Sunday, 26 February 2023

पाल्य, पालक आणि पॅकेज

 



 काळजी हे प्रेमाचे प्रतीक असते.  तर काळजी करूनही न बदलणारी परिस्थिती अस्वस्थतेला जन्म देत असते. कौटुंबिक स्तरावर सर्वजण हा क्रम अनुभवत असतातच. परंतु हीच अवस्थाता जेव्हा सामाजिक स्तरापर्यंत पोहोचते त्यावेळेला निर्माण झालेली सामाजिक अस्वस्थता अधिक घातक असते.

आपण धावत्या डिजिटल युगाचे प्रतिनिधी झालो आहोत म्हणून की काय, नुकत्याच दोन प्रमुख घटना अनुभवायला आल्या, ज्या पाल्य आणि पालक पॅकेज या विषयीच्या आहेत.

नेहमीप्रमाणे कामानिमित्त प्रवासामध्ये होतो. एक विद्यार्थी बसमध्ये शेजारी येऊन बसला. स्वाभाविकपणे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि लक्षात आले की, तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आहे.

मग त्याला आवडणाऱ्या तंत्रज्ञान विषयावर तो अधिक बोलला. मी पुढे विचारले, “बहुदा तुला शास्त्रज्ञ व्हायचे आहे, असे वाटते.” लगेच त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.  मान डोलावत तो 'हो' देखील म्हणाला.  मी पुढे म्हणालो, "मग शास्त्रज्ञ होऊन काय करणार आहेस? कशाचा शोध लावणार आहेस?" त्यावर त्याचे अगदी स्पष्ट उत्तर होते, "शास्त्रज्ञांना होऊन मान आणि मोठे पॅकेज मिळवणार."

या क्षणी पहिल्यांदा मन अस्वस्थ झाले. त्या विद्यार्थ्याला मी कुठल्याही प्रकारे काहीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. मी तसाच विषय टाळून अस्वस्थ मनस्थितीमध्ये विचार करत बसलो. पुढे काही दिवस उलटले. आणि या विषयाची तीव्रता हळूहळू कामांमध्ये विसरतही गेलो. 

परंतु ही अस्वस्थता दुसऱ्यांदा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून वर आली. ज्यावेळीला मी एका माझ्या बालमित्राला भेटलो.

अनेक वर्षानंतर भेटल्यामुळे त्याच्यासोबत मन मोकळेपणाने गप्पा झाल्या.  जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . तो  देखील अत्यंत हुशार असा विद्यार्थी होता आणि आता एका मोठ्या खाजगी कंपनीमध्ये जीएम म्हणून कार्यरत आहे.  सगळ्या गप्पा झाल्यानंतर तो म्हणाला, "पण आता माझे ध्येय आहे मला एक कोटीच्या पॅकेज पाहिजे."  म्हणालो, "आता किती आहे?" त्यावर त्याची उत्तर होते, "खूपच कमी आहे. 50 लाख." माझा पुढचा प्रश्न होता, "मग एक कोटी पॅकेज घेऊन काय करणार. 50 लाखात भागत नाही का?" त्यावर त्याचे उत्तर होते, "जीएम पदाला ते शोभत नाही. किमान एक कोटीच्या पॅकेज तर नक्कीच पाहिजे." 

माझी दुसऱ्यांदा निर्माण झालेली आणि वाढलेली अस्वस्थतता न थांबणारी होती.

एकाच प्रकारचे दोन प्रसंग अनुभवायला आल्यामुळे मूळ मुद्दा लक्षात आला. पालकच मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने पाल्यांसमोर आपल्या पॅकेजचा विचार करतात, चर्चा करतात. आणि स्वाभाविकच आपल्याला मोठे होऊन काय करायचं आहे हे ठरवत असताना, ते का करायचं आहे, तर आपलं ध्येय, स्वप्न साध्य करण्यासाठी नव्हे. तर अधिक पॅकेज मिळवण्यासाठी करायचे, हे नकळतपणे पालकांच्या मार्फतच पाल्यांच्या मनावर कुठेतरी बिंबवल्या जातं. 

म्हणून पहिला प्रसंग घडू नये, असे करायचे असेल तर दुसरा प्रसंगातील उद्दिष्ट निर्भेळ असले पाहिजे.  

मनुष्य हा  नेहमीच अनुकरणातूनच अधिक शिकत जात असतो.  आणि म्हणूनच पालक घरामध्ये ज्या पॅकेजची चर्चा करतात तेच पॅकेज त्यांच्या पाल्यांच्या मनावर कुठे ना कुठेतरी बिंबवल्या जाते. म्हणून नकळतच आपण कुठेतरी एक सदोष अशी समाजव्यवस्था निर्माण करत आहोत. 

स्वप्न, संशोधन, सेवा, कला, क्रीडा, आनंद यासाठी करिअर नाही तर पॅकेजसाठी करिअर हा नवा ट्रेंड रुजू होत आहे. 

