव्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी संकोचच अधिक. अगदी वैयक्तिक स्तरावर शालेय जीवनापासून याचा अनुभव आलेला. वर्गात अनेक वेळा शिक्षकांनी कधी अभ्यासक्रमबाह्य विषय घेतले. आणि त्यावर 'प्रश्न विचारा' असे म्हणाले. तरी देखील मनात निर्माण झालेल्या कुतूहलापोटी देखील फारसे प्रश्न विचारण्याचे धाडस कधी झाले नाही. पण या थोड्याच क्षणात मनातील तेच 'कुतुहल' अन्य कुणाकडून तरी विचारले जायचे. व्यष्टी ते समष्टी हाच अनुभव सार्वत्रिक आहे. आणि व्यावसायिक जीवनातही याच गोष्टीची प्रचिती येते.


या सगळ्या प्रकाराला अपवाद असणारे ही आहेतच. परंतु त्या 'अपवादां'पासून अपवादाने प्रेरणा घेणारे तुरळकच.

कदाचित अध्यात्मिक पातळीवर विचार केला तर लक्षात येईल की, आपल्या सर्वांचेच वैश्विकमन एकच आहे. म्हणून या मनात निर्माण होणारे तरंग हे दुसऱ्या मनाला जाणवतात, भावतात. आणि भावनिक पातळीवर वाटते की, दुसऱ्याच्या मनातील विचार अगदी जसाच्या तसा आपल्याही मनात आला होता. म्हणून ज्या क्षणी असा विचार, भावना, संकल्पना उत्पन्न होते, त्याच क्षणी ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली तर कदाचित या कल्पनेला साकारणारे आपण एकमेव असू किंवा तितक्याच प्रमाणात अन्य कुणीतरी प्रयत्न केला असेल तर ती कल्पना देखील हेल-बॉपच्या धुमकेतू सारखी ओळखली जाईल, हे निश्चितच...

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 14 August 2022

अलक

एक सामाजिक संघटना निर्माण झाली.

तिने आपली घटना प्रसिद्ध केली.

ज्यात नमूद केले होते 'समर्थ, सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचे ध्येय'.

काही समीक्षकांनी खूप आलोचना केली.

पण ती सामाजिक संघटना अनेक वर्षे डळमळीली नाही.

त्यांनी आदर्श बुद्धांच्या तत्वज्ञानाला मानले होते.

त्याप्रमाणे ते कार्य करत होते.

-  बुद्धम् शरणम् गच्छामि. धम्मम् शरणम् गच्छामि. संघम् शरणम गच्छामि...

Monday, 8 August 2022

अलक क्र. १००


'उतिथ्य', 'त्वष्टा' असे काही शब्द वाचनात आल्यानंतर त्यांचे अर्थ समजून घेण्याकरिता तो मराठी विश्वकोश वाचनात गढून गेला होता.

त्याला एव्हढे मोठे पुस्तक वाचताना पाहून त्याची इटुकली लाडो म्हणाली,

"बाबा, या मोठ्ठया पुस्तकात कोणाची गोष्ट आहे?"

स्मित हास्य करत तो म्हणाला,

"तुझीच अभिधा."

Sunday, 7 August 2022

अलक क्र.९९

 

सांज खुलली की ती बेभान होऊन नाचत असे.

एकदा न राहवून तिची मैत्रीण तिला म्हणाली,

"एव्हढ्या तन्मयतेने कोणासाठी नाचतेस?"

ती उत्तरली,

"'मनोहरा'ला कधी नावात अडकवता येतं का?"

Saturday, 6 August 2022

अलक क्र.९८


हसणाऱ्या प्रत्येक मनुष्याला तो विचारायचा, "तुम्हाला एखादं कधीतरी मोठं दुःख झालेले आहे का?"

अर्थातच प्रत्येक मनुष्याचे 'हो' असेच उत्तर यायचे.

एकदा एका वयोवृद्ध मनुष्याला हसताना पाहून तो तोच प्रश्न विचारत पुढे म्हणाला,

"मी गर्भ श्रीमंतीत वाढलो आहे. मला दुःख माहीत नाही. म्हणून आनंद देखील कळत नाही".

स्मित हास्य करत ते वयोवृद्ध गृहस्थ म्हणाले, "अगदी सोपं आहे. इतरांच्या दुःखात सहभागी हो".

Friday, 5 August 2022

अलक क्र. ९७


       त्याला दुकानदाराने फसवले आहे, हे त्याच्या लक्षात आले तोपर्यंत त्याने पैसे दिले होते.

त्याला अधिकचे पैसे गेल्याचे दुःख होत नव्हते तर फसवल्या गेल्याचे वाईट वाटत होते.

स्वतःला सावरत तो परत दुकानात गेला. दुकानदाराला वाटले आता हा वाद घालेल.

तो मोठा उद्योजक होता. स्वतःचे कार्ड देत म्हणाला, "कधी काही गोष्टींची गरज पडली तर नि:संकोच फोन कर."

नि दुकानाबाहेर पडत मनातल्या मनात विचार केला,

 'मी याला माफ केले नसते तर याने काही दिवस का होईना माझ्या मनात घर केले असते.'

Thursday, 4 August 2022

अलक क्र.९६


आयुष्यात एकदतरी विमान प्रवास करण्याची त्याच्या आईची खूप ईच्छा होती.

परंतू सर्व सामान्य करकुनाची नोकरी करून घर खर्च सांभाळत त्याला हा खर्च परवडणारा नव्हता.

शिवाय आता मुलं मोठी होत होती. त्यांच्याही शिक्षणाचा विचार करावा लागणार होता.

असेच एकदा घरात आईच्या विमानप्रवासाचा विषय निघाला.

तो टाळण्याचा प्रयत्न करत होता.

तोच त्याचा मुलगा म्हणाला, "बाबा, अगदी हलाखीच्या परिस्थितीतही आजी-आजोबांनी तुमच्या लहानपणी तुमचे सगळे लाड पुरवले असतील ना!"

Wednesday, 3 August 2022

अलक क्र.९५


त्याला आमदारकी हवी होती.

पक्षाकरिता कितीही काम केले तरी प्रत्येकवेळी त्याला डावलण्यात आले.

शेवटी कंटाळून पक्षप्रमुखांनी त्याला खात्रीने पडणाऱ्या जागेची उमेदवारी दिली.

पण आश्चर्यकारकरीत्या तो जिंकला.

आता पक्ष प्रमुख भविष्यात तो धोकादायक ठरू नये म्हणून त्याच्या निलंबनाचा उपाय शोधत आहेत.

Tuesday, 2 August 2022

अलक क्र. ९४

 

जनरेशन गॅप टाळण्यासाठी तो तरुण मुलाच्या सवयी, आवडी-निवडी समजावून घ्यायचा.

म्हणूनच की काय मुलासोबत त्याचे फार कमी वेळा मतभेद झाले.

एके दिवशी मुलगा म्हणाला, "मला माझी प्रायव्हसी हवी आहे.

मी वेगळा राहण्याचा निर्णय घेतला आहे".

त्यानंतर त्याने मुलाला सगळ्या सोशल प्रोफाइल मधून उन्फ्रेंड केले.

Monday, 1 August 2022

अलक क्र.९३

 त्याने भिकाऱ्याला काही पैसे देऊ केले

आणि त्याच्या गालात एक जोरात चापट मारली.

भिकारी एकदम त्याच्या अंगावर धाऊन गेला.

त्याने लगेचच भिकऱ्याचे पाय धरले आणि म्हणाला,

"सद्गुरूंच्या आदेशाचे पालन करतो आहे.

'मनुष्याला त्याचा अभिमान सर्वस्वी असतो',

हे प्रत्यक्ष अनुभवन्याचे".

Sunday, 31 July 2022

अलक क्र.९२

 

त्याने बस नेमकीच चालू केली आणि त्याला घरून फोन आला, त्याचे 'वडील गेले' म्हणून.

तो थांबला नाही. त्याने ती बसची फेरी पूर्ण केली.

मग घरी गेला.

वडीलांच्या पर्थिवासमोर हात जोडून उभा राहिला. त्या वेळी वडिलांनी सांगितलेले वाक्य सारखं त्याच्या कानांवर पडत होतं,

'हाती घेतलेले कोणतेही काम कधीच अर्धवट सोडू नकोस'.

Saturday, 30 July 2022

अलक क्र. ९१


तिच्या सासरचे तिच्या भावाकडे सारखी काही ना काही तरी मागणी करायचे.

