‘खोड्या करू नकोस, नाही तर तुझं घर उन्हात बांधेन’, बहुधा हे वाक्य सर्वांनीच आपल्या बालपणी
ऐकलेलं आहे.
पण पूर्णतः नकळतं वय ते. खेळणं, खोड्या करणे हेच एकमेव काम. केलेल्या खोड्यांनाशिक्षा होते, हे कमीअधिक प्रमाणात समजलेलं. पण
‘उन्हात घर बांधेन’ या वाक्या मागे किती मोठी शिक्षा असेल याची तसूभरही कल्पना
नसायची.
तसे पाहता खोड्या करणे हा लहान मुलांचा मुलभूत अधिकारच. पण एका
छोट्याश्या गुन्ह्याला एवढी मोठी शिक्षा !
अपेक्षांची प्रखर किरणं तेंव्हा जीवनात पोहंचलेली नव्हती. परंतू
उगवतीच्या सूर्यनारायणापेक्षा दुपारचे सूर्यदेव कुणीतरी वेगळे असतात, हे हलकसं कळायला लागलं होतं.
परिस्थितीचे चटके कळावेत, हे ही ते वय नव्हतं. परंतू काहीतरी टाळलं पाहिजे, हे नक्की उमगलेलं.
अजाण मन आणि गोड खोड्या एवढंच काय ते समीकरण असायचं, बालपणीचं.
या सुखाच्या काळातील आठवणींनी आजही मन भरून येतं. आपणच केलेल्या
खोड्यांवर हसूही येतं.
पण आता खोड्या होत नाहीत, तरीही ‘घर उन्हात’ आहे.
बहुधा सावलीची जागा आपण खूप मागे सोडली आहे. एखादा छोटासा आडोसा जरी
मिळाला तरी बरं वाटतं. परंतू आता उन्हातलं घर सोडताही येत नाही.
कोवळ्या उन्हात कोवळ बालपण नक्कीच हरवलंय. ते रोज सकाळी शोधायचा
प्रयत्नही होतो. पण नंतर जाणिव होते की, आपल्याला तर भर उन्हासोबत संसार करायचा आहे. म्हणून व्यावहारिक जगात मनाला थोडंस बाजूला ठेवून बुद्धीच ऐकावं
लागतं. भावनांची घालमेल होत असतेच. पण तर्क मात्र सुसंगतपणे सहजपणे जिंकत जात असतो.
म्हणूनच की काय एक छानशी सावली मिळावी म्हणून अंगणात आता एका आनंदाचं झाड लावीन म्हणतो.
हे ठाऊक आहे की, आज मला त्याची सावली लागेचच मिळणार नाही. पण पुढच्या पिढीसाठी काही
तरतूद हवी ना.
ते ही खोड्या करणार आहेतच आणि त्यांनाही वास्तवाला सामोरं जायचं आहे.
खोड्या न करताही भोगावी लागणारी शिक्षा त्यांच्याही वाट्याला कदाचित येईण.
हे आनंदच झाड लावताना त्यांच्या वाट्याला वाराश्यामधे उन्हातलं घर
नको आणि ‘खोड्या केल्या तर तुझं घर उन्हात बांधेण’ हे वाक्यही नको.
©हेमंत विनोद पोहनेरकर