एकदा ती भावाला म्हणाली,

"आज बाबा असते तर तुला हा त्रास सहन करावा लागला नसता."

" मी वडील भाऊ आहे ना!", स्मित हास्य करत तो पुढे म्हणाला,

"अगं, उलट मला त्यांच्या वागण्याचा काही त्रास होत नाही.

कारण अशी माणसे आपल्याला आयुष्यात आपण कसे नाही वागायचे, ते शिकवायला येत असतात." 


Friday, 29 July 2022

अलक क्र. ९०


त्याने राजकारणात नवीन नवीन प्रवेश केला होता.

दरवेळेस आपल्याला कुणीतरी काहीनाकाही कारणांनी चांगले म्हणावे, असे त्याला वाटे.

परंतु तो चांगले काम करून ही  टीकेचा धनी व्हायचा.

आता त्याच्या लक्षात आले, पक्षाने 'कमळ' हे चिन्ह म्हणून का निवडले.

Thursday, 28 July 2022

अलक क्र. ८९

 

राफेल नदाल त्याचा आवडता खेळाडू.

हरणाऱ्या मॅच मध्ये देखील शेवटच्या क्षणा पर्यंत कोणतीही उद्विग्नता प्रकट न करता प्रयत्न करणे,

हा त्याचा गुण त्याला खूप आवडायचा.

परंतु तो स्वतः आयुष्यात खुप काही मोठे करू शकला नाही.

परंतु प्रयत्न कधीही न सोडल्यामूळे, 

तो स्वतःला आरशात पाहताना नेहमीच समाधानी असायचा. 

Wednesday, 27 July 2022

अलक क्र.८८

 

'लास्ट मिनिट रश' त्याला कधीच आवडत नसे. तो प्रत्येक काम वेळे आधी पूर्ण करायचा.

परंतू त्यांची टीम नेमकी त्याच्या या स्वभावाच्या विरुध्द होती.

त्याने टीमला काधीही सुधारणा करण्यासाठी लेक्चर दिले नाही.

तो प्रत्येकवेळी स्वतः उदाहरण म्हणुन त्यांच्या समोर उभा राहायचा.

Tuesday, 26 July 2022

अलक क्र. ८७


'यशाचं शिखर खूप निसरडं असतं. प्रत्येक पाऊल जपून टाक',

त्याला गुरूंनी उपदेश केला.

आता जवळ जवळ तो गेली २५ वर्ष यशाच्या शिखरावर विराजमान आहे.

त्याने गुरूंना दिलेल्या उपदेशात अपयशी होऊ नये म्हणून उपाय विचारला होता. 

ज्याचे तो तंतोतंत पालन करतो आहे. 

'ज्यांचे सहकार्य, प्रेमामुळे जीवन घडले, त्यांना कधी अंतर देऊ नको.

आणि त्यांच्यासोबत राहत असताना आत्मप्रौढी बाळगू नको.'


Monday, 25 July 2022

अलक क्र. ८६


एकदा रस्त्याने जाताना एका कुपोषित मुलाला पाहून

'समाजातील या कुपोषित घटकासाठी आपण काहीतरी करावे', हा विचार मनात आला.

परंतु हा विचार प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्यासाठी त्याला सहा महिन्यांचा कालावधी लागला.

या कालावधीमधे त्याच्या ताटात कधीही एकही अन्नाचा कण वाया गेला नाही.

Sunday, 24 July 2022

अलक क्र. ८५

 

स्वतःची सर्व सामान्य आर्थिक परिस्थिती असूनही त्याने जीवनभर गोरगरिबांसाठी सेवाकार्य चालवले.

अर्थातच त्यातून उत्पन्न नव्हतेच. उलट घरातूनच खर्च अधिक व्हायचा.

एकदा त्याची पत्नी म्हणाली,

"तुम्हाला सेवेतून मिळणारे समाधान मी समजू शकते. पण एव्हढे सातत्य तुम्ही कसे काय ठेवले?"

त्यावर तो उत्तरला,

"तुम्ही बायकां जशा सतीचे वाण घेऊन सुंदर संसार करता ना. तसेच काहीसे माझ्या हातून घडले."  

Saturday, 23 July 2022

अलक क्र. ८४

 

त्याची इटुकली लाडो झोपतांना त्याच्याकडून गोष्ट ऐकायची आणि नंतर आईच्या कुशीत जाऊन झोपायची.

तो एकदा लाडोला म्हणाला,

"तू माझ्याजवळ झोपणार असशील तरंच मी तुला गोष्ट सांगेन."

त्यावर लाडो आईच्या कुशीत अधिकच शिरली.

त्याची पत्नी म्हणाली,

"तुम्ही कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर तिला माझ्या कुशीत झोपतांना गोष्टीची गरज भासत नाही."

Friday, 22 July 2022

अलक क्र. ८३


त्याची आजी नेहमीच चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या अशा तिथी सांगतच सगळ्या आठवणी नि घटना सांगायची.

आजीचा त्याच्यात जीव खूप होता.

पण तो नव्या पिढीतला.

व्यावहारिक विचारांतून दिनदर्शिका आणि पंचांगाची सांगड घालून घटना समजावून घ्यायचा.

८१ वर्षांचं जीवन जगून आजी जात राहिली.

तो प्रचंड रडला.

आता त्याला सहस्त्र पौर्णिमा पाहिलेली आजी कोणताही प्रकाश दाखवणार नव्हती.

Thursday, 21 July 2022

अलक क्र.८२

 

लोकलच्या दाराजवळची जागा रिकामी असतानाही तो थोडासा आत सरकून उभा राहिला.

त्याच्याकडे बघून रोज त्याच लोकलने सोबत जाणारा प्रवासी म्हणाला,

"बहुदा नुकतेच तुझे लग्न झालेले दिसते."

तो गालातल्या गालात हसला.

त्यावर तो प्रवासी म्हणाला,

"जवाबदारीची जाणीव प्रत्येकक्षणी वागण्यात दिसणे म्हणजे उत्कृष्ट संसार झालाच समज."

Wednesday, 20 July 2022

अलक क्र. ८१


पिढीजात चालत येणारा राजकारणाचा वारसा त्याला नको होता.

परंतु वडिलांचा शब्द त्याला मोडणे शक्य झाले नाही.

नंतर तो अत्यंत अयशस्वीपणे राजकारण करू लागला.

त्यावर त्याला थांबवत वडील म्हणाले,

"सज्जनांची राजकारणातील अरुचीच बदमाशांना राजकारणात स्थिर करत असते." 

Tuesday, 19 July 2022

अलक क्र. ८०

 

मनाजोगते कथानक मिळेपर्यंत तो कुठेही वेड्यासारखा फिरायचा.

असेच एकदा त्याला कुणीतरी वेश्यावस्तीतून परतताना पहिले.

त्या गृहस्थाने ही गोष्ट त्याच्या पत्नीला सांगितली.

त्यावर स्मितहास्य करत ती म्हणाली,

"अहो! माझी खरी सवत त्यांची लेखणी आहे."

Monday, 18 July 2022

अलक क्र ७९

 

जीवघेण्या स्पर्धेकरिता ती मुलाला तयार करत होती.

मुलगा म्हणाला,

"आई, स्पर्धा ऐच्छिक असते ना!"

"हो, बाळा. पण यश मिळवणे अनिवार्य असते",

ती मुलाला समजावत पुढे म्हणाली,

"पण तू तुझा जीव तुझ्या आवडीच्या विषयात लाव.

मग तुला स्पर्धा जीवघेणी वाटणार नाही."    

Sunday, 17 July 2022

अलक क्र. ७८

अतिलघुकथा


एकदा एका नवोदित प्राध्यापकाने वर्गात एका कॉलेजकुमाराला विचारले,

"तुझा आवडता विषय कोणता?"

"रॅगिंग", तो उत्तराला.

वर्गात एकच हशा पिकाला. 

मग शांतपणे त्या प्राध्यापकाने त्या कॉलेजकुमाराची रॅगिंग घेतली. 

आता कुणीही हसले नाही.

त्यावर तो प्राध्यपक म्हणाला, 

"बहुदा माझी अपॉइंटमेंट तुमचा 'आवडीचे विषय' बदलण्यासाठीच झाली आहे."

Saturday, 16 July 2022

अलक क्र. ७७


"तू साधा चहा सोडू शकत नाहीस. तू काय गाव सोडून परदेशात झेंडा फडकावशील?",

असे म्हणत त्याच्या मित्रांनी त्याला टोमणे मारले.

हुशार विद्यार्थ्यांत कधीही नसणारा तो आता केवळ अथक प्रयत्नांवर परदेशात गेला आहे.

काही वर्षांनी तो गावी परतला.

मित्रांनी आता त्याची स्तुती करत त्याला चहा देऊ केला.

त्यावर तो म्हणाला,

"तुमची आठवण रोज येत राहावी. म्हणून मी चहा केव्हांच सोडला आहे."

Friday, 15 July 2022

अलक क्र. ७६

अति लघु कथा


विद्वान लोकांत आपली गणना व्हावी म्हणून तो खूप अभ्यास करायचा.

परंतु म्हणावी तेव्हढी विद्वत्ता त्याच्यात कधी आली नाही.

अनेक प्रकारे प्रयत्न करून आजही त्याची गणना विद्वानांत केली जात नाही.

म्हणून मग त्याने आता त्याने स्वतःचे  नामकरण 'पंडित' असे केले आहे. 

Thursday, 14 July 2022

अलक क्र.७५


एक गुणी अभिनेत्री असूनही प्रमुख भूमिका मिळण्यासाठी तिला खूप स्ट्रगल करावे लागले.

त्यावर एक पत्रकार खोचकपणे म्हणाला,

"बहुदा तुम्ही 'कास्टिंग काऊच'ला नकार दिला असणार!"

ती होकार देत म्हणाली,

"बाजार तर सदैव उघडा असतो, विकलं जाण्यासाठी.

परंतू मला अनेक तरुणींसाठी रोल मॉडेल व्हायचे होते.

म्हणून मी खडतर मार्ग स्वीकारला." 

Wednesday, 13 July 2022

अलक क्र ७४


"गुरूंच्या प्रतिमेची देखील पूजा कर", किशोरवयीन मुलाला पूजा करत असताना आई म्हणाली.

"पण आई, ही तर व्यक्तीपूजा होईल ना?", त्याने प्रश्न उपस्थित केला.

आई त्याला समजावत म्हणाली,

"बाळा, हा नियम गुरूंना लागू होत नाही."

परंतु नुकत्याच कळू लागणाऱ्या मुलाच्या बुद्धीला पटत नव्हते.

आई पुढे म्हणाली,

"तुला कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी माहीत आहेत."

त्याने मान डोलावली.

आई म्हणाली,

"'या सगळ्या गोष्टी आपण मागितले तेव्हढेच देत असतात.

गुरु मात्र न मागता ही आपल्याला प्रत्येकगोष्टीसाठी सक्षम करत असतात." 

Tuesday, 12 July 2022

अलक क्र ७३


'कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका', हे वचन मान्यच आहे.

परंतु कर्म करून ऍप्रिसिएशनची अपेक्षा तर ठेवू शकतो ना!",

त्याने एका गुरुमहाराजांना प्रश्न विचारला.

"ज्या अर्थी अशी अपेक्षा आहे त्या अर्थी तुमच्या कर्माने तुम्हाला

सॅटिसफॅक्शन दिले असे जाणवत नाही.", गुरु महाराज उत्तर देत

पुढे म्हणाले, "पहिले रिकग्निशन आपण आपल्याला दिले पाहिजे." 

Monday, 11 July 2022

अलक क्र ७२


'चातुर्मासातील व्रतवैकल्य - एक शास्त्रीय आधार',

त्याने अनेक दिवसांच्या अथक परिश्रमाने त्याचा शोध निबंध पूर्ण केला.

सर्व बिद्धीजीवींनी खूप प्रशंसा देखील केली.

त्याने एकदा तो शोध निबंध एका महाराजांना दाखवला.

आणि आग्रह धरला की त्यांनी तो सर्वांसमोर मांडावा.

त्यावर महाराज त्याला म्हणाले,

"आम्ही लोकांना केवळ 'भक्ती' सांगतो.

कारण भक्तीच साधन असते, भक्तीच सध्या असते

आणि भवसागर तरण्यास कारणही भक्तीच असते."     

Sunday, 10 July 2022

अलक क्र.७१

 



'समरस भारतीय समाज निर्मितीसाठी 'समरसता' प्रत्येक भारतीयाच्या जीवनात यावयास हवी',

एका संतांनी या आशयाचा विषय एका संत संमेलनांत मांडला.

नि दुसऱ्या दिवशीपासून

'हा उदात्त विचार मांडणारे संत आमच्या जातीतील',

असे म्हणत, काही लोक त्यांना त्यांच्या जाती पुरते मर्यादित करू लागले.



Saturday, 9 July 2022

अलक क्र.७०

 

त्याच्या इटुकल्या लाडो सोबत तो 'ट्रॅफिक सिग्नल' खेळ खेळत होता.

राज्यं त्याच्यावर आले.

तिने पाळायला सुरुवात केली.

तो, "रेड सिग्नल", म्हणाला.

परंतु ती थांबली नाही.

तो तिला थांबवत म्हणाला,

"'रेड सिग्नल' लागल्यावर थांबायचं असतं ना!"

त्यावर त्याची इटुकली लाडो म्हणाली,

"पण कधी कधी तू पण गाडी चालवताना रेड सिग्नल लागल्यावर थांबत नाहीस. तसंच मी पण एखाद्यावेळेस केलेतर चालेल ना!"

Friday, 8 July 2022

अलक क्र.६९

 

आपण कुणाच्यातरी मृत्यूचे चिंतन केले, म्हणून तो अंतर्बाह्य हादरला.

प्रायःश्चित्त करूनही त्याचे मन शांत होत नव्हते.

मग त्याच्या गुरुमहाराजांनी त्याला उपदेश केला,

"ज्याच्या मृत्यूचे चिंतन केले त्याला सर्वतोपरी मदत कर."

Thursday, 7 July 2022

अलक क्र.६८


त्याला युद्धात 'वीरमरण' आल्यानंतर मुलांना बोर्डिंगस्कुलमध्ये ठेवून ती देखील सैन्यात भरती झाली.

तिला समजावत तिचे आई वडील म्हणाले,

"परंतु एव्हढा अट्टहास का?"

ती उत्तरली,

"त्याने सुरू केलेल्या भारतमातेच्या पूजेची उत्तरपूजा करावीच लागेल ना."

Wednesday, 6 July 2022

अलक क्र.६७


"'शोधलेले राष्ट्रपती, झालेले पंतप्रधान नि केलेले मुख्यमंत्री', असा सध्या भारत देश चालू आहे",

असे एका राजनीतिक विशेषज्ञाने मत व्यक्त केले.

त्यावर प्रचंड वादळ उठलं. प्रसार माध्यमांत काही दिवस चर्चा चालू होत्या.

अशाच एका चर्चेत दुसऱ्या एका राजनीतिक विशेषज्ञाने मत व्यक्त केले,

"म्हणूनच विकास राजकारण्यांच्या धोरणांमुळे होत नसतो."

Tuesday, 5 July 2022

अलक क्र.६६


कन्टेन्ट रायटर असल्यामुळे त्याला अनेक वेळा मनाविरुद्धच्या असाइनमेंट केवळ क्लायंटला पाहिजे म्हणून करून द्यावे लागे. अशावेळी तो फीस अव्वाच्यासव्वा सांगायचं आणि लोकं देखील ती द्यायचे.

तेंव्हा तो शब्दांची माफी मागायचा.

एकदा त्याचा मित्र त्याला म्हणाला,

"परंतु तू माफी मागण्यापलीकडे काही प्रायश्चित्त करतो का?"

तो स्मितहास्य करत उत्तरला,

"मनाजोगती कथा हातावेगळी होत नाही तो पर्यंत अज्ञातवासात जातो."

Monday, 4 July 2022

अलक क्र.६५

         

अधःपतनाला एक छोटासा विचारही पुरेसा असतो.

तो मात्र 'तो प्रसंग म्हणजे केवळ एक अपघात होता', म्हणून बोळवणी करत होता. 

ती सावरली. म्हणाली,

"मला एक प्रश्न पडलाय. 'चारित्र्य' हे नपुंसक लिंगी का असते?" 

Sunday, 3 July 2022

अलक क्र.६४


त्याने नुकतीच 'तत्त्वज्ञान' विषयात पीएचडी पूर्ण केली.

तारुण्यातील सळसळता उत्साह घेऊन तो नेहमीच 'तत्त्वज्ञान' मांडायचा.

एकदा एका व्याख्यानात तो म्हणाला, 

"मनुष्य सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करत असेल तर ते स्वत:वर".

प्रचंड टाळ्यांचा कडकडाट घेऊन तो पत्नीसह घरी निघाला.

परंतु तिच्या प्रश्नापुढे त्याचे तत्त्वज्ञान हतबद्ध झाले.

ती म्हणाली, 

"वडिलांचे घर सोडून सासरी येणारी मुलगी सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करत असते?"

Saturday, 2 July 2022

अलक क्र.६३


तो खूप काटेकोरपणे कर्मकांड पाळायचा.

असेच एकदा ग्रहणाच्या दिवशी त्याने घरातील सगळे पाणी सांडायला सुरुवात केली.

ते पाहून त्याची किशोरवयीन मुलगी म्हणाली,

"बाबा, पाण्याला 'जीवन' म्हणतात ना!"

Friday, 1 July 2022

अलक क्र.६२


त्याला पांढरा रंग खूप आवडायचा. 

सगळे त्याला 'रंगांधळा चित्रकार' म्हणायचे.

एकदा त्याने 'शारदे'चे चित्र रेखाटले.

लोकांनी अक्षरश: घराघरात 'शारदा पूजन' करण्यास सुरुवात केली.

'रंगांधळा चित्रकार' तेंव्हा कोणालाही आठवला नाही. 

Thursday, 30 June 2022

अलक क्र.६१


आधीच सामाजिक कार्याची आवड आणि त्यातुन वाढत जाणारी कौटुंबिक जवाबदारीमुळे त्याच्यावरील ताण वाढत चालला होता.

तो वडिलांना म्हणाला, "मी सामाजिक संस्थेचा राजीनामा द्यायचा विचार केला आहे."

"मल्टिटास्किंग तुला शिकावीच लागेल", वडील म्हणाले.

पण एक गोष्ट सोडणे त्याला सोईस्कर वाटत होते.

तेंव्हा त्याच्या समोर वडिलांनी नोकरी करून सर्व कौटुंबिक जवाबदारी सांभाळणाऱ्या त्याच्या आईचे उदाहरण त्याच्या समोर ठेवले.     

Wednesday, 29 June 2022

अलक क्र.६०


"संसाराच्या रहाटगाडग्यात स्वतःच्या आवडी-निवडी जपायच्या राहून गेल्या",

निवृत्त झाल्याच्या दिवशी त्याने मित्राजवळ खंत व्यक्त केली.

"वेडा आहेस?", मित्र म्हणाला,

"नीट बघ. बालपणापासूनची 'आपली मैत्री' आपण जपली आहे ना!"

Tuesday, 28 June 2022

अलक क्र.५९

 

पहिल्या पावसावर लिहिलेली एक सुंदर कविता त्याने मित्रांना वाचून दाखवली.

पडणाऱ्या पावसात जसे सगळे चिंब ओले झाले होते तसेच त्याच्या कविताने त्यांची मने देखील ओली झाली होती.

तो मात्र कोरडाच होता. त्याच्या प्रियसीच्या आठवणीत त्याने ती कविता रचली होती.

Monday, 27 June 2022

अलक क्र.५८


आयआयटी इंजिनीअर होऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागत असताना त्याने आजन्म अविवाहित राहून सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला.

एकुलत्या एक मुलाच्या निर्णयाने आई प्रचंड दुखावली गेली.

म्हणाली, " तूच का?"

तो तिला समजावत म्हणाला,

"तू नाही का मला दरवर्षी बैलपोळ्याला माझ्या डोक्यावर अक्षता टाकत विचारायचीस 'अतीत कोण', म्हणून." 

Sunday, 26 June 2022

अलक क्र.५७


'दुर्बोध' असा शेरा लिहून संपादकांनी त्याचे सगळे लेख त्याला साभार परत पाठवले.

त्याने उत्तरादाखल पत्रात धन्यवाद देत केवळ 'अबोध' लिहून पाठवले.

Saturday, 25 June 2022

अलक क्र.५६


"टी-शर्ट आणि जीन्स पॅन्टवर टिकली आणि मंगळसूत्र चांगलं दिसत नाही",

असे म्हणून नववधू तिच्या कामाला निघून गेली.

तो निशब्द होऊन त्याच्या आईकडे पाहत होता.

आई म्हणाली, "देवाकडे पार्थना करते, तुला पहिली मुलगी होऊ दे."

Friday, 24 June 2022

अलक ५५


नेतृत्वगुण नसतानाही केवळ वारसाहक्काने त्याची एका सामाजिक संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

परिणामतः अनेक निष्ठावान कार्यकर्ते संघटना सोडून जात होते.

तरीही तो एक वाक्य सदैव म्हणायचा, "माझे कोणावाचून अडत नाही."

नि एके दिवशी लोकोपयोगी असणारी ती सामाजिक संघटना बंद करावी लागली.

आता लोकं म्हणत होती, "खरंच कोणावाचून कोणाचं अडत नाही."

Thursday, 23 June 2022

अलक क्र.५४

 

'पूर्ण विचार' नावाने त्याने एक सामाजिक संस्था सुरु केली.

या संस्थेच्या माध्यमातून घटस्फोटाचे घेण्याचे प्रमाण कमी करण्यात त्याला यश आले.

नवदाम्पत्याला घटस्फोट घेत असतानां तो एकच प्रश्न विचाराचा,

"जसा 'पूर्ण विचार' करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

तसा 'पूर्ण विचार' घटस्फोट घेत असताना करत आहात का?" 

Wednesday, 22 June 2022

अलक क्र.५३


'कोणत्याही एका विचारवंतांच्या विचारांनी भारावून जायचे नाही', असे त्याने ठरवले.

जगभरातील अनेक विचारवंत वाचुन झाल्यावर तो आता एक चांगला समीक्षक झाला आहे.

तो आता भरभरून लिहितो आहे,

'सामान्य नागरिकांनी कोणत्याही एका विचारवंताच्या का होईना विचारांनी प्रेरित होऊन जीवन जगावे', म्हणून.

Tuesday, 21 June 2022

अलक क्र.५२

 

त्याने पहिल्यांदा टूर्नामेंट जिंकली. सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला.

कोचनी मात्र त्याला पुढच्या टूर्नामेंटसाठी शुभेच्छा दिल्या. त्याला प्रचंड वाईट वाटले.

पुढे २०-२५ वेळेस असेच झाले. तरीही कोच त्याला 'चांगला खेळ खेळण्यास सांगत राहिले.

नि पुढे तो एक टूर्नामेंट हरला.

त्याचं सांत्वन करत कोच म्हणाले, "सदैव असेच चांगले खेळत राहा." 

Monday, 20 June 2022

अलक क्र. ५१

 

पंढरीची वारी करण्याची अकरा पिढ्यांची परंपरा त्याच्या घरी चालत आलेली होती. परंतू त्याचा अशा कोणत्याही कर्मकांडावर विश्वास नव्हता.

एके दिवशी त्याचे वडिल वृद्धापकाळाने जात राहीले.

आता आईला काळजी लागली वारी कशी होणार.

गोड जेवणाच्या दिवशी तो मनोगत व्यक्त करताना म्हणाला, "आई-वडिलांपैकी कुणी गेल्यानंतर त्यांच्या आवडीचा पदार्थ सोडण्याची परंपरा आहे. परंतू मी वडीलांच्या आवडीची गोष्ट म्हणजेच वारी स्विकारणार आहे."

Sunday, 19 June 2022

अलक क्र.५०


घराशेजारील झोपडपट्टीच्या मुलांची सावली आपल्या मुलांवर नको म्हणून ती 'घर बदलूया' म्हणून त्याच्या खूप मागे लागली. परंतु त्याच्याने वडिलोपार्जित घर सोडवेना.

नि मग काही दिवसांनी काहीतरी जाणवून तिने तिचा निर्णयाचे बदलला.

तिने झोपडपट्टीतील मुलांसाठी विनामूल्य शिकवणी आणि संस्कारवर्ग घेण्यास सुरुवात केली.

Saturday, 18 June 2022

अलक क्र.४९


"मी नेहमीच तुझ्या हिताचे सांगत असतो तरी तू माझे ऐकत नाहीस",

तो नेमकेच कळू लागलेल्या मुलाला रागावत होता.

वारंवार घडणाऱ्या या गोष्टीमुळे तो कंटाळून गेला होता.

नि मग पुढे केंव्हातरी त्याच्या वाचनात एक वाक्य आले,

"मुले अनुकरणातून अधिक शिकत असतात."

Friday, 17 June 2022

अलक क्र.४८


त्याने वयाच्या अकराव्या वर्षी केलेल्या भाषणाने सर्वच मंत्रमुग्ध झाले.

त्यांनंतर त्याची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली.

आता तो एक उत्तम वक्ता आहे.

एकदा एका रसिक श्रोत्याने त्याला त्याच्या यशाचे रहस्य विचारले.

त्यावर तो म्हणाला, "गुरूंनी शिकवलेली 'श्रवणभक्ती."

Thursday, 16 June 2022

अलक क्र.४७

 

ती : मला जॉब बदलायचा आहे.

तो : काय झाले आहे?

ती : बॉस ची नजर खूप वाईट आहे.

तो : अगं! सगळ्या जगाचीच तशी असते.

ती : आणि तुझी?

आता तो नजर चोरत निघून गेला.

Wednesday, 15 June 2022

अलक क्र.४६


त्याची इटुकली परी म्हणाली ,

"बाबा, मला आता 'राजा-राणीच्या गोष्टी' नाही आवडत.

मला तू सुपरहीरोच्या गोष्टी सांगत जा."

लेक मोठी होत आहे पाहून, तो विचारात पडला.

नि मग त्याने तिला 'संतांच्या गोष्टी' सांगायला सुरुवात केली.

Tuesday, 14 June 2022

अलक क्र.४५

  

पहिला मित्र : तुला कविता प्रसिध्द झाल्यावर खूप आनंद होत असेल ना!

दुसरा मित्र : मला वाटते, रसिकांनी तुझी प्रशंसा केल्यानंतर तुला अधिक आनंद होत असेल.

तो : दोन्ही नाही. मला कविता शब्द बद्ध केल्यानंतर सर्वाधिक आनंद होतो.

Monday, 13 June 2022

अलक क्र.४४


आठ दिवसाच्या सुट्ट्या संपवून कामाला जाणे त्याला जड जात होते.
आळस टाळण्याचा तो प्रयत्न देखिल करत नव्हता.
परंतु पत्नी कडे पाहून तो कामावर जाण्यास तयार झाला.
ती बापडी गेल्या आठ दिवसांत घरात राहिलेले सगळी कामे करण्यात मग्न झाली होती.

Sunday, 12 June 2022

अलक क्र.४३


'देवपूजेसाठी त्याने काही शिळे फुले घेतली, नेमकेच कळु लागलेले वय त्याचे, परंतु त्याला असे करतांना पाहून आई प्रचंड रागावली',

हा प्रसंग आईला आठवला तेंव्हा तिच्या तरूण मुलाचे पार्थिव शरीर तिरंग्यात गुंडाळलेले होते.

एकाही अश्रू नढाळता तिने भारतमातेसह तिला अर्पण केलेल्या ताज्या फुलाला देखील नमन केले.

Saturday, 11 June 2022

अलक क्र.४२


कळत्या वयात आल्यानंतर तो एकदा जेवतांना आईला म्हणाला,

"आई, मला नुसता भात, विना तूप, दूध, दही, वरणाचा आवडायला केव्हा पासून लागला?"

आई काही बोलणार तोच त्याचे वडील म्हणाले,

"बाळा, खालावलेली आर्थिक परिस्थिती आनंदाने हाताळत मात करणे, हे केवळ घरातील पुरुषांचे काम नसते तर महिलांचे देखील असते. आणि तुझी आई त्याचे आदर्श उदाहरण आहे."

Friday, 10 June 2022

अलक क्र.४१


एव्हाना मानवाने परग्रहावरील मानवाचा शोध लावला होता.

परग्रहावरील मानव सर्वच क्षेत्रात प्रचंड प्रगत होता.

पृथ्वीवरील शास्त्रज्ञ त्या मानवाला 'देव मानव' म्हणत होते.

Thursday, 9 June 2022

अलक क्र.४०


कमी वयात यश आणि प्रसिद्धी मिळाल्यामुळे त्याचा अहंकार खूप वाढला आहे, ही गोष्ट लक्षात आल्यावर त्याच्या गुरुंनी आज्ञा केली, "'गरिबांची सेवा कर."

परंतु अहंकार त्याला ती देखील करू देत नव्हता.

गुरुंनी खोलात जाऊन पहिले.

नी परत त्याला आज्ञा केली,

"आधी माता-पित्यांची सेवा कर."  

Wednesday, 8 June 2022

अलक क्र.३९


वेशभूषा, रंग, खाद्यपदार्थ, महापुरुष, ध्वज मानवाने सगळे काही वाटून घेतले.

स्वपंथाचे श्रेष्ठत्व आणि वर्चस्व स्थापण्याची जणू वरचढच निर्माण झाली होती.

शतकानुशतके उलटली आताचा प्रगत मानव त्याकाळातील मानवाला 'प्राणिमात्र' संबोधीत होता.

Tuesday, 7 June 2022

अलक क्र.३८

 

तरुण वयातच 'समाधी' प्राप्त करण्याची त्याची तीव्र इच्छा झाली.

मग त्याने अष्टांग योगसाधना सुरु केली.

परंतु तो यम-नियम या पहिल्या दोनच पायऱ्यांमध्ये अडकला.

आणि त्याने संतवृत्तीने समाजसुधारणेचे व्रत हाती घेतले.

Monday, 6 June 2022

अलक क्र.३७


तो एका दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन कोवळा संसार तसाच ठेवून दिगंताच्या प्रवासाला निघाला होता.

"तू पुनर्विवाह कर", त्याने तिला शेवटची इच्छा बोलून दाखवली.

तिने गळ्यातील मंगळसूत्र टेबलवर ठेवत त्या भोवती सात प्रदक्षिणा मारल्या.

Sunday, 5 June 2022

अलक क्र.३६


'समर्पण' हा शब्द कळल्यापासून त्याने 'देणगी', 'दान', 'दक्षिणा' हे शब्द आयुष्यातून काढून टाकले.

एव्हढेच काय तर त्याने त्याच्या घराला देखील 'समिधा' नाव दिले आहे.

Saturday, 4 June 2022

अलक क्र.३५


पहिलाच कविता संग्रह प्रकाशित केल्यांनतर त्याला अपेक्षा होती कि,

त्याला पुरस्कार मिळावा.

त्याची प्रत्येक कविता उत्तुंग प्रतिभेचा अविष्कार होतीच.

परंतु त्याला कोणताही पुरस्कार मिळाला नाही.

तो खूप दुःखी झाला.

त्यावर त्याच्या पत्नी म्हणाली,

"रसिक वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांना तू पुरस्कार का मानत नाही?"   

Friday, 3 June 2022

अलक क्र.३४

 

लग्नाच्या एका तपानंतर ती त्याला म्हणाली,

"लग्नापूर्वी तू चंद्र-तारे आणून देण्याच्या आणाभाका घेतल्या होत्यास. आठवतंय तुला!"

त्यावर त्याने अलगद खिशातून गजरा काढत तिच्या वेणीत माळला."

Thursday, 2 June 2022

अलक क्र.३३


तो प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा.

आनंदाच्या प्रसंगाची त्याने कधीही वाट पहिली नाही.

"सांसारिकाला हे कसे काय सध्या होऊ शकते?",

एकदा न राहवून त्याच्या मित्राने त्याला विचारले.

त्यावर तो उत्तराला,

" कारण माझा ठाम विश्वास आहे कि, 'प्रकाश' मुळातच स्वयंपूर्ण असतो."

Wednesday, 1 June 2022

अलक क्र.३२


तो प्रत्येक कामात आळस करायचा. त्याचा कोणताच जॉब टिकत नव्हता.

त्याची पत्नी म्हणाली, "मला प्रपोज करतानाची तन्मयता माझ्यासोबत संसार करताना ठेवशील का?"

त्यानंतर मात्र त्याने कामावर खूपच लक्ष दिले.

आता ती म्हणत आहे, "त्याचे काम म्हणजे जणू माझी सवतच आहे."

Tuesday, 31 May 2022

अलक क्र.३१

 अलक क्र.३१

 

'आपली संस्कृती टिकली पाहिजे', या विषयावर काही तरुणी चर्चा करत होत्या.

न राहवून त्यांचा संवाद ऐकणारी एक तरुणी त्यांच्या जवळ आली,

त्यातील एकीच्या कपाळावर टिकली लावत म्हणाली, "सुरुवात स्वतःपासून करूया."

Monday, 30 May 2022

अलक क्र.३०

 

ओळीने ११ कविता संग्रह त्याने प्रकाशित केले.

उत्तुंग प्रतिभा शक्तीचा अविष्कार होताच.

त्याचा प्रत्यक्ष वेळी प्रयत्न होता 'प्रतिमा आणि प्रतिमान' प्रतिभाधीन आहे, पुरस्काराभिमुख नाही.

Sunday, 29 May 2022

अलक क्र.२९


'बायकोचं ऐकणारे नवरेच सुखी असतात', आख्यानांत दृष्टांत देत किर्तनकार म्हणाले.

ती त्याच्याकडे विजयी मुद्रेने पाहत होती.

तो शांतपणे तिच्या कानांत पुटपुटला, "किर्तनकार संन्यासी आहेत बरं का?"   


Saturday, 28 May 2022

अलक क्र.२८


तो प्रत्येकाला सूचना करायचा त्यांनी त्यांचे काम चांगले करावे म्हणून.

एके दिवशी त्याची पत्नी त्याच्या या स्वभावाला कंटाळून त्याला सोडून निघून गेली.

आता तो चांगला माणूस व्हावा, अशी सगळेजण सूचना करत आहेत.

Friday, 27 May 2022

अलक क्र.२७

 

चांभारकीचा वडिलोपार्जित व्यववसाय करण्यास तो तयार नव्हता.

वडील एके दिवशी त्याला एका साधुमहारांजांकडे घेऊन गेले.

सर्व काही ऐकून साधुमहाराजांनी त्यांना 'व्याधगीता' सांगितली.

आता त्याला त्याच्या वडिलांनी परवानगी दिली आहे, त्याच्या आवडत्या क्षेत्रात कर्म करण्याची. 

Thursday, 26 May 2022

अलक क्र.२६


तो मार्केटिंग च्या नोकरीमुळे सतत फिरती वर असायचा.

परिणामतः उन्हात फिरल्यामुळे त्याचा चेहरा खूपच काळवंडला होता. म्हणून त्याने एके दिवशी फेशिअल केले.

काही दिवसांनी त्याची भेट एका साधू महाराजांशी झाली. 

त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून त्याला लक्षात आले कि, चेहऱ्याला आतून देखील फेशिअल करावे लागते.

Wednesday, 25 May 2022

अलक क्र.२५


"...म्हणून घेतला वसा टाकू नये", आजी गोष्ट संपवत नातीला म्हणाली.

नातीने प्रश्न केला, " आजी, असा वसा काय केवळ मुलींसाठीच असतो?"

"नाही गं पोरी", आजी उत्तरली,

"मुलांसाठी पण असतो. पण त्यांच्या कधी कुणी गोष्टी लिहिल्याचं नाही."

Tuesday, 24 May 2022

अलक क्र.२४


कल्पवृक्ष, कामधेनू, चिंतामणी यांचा तो शोध घेत फिरत होता.

बऱ्याच दिवसांच्या कालावधी नंतर त्याला एक साधूपुरुष भेटले.

त्याला आता या तिन्ही गोष्टी व्यर्थ वाटत होत्या.

Monday, 23 May 2022

अलक क्र. २३


त्याला वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी जीएम म्हणून बढती मिळाली.

सहकारी म्हणाले, "आता तुझी प्रथम भूमिका काय असेल?"

तो म्हणाला, "कामातील निर्णयांचा अधिकार ज्याच्या त्याच्या स्तरावर ठेवत नियंत्रण विरहित राहणे."  

Sunday, 22 May 2022

अलक क्र.२२

तो प्रगल्भतेचा सातत्याने विचार करत होता.

विचारविचारात आयुष्याची संध्याकाळ जवळ आली.

आता तो अगदी साधेपणाने जगत होता.

आणि त्याचे मित्र म्हणत होते "आता तो अधिक प्रगल्भ वाटतो आहे."

Saturday, 21 May 2022

अलक क्र.२१


तो तिला 'सखी' म्हणून संबोधायला लागला.

ती: म्हणजे आपले लग्न नाही होऊ शकणार?

तो: तसे मुळीच नाही

ती: मग असे 'सखी' का म्हणतो आहेस?

तो: एक प्रियसी किंवा पत्नी सगळ्यात चांगली मैत्रीण असते म्हणून. 

Friday, 20 May 2022

अलक क्र २०

 त्याला गड-किल्ले आवडायचे.

ती निसर्गात रमायची.

म्हणून फिरायला जाण्यावरून दोघांत नेहमीच वाद व्हायचे.

एकदा तो तिला म्हणाला,

"आपल्याला मनासोबत विचारानेही संलग्नित व्हावे लागेल." 

Thursday, 19 May 2022

अलक क्र १९


मुलाचे आता शिक्षण पूर्ण झाले आहे तेंव्हा त्याने आपल्या पिढीजात दुकानात लक्ष घातले पाहिजे,

म्हणून तो अनेक प्रकारे मुलासोबत तो विषय काढायचा.

परंतु तारुण्याच्या उनाडपणा पुढे मुलगा ऐकत नव्हता.

बऱ्याच दिवसांनंतर मुलगा स्वतःहुन दुकानावर आला.

आणि म्हणाला,

"मुलं 'मौज' केवळ वडिलांच्या पैशावर करू शकतात.

म्हणून मला एव्हढ्या लवकर दुकानाची जवाबदारी स्विकारायची नव्हती."

Wednesday, 18 May 2022

अलक क्र.१८

 

युद्ध सुरु झाल्याची बातमी मिळताच सैनिक सीमेवर जाण्यासाठी तयार झाला.

त्याची दोन वर्षाची मुलगी म्हणाली,बाबा, मला येताना काय आणणार?”

डोक्यात युद्धाचाच विचार सुरु असल्यामुळे तो म्हणाला,

"तिरंगा".

त्यावर क्षणाचाही विलंब होऊ देता त्याची पत्नी म्हणाली,

“हो. फडकणारातिरंगा’. गुंडाळलेला नाही.” 

 

Tuesday, 17 May 2022

अलक क्र.१७


२१/९० चा फॉर्म्युला कळाल्यानंतर तो आपल्या आवडीच्या गोष्टींवर लक्ष द्यायला लागला.

आणि सगळे जण म्हणत होते,

'तो आता प्रत्येकाच्या मनाचा विचार करतो आहे.'

Monday, 16 May 2022

अलक क्र. १६

 

तो अत्यंत सुंदर काव्य रचत होता.

त्याचे मित्र म्हणाले,

"तुझी कविता सोशल मीडियावर टाक. खूप व्हायरल होईल."

तो नकार देत म्हणाला,

"मी 'प्रकाशित' होण्यावर भर देईन."

Sunday, 15 May 2022

अलक क्र.१५


एव्हाना तिच्या भावाने देखील कार घेतली. तिच्या सगळ्या मित्र-मैत्रिणी नातेवाईकांपैकी तिच्याकडेच आता कार नव्हती.

त्यामुळे तिला प्रचंड वाईट होते.

तिचे दुःख एव्हढे होते की, मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तरी ती माहेरी जाण्यास तयार नव्हती.

तो ही तिला समजावून सांगून थकला.

नकळत तिच्या भावाला ही गोष्ट समजली.

भाऊ तिला माहेरी नेण्यासाठी आला. आणि म्हणाला, "मी 'जिवतीच्या गोष्टी'तील भाऊ नाही. आणि म्हणूनच तू भौतिकगोष्टी सर्वस्वी म्हणू नकोस."

Saturday, 14 May 2022

अलक क्र. १४

 

तो 'गोल्ड मेडल' विकण्याकरिता जात होता.

त्याला आडवत त्याची पत्नी म्हणाली,

"कितीही हालाखीची परिस्थिती येवो कोणतीही स्त्री मंगळसूत्र कधी विकत नसते."

Friday, 13 May 2022

अलक क्र. १३

 

चिता दीर्घायुष्य जगून मृत्युमुखी पडला.

पुढचा जन्म हरिणाचा मिळावा, अशी त्याने भगवंताला विनंती केली.

त्याला एव्हाना स्वतःची गती आवडत नव्हती.

चित्याला हिरणाप्रमाणे 'जीव तोडून धावायला' शिकायचे होते.

Thursday, 12 May 2022

अलक क्र. १२


'कोवळ्या वयातच घराची संपूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर पडली', या गोष्टीची त्याला आठवण झाली.

कारण आता त्याचा मुलगा मोठा होऊ लागला आहे.

त्याला जबाबदारीची जाणीव कशी  करून द्यावी, या गोष्टीचा तो विचार करत होता.

मग त्याने एक गोष्ट निश्चित केली, 'कोणत्याही परिस्थितीत मुलासमोर आपल्या कष्टाचा पाढा वाचायचा नाही.'

Wednesday, 11 May 2022

अलक क्र. ११


तो नेहमीच त्याचीच गोष्ट सांगायचा. 'तिची गोष्ट' त्याने कधीच मांडली नाही.

एकदा काहीतरी जाणवून त्याने 'तिची गोष्ट' लिहिण्यास घेतली.

त्यावर त्याला थांबवत ती म्हणाली,

"माझ्या गर्भात असल्यापासून मला देखील 'तुझीच गोष्ट' आवडते. आणि नाहीतरी तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी सुप्तावस्थेत आहेच."

Tuesday, 10 May 2022

अलक क्र. १०


एमएससी ऍग्री पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तो शेती करायला लागला. त्याच्या सर्व मित्रांनी त्याला वेड्यात काढले.

प्रियसी देखील म्हणाली, "आता आपल्या लग्नाचा विचार न केलेलाच बरा."

त्यावर तो म्हणाला, "मला माझ्या निर्णयाचे परिणाम माहीत होते. तरीदेखील मी सुखाऐवजी सेवा निवडली."

Monday, 9 May 2022

अलक क्र. ९

 त्यांना भविष्य पाहण्याची खूप आवड होती.

एव्हाना त्यांचे वय ८० झाले होते.

Sunday, 8 May 2022

अलक क्र. ८

 

कामकेल्या नंतर वडील त्याला मागे काय झाले आहे हे पाहायला लावायचे.

खरे तर त्याला या गोष्टीचा खूप कंटाळा यायचा.

परंतु त्याच्या वडिलांनी असे विचाराने कधीही बंद केले नाही.

आता तो मोठा होऊन एका कंपनीचा सीईओ झाला आहे.

त्याच्या कामाच्या पद्धतीत तो सर्वाधिक 'सिंहावलोकना'वर भर देतो. 

Saturday, 7 May 2022

अलक क्र. ७


समाजकारणापेक्षा राजकारणच जास्त केले जाते,
म्हणून त्याला राजकारणात प्रवेश करायचा नव्हता.
अनेक वर्ष सक्रिय राजकारणात असलेले त्याचे वडील म्हणाले,
"एक गोष्ट सदैव लक्षात ठेव. नात्यात सर्वात जास्त राजकारण सामान्य माणूसच करत असतो."

Friday, 6 May 2022

अलक क्र. ६

 'महालक्ष्मी' सारख्या मोठ्या सणाला त्याने सवाष्ण-ब्राह्मण म्हणून गल्लीत कामाला येणाऱ्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याला सांगितले.

त्याच्या निर्णयाला दुजोरा देत त्याची पत्नी म्हणाली,

"लक्ष्मीच्या सेवेकऱ्यांना बोलावून आपण 'महालक्ष्मी'चीच सेवा करत आहोत."

Thursday, 5 May 2022

अलक क्र. ५


 आजोबांनी सांगितलेली चिऊ-काऊची गोष्ट आता ती आजोबांनाच सांगायला शिकली आहे. 

पण गोष्ट संपताना ती प्रत्‍येक वेळेस हळवी होत प्रश्न विचारते,

"आपण काऊदादाला मेणाचे घर बांधायला शिकवायचे का?"

अलक क्र. ४



कर्मकांडप्रधान कुटुंबातील मुलीने कबड्डी मध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

घरात जणू भूकंपच आला होता.

शेवटी आजोबांनी सर्वांना बोलावून निर्णय सांगितला,

"आपल्या सर्वांमध्ये 'खेळाडूवृत्ती' निर्माण झाली पाहिजे."

Tuesday, 3 May 2022

अलक क्र. ३

 प्रेम विवाह नुकताच झाला होता. ती आता त्याला लग्नापूर्वीप्रमाणे फोनवर बोलत नव्हती. तिचे फोन तर यायचे परंतु घरातील काही गोष्टी आणण्यासाठी.

तो न राहवुन एके दिवशी म्हणाला, "तू आता प्रियसी राहिली नाहीस."

त्यावर ती म्हणाली, "प्रेमात आणि युद्धात सगळ काही माफ असतं. पण लग्नात नाही."


Monday, 2 May 2022

अलक क्र. २

 

वनवासी भागात विद्यादान करत जीवन व्यतीत करण्याचा त्याने निर्णय घेतला. अर्थातच घरातील सर्वांनीच विरोध केला.

शेवटी वडील त्याला म्हणाले, "वनवासी लोक खरच शिकतील का?"

त्यावर तो एवढेच म्हणाला "मी मुळाक्षरांसोबत दृष्टिकोण देखील शिकवणार आहे."


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९ 

Sunday, 1 May 2022

अलक क्र १.


दाढीचे केसही पांढरे होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने डाय करणे बंद करायचे ठरवले.

परंतु त्याच्या मन काही केल्या प्रौढत्व स्वीकारण्यास तयार होत नव्हते.

तो अजूनही तारुण्य आणि प्रौढत्व या गोंधळात अडकला  होता.

परंतु त्याने खूप विचारांती निर्णय घेतला.

मग त्याने या दोन्हीना सोडून 'प्रगल्भत्व' स्वीकारले. 


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९ 

Sunday, 24 April 2022

शेवटची तारीख


                'शेवटची तारीख कधी आहे ?', हा सामान्यपणे कोणतीही गोष्ट करत असताना विचारला जाणारा प्रश्‍न असतो. अगदी शालेय जीवनापासून ते व्यावसायिक जीवनात प्रत्येक काम पूर्ण करताना विचारात घेतली जाते ती शेवटची तारीख.

                अर्थात एक ठराविक मर्यादा, कालावधी असल्याशिवाय व्यक्ती म्हणून आपणही ती गोष्ट पूर्ण करू शकणार नाही. प्रत्येक व्यक्तीला तिची योग्यता वा क्षमतेच्या व्यतिरिक्त एक प्रयत्न म्हणून काही कालावधी असावाच लागतो. बहुदा याच कारणास्तव प्रत्येक गोष्ट किंवा व्यावसायिक जगात प्रत्येक काम ठराविक कालमर्यादेत पूर्ण करायचे असते. म्हणूनच ते काम पूर्ण करण्याची एक नेमकी तारीख दिलेली असते. तीच शेवटची तारीख असते. म्हणजे त्या दिवसानंतर ते काम पूर्ण झाल्यास त्याला तत्वतः अर्थ नसतो.

                पण याच गोष्टीचा दुसरा अर्थ असा की, आपण शेवटच्या तारखेपर्यंत थांबायचे नसते. शेवटची तारीख हा दिवस म्हणूनच 'डू ऑर डाय' असाच असतो. आणि मुळात शेवटची तारीख येईपर्यंत प्रत्यक्ष आपल्या हातात अनेक दिवस असतात. आणि प्रत्येक काम हे अवघडच असतेच, असे नाही. तात्पर्य प्रत्येक गोष्टीला शेवटच्या तारखेपर्यंत थांबायची आवश्यकता नसते.

                अगदी छोट्या-छोट्या स्वरूपाच्या अनेक गोष्टी असतात, ज्या कळाल्यानंतर लगेच पूर्ण करता येत असतात. पण एकंदरीत एक मानसिकता बनवून गेलेली आहे की, 'अजून वेळ आहे. करू काही दिवसांनी'. पण असा विचार करताना त्या शेवटच्या दिवशीची परिस्थिती कशी असेल हे थोडी सांगता येणार आहे. किंवा आपण ती गोष्ट विसरून गेलो तर?

                शिवाय आपल्याला सर्व काही येत असताना 'मीच का आधी पूर्ण करायचे?' अशी ही मानसिकता असते. बहुदा या मध्ये आपल्या कामात काही चूक असल्यास परत आपल्याला बोलणे खावे लागेल, ही भावना असते. जेणेकरून आपण कोणाच्या नजरेत भरणार नाही. पण याच उलट बहुतांश वेळा प्रत्येकाचे काम क्षमतेनुसार व्यवस्थित असतेच, पण पहिल्यांदा करण्यात पुढे जाण्याची, प्रगतीची संधी आहे हे मात्र पाहिले जात नाही. करिता शेवटच्या तारखेपर्यंत जरी आपले काम तयार असले तरी ते न देता थांबायचे आणि नेमके शेवटच्या दिवशी जमा करायचे, ही मानसिकता बऱ्यापैकी रुढ झालेली आहे.

                एक व्यक्ती म्हणून प्रत्येकात काही ना काही कमतरता असतातच. जर काम पुरेसे आधी पूर्ण करून जमा करायचा प्रयत्न केला तर कदाचित त्या उणिवा प्रकट होतील. ही देखील भीती असते. म्हणून मग आपल्याला जसे येते तसे ते काम पूर्ण करायचे आणि नेमके शेवटच्या दिवशी जमा करायचे म्हणजे मग असलेल्या उणिवा झाकल्या जातात. परंतु या सोबत ही गोष्ट लक्षात येत नाही की प्रगतीची गती देखील मंदावते. आणि असलेल्या उणीवांचे रुपांतर कौशल्यात करण्यास कधीही संधी प्राप्त होत नाही.

                मदत, सहकार्य बहुदा हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. पण तो शेवटच्या तारखे मुळे अक्षरशः मारला जातो.

                अर्थात जी गोष्ट आपण अगदी सहजपणे एक ठराविक प्रयत्न, कष्ट करून शेवटच्या तारखेच्या पूर्वीच पूर्ण करत असू तर कदाचित ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. शिवाय ज्यांना ती गोष्ट पूर्ण करण्यास अडचणी येत असतील त्यांच्या करिता ती व्यक्ती एक प्रकारे मदतनीस म्हणून समोर येऊ शकते. आणि साहेबांपर्यंत पोहोचण्या पेक्षा सहकार्यांपर्यंत पोहोचत मदतीची धाव घेणे कधीही सोपे असते. तेच काम ती व्यक्ती शेवटच्या तारखेपर्यंत न थांबता करत असेल तर होऊ शकते. पण इतरांची जबाबदारी नको असा भाव कुठेतरी मनात निर्माण होतो. आणि आपले काम तयार असताना देखील नेमके शेवटच्या तारखेला जमा केले जाते.

                या अशा वर्तणुकीमुळे समाजव्यवस्थेचे नुकसान होत असते. शिवाय आपली क्षमता कदाचित नसेल तरी देखील ते शेवटच्या तारखेपर्यंत न थांबल्यास आपल्यातल्या नव्या व्यक्तीची ओळख कधीही होणार नाही. म्हणून 'अजून वेळ आहे करून शेवटच्या तारखेला' या मानसिकतेतून बाहेर नक्कीच यायला हवे....


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९ 

Sunday, 10 April 2022

माघारी होणारी चर्चा

 


कुणा एका महान संतांचे वचन आहे, 'तीच व्यक्ती सर्वोत्तम जिच्या माघारी देखील तिच्याविषयी चांगलेच बोलले जाते'. गीतेतील 'उत्तम पुरुषा'ची   लक्षणे सांगितली आहेत बहुदा त्याचे हे वचन म्हणजे अगदी प्रत्येक सांसारीकासाठीचे अगदी साध्या भाषेत   मांडलेले सर्वोत्तम तत्त्वज्ञान आहेपण मग विचार येतोहे वचन संतांसाठी सामान्य असेल पण सामान्यांसाठी असे राहणेवागणे जरा दुर्मिळचतरीदेखील हे वचन सामान्य नागरिकांसाठी तर सांगितले गेले आहे.

'सज्जनहा शब्द बऱ्यापैकी रुढ झालेला आहेपण त्यामागे अशी पार्श्वभूमी असेल अशी कल्पना   करण्यास मन तितकेसे तयार होत नाहीकारण एक तर 'दोष नाहीअशी व्यक्ती सापडणे अशक्यआणि  त्यातल्या त्यात 'दोषांवर चर्चा होणार नाही', ही अपेक्षा देखील चुकीचीअर्थात व्यक्तीच्या दोषांवर माघारी चर्चा होणे स्वाभाविकच.

परंतु इथे 'माघारी होणारी चर्चाकेवळ व्यक्तीच्या दोषांवर हा विषय अपेक्षित नाहीतर त्या व्यक्तीने  जे नकळतपणे आपल्याला दिलेले दुःख असते त्यावर इतरांच्या समोर त्या 'व्यक्ती विषयी होणारी चर्चाहे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे.

खरेतर मराठीत त्याकरिता अत्यंत सुंदर असा शब्द आहे - 'उखाल्या पाखाल्या'.

मनावर झालेले आघात अत्यंत क्लेशकारक असतातचएक तर ते दिसत नाहीत आणि कदाचित याच  कारणामुळे ते अशा पद्धतीने मांडले जातात  व्यक्त केले जातातज्यामुळे देखील होणारी हानी भरून   निघणारी नसते.

पण परिणामांचा फारसा विचार  करता ही चर्चा करणे फार महत्त्वाचे आहेअसे वाटून ती सुरू राहतेठेवली जातेआणि नकळत दुःख अधिक वाढत जाते.

माघारी होणाऱ्या चर्चा मागे त्या व्यक्तीने आपल्याला दिलेला त्रासहे दुःख मोठे असतेचपण ते मनात  अक्षरशः साठवून ठेवले जातेते सोडून दिले जात नाहीमोकळी वाट करून दिली जात नाहीआणि जेव्हा  मोकळी वाट करून दिली जाते ती नेमकी दुसऱ्या इतर कोणत्यातरी व्यक्तीच्या समोर.

परंतु या ठिकाणी एक मेख आहेज्या व्यक्ती समोर आपण ते दुःख व्यक्त करत असतोत्या व्यक्तीला तसा अनुभवत्रास त्या त्रास देणाऱ्या व्यक्ती कडून झालेला असेलच असे नाहीअर्थात दुःखाचा प्रसंगती   घटना व्यक्तीसापेक्ष असतेअर्थात त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव तसा असेलही असे ठामपणे सांगणे   चुकीचेपरंतु ते केले जातेआपल्या मनातील 'खदखदइतरांसमोर मांडली जाते.

आणि कधी कधी ती तर अत्यंत रंगवून दाखविले जातेया सगळ्या प्रकारात हा देखील उद्देश असतो कीआपल्याला स्वतःला देखील सहानुभूती मिळवायची असते.

पण दुःख इथे संपत नाही तर ते अधिक वाढत जातेकिंबहुना ते आपण स्वतःहून द्विगुणित करत   असतोआणि कदाचित ज्या व्यक्तीला आपण ते सगळे ऐकवले त्याच्या मनात देखील ते खूप खोलवर फसते.

खरेतर 'मोक्षप्राप्ती', 'स्वर्गप्राप्तीही मानवी जीवनाचे अंतिम ध्येये असतीलहीपण ती मृत्यूनंतरचीअर्थात ती मिळावी यासाठी   सगळेच प्रयत्न करणारपण ती मिळाली का नाहीहे कधीच कोणाला सांगता येत नाहीम्हणूनच जिवंतपणाचे ध्येय लक्षात घेणे महत्त्वाचेआणि कदाचित ते असेल तर ते एक मात्र म्हणजे 'निर्भेळ आनंद'. 

आणि हा असा 'निर्भेळ आनंदमिळवायचा असेलतर नात्यात गोडवा निर्माण करावा लागणारतरच तो संपूर्ण जीवनात पसरेलआणि मग स्वाभाविकच ज्याला हे प्रेमळ नातं निर्माण व्हावं असं वाटतं त्याला ते   दुःख देखील विसरावे लागणारतो कटू अनुभव सोडून द्यावा लागणारत्याची इतरांच्या समोर केली जाणारी  अर्थात माघारी होणारी चर्चा सोडावी लागणार.

परंतु सुखापेक्षा मनुष्याला दुःख कुरवाळायला अधिक अधिक आवडतंआठवून पहाएखाद्या छानशा विनोदावर आपण पहिल्यांदा अगदी खळखळून हसतोपण दुसऱ्यांदातिसऱ्यांदा आपण त्यालाच 'रटाळवाणाम्हणतोपण हेच दुःखाच्या बाबतीत मात्र होत नाही!

म्हणून अशा प्रसंगात परत एकदा 'संत वचनचकामाला येतंसमर्थांचे वचन आहे, 'मना बोलणे नीच सोशीत जावे'. किंवा शारदामातांनी देखील अगदी सोप्या शब्दात सांगून ठेवले आहे, 'प्रेमात सदैव नमतं घ्यावं म्हणजे नातं टिकतं.' अर्थात कोणत्याही नात्यात माघार घ्यावी पण माघारी चर्चा करू नये.

शिवाय अजून एक गोष्ट महत्त्वाची आपल्या मनातील दुःख मोकळे करायचे झाल्यास ते थेट त्याच व्यक्ती जवळ केले जीने आपल्याला त्रास दिला आहेतरबहुदा अशा वागण्याने आपल्या मनातील कटुता वाढणार नाहीआणि नेमकेपणाने त्या व्यक्तीलाही सुधारण्याची संधी दिल्यासारखे होईल...


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९


सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...