खरे तर खाजगी कंपनीत जीएम पदावर काम करणाऱ्या माझ्या मित्राला या गोष्टीची कदाचित जाणीव नाही की, ज्या कंपनीमध्ये तो काम करतो त्या कंपनीमध्ये व्हिजन, मिशन आणि व्हॅल्यूज वर अधिक काम केलं जातं. आणि बहुदा सर्वच खाजगी क्षेत्रांमध्ये या तीन गोष्टी प्रकर्षाने असतात. आणि या सर्व खाजगी कंपन्या मोठं होत असताना त्यांना सामाजिक स्तरावर ते काहीतरी मोलाचं  योगदान करायचं असतं म्हणून त्यांनी त्यांचं व्हिजन ठरवलेलं असतं, त्यांचं मिशन स्टेटमेंट त्यानुसार असतं, आणि त्या व्हॅल्यूजवर मूल्यांवर आधारित ते काम असतात. 

परंतु प्रत्यक्षात जीएम झालेला मित्रा  वैयक्तिक आयुष्यात या व्हॅल्यूजचे अनुकरण करत नाही. म्हणून कदाचित सर्व पालकांना आत्मचिंतनाची गरज आहे की, आपण आपल्या पाल्याला, भावी पिढीला केवळ पैसा निर्माण करणारी मशीन तर करत नाहीयेत ना!

ही सामाजिक अस्वस्थता शिगेला पोहोचू नये एवढीच पालकांकडून अपेक्षा... 


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 19 February 2023

'मी शिवाजी' - एक संकल्पना

 


एखादी 'संकल्पना' विचारविमर्ष करून अमलात आणायची, ही अत्यंत अवघड किंबहुना जवळजवळ अशक्य अशी गोष्ट असते. कारण संकल्पना म्हंटलं की, ती आदर्श असणारच. पण विचार जेव्हढा आदर्श तेव्हढे त्यावर विचार करणारे किचकट किंवा तथाकथीत बुद्धीजीवी. म्हणून चांगली संकल्पना अमलात आणणे जेव्हढे अवघड नाही, तेव्हढे त्या संकल्पनेला मूर्त रूप देणे अवघड कार्य असते.

परंतु तिच संकल्पना जर कुठलाही विचारविनिमय न करता प्रत्यक्ष उदाहरणांमधून समोर मांडली तर ती सिद्ध होते. जगमान्य होते. त्यातही उदाहरण केवळ एकटे-दुकटे असेल तर परत अवहेलना होते. कारण त्याकडे 'अपवाद' म्हणून पाहिला जातो. पण हेच जर अनेकदा एक-दोन नव्हे तर हजारो उदाहरणांमधून सिद्ध होत असेल, तर ती संकल्पना खऱ्या अर्थाने परिणामकारक आणि फलदायी असते. किंबहुना आचारणीय असते. आणि अशीच प्रत्यक्ष अनुभूतीतून आचरणातून साकारलेली संकल्पना म्हणजे 'मी शिवाजी'.

जिची प्रत्यक्ष अनुभूती हजारो मावळ्यांनी घेतली. अर्थात हजारो मावळे 'मी शिवाजी' ही संकल्पना शब्दशः जगले. या ठिकाणी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, स्वराज्य, सुराज्य यापैकी कुठल्याही गोष्टी समजावून सांगाव्या लागलेल्या नाहीत. त्याचे महत्त्व आणि काळाची गरज ही पटवून द्यावे लागलेली नाही. ती गोष्ट स्वतःत विद्यमान होती. स्वतःची साधना, तपस्या एवढी होती की, ती अनेकांनी स्वयंप्रेरणेने स्वीकारली.

कदाचित देव देखील देवाचे देवत्व अबाधित ठेवतो, ते परमतत्वाचे नित्य ध्यान करून. हीच जर गोष्ट पुढे मांडली तर लक्षात येते की प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांनीही तेच केले. तीनशे वर्षांची काळरात्र पसरलेल्या, यावनी संकटांनी गाजलेल्या समाजाला जागृत करणे केवळ एक राजा म्हणून नावारूपाला येऊन कार्य करणे शक्य नव्हते. नव्हे असा करण्याचा प्रयत्नही अनेक राजांनी केलेला होता. परंतु शिवाजीमहाराजांचे वेगळेपण होते. आणि ते म्हणजे 'शिवंभुत्वा शिवं यजेत'.

अर्थात प्रत्यक्ष शंकराला प्राप्त करायचे असेल, तर स्वतः शंकर होऊन शंकराची आराधना करावी लागते. अर्थात जी गोष्ट साध्य करायची आहे तिच्यासाठी केवळ पात्र होणे एव्हढेच नव्हे तर, ती गोष्ट मिळवण्याकरिता ची सर्व प्रकारची सिद्धता असणे, ती गोष्ट स्वतःहोऊन. आणि म्हणूनच की काय, हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलं ते रायरेश्वराला अर्थात 'शिवा'चा अभिषेक 'शिवा'ने करुन. ही घटनाच 'मी शिवाजी' संकल्पना सांगण्यासाठी पुरेशी आहे.

या ठिकाणी शिवाजीमहाराजांना देवत्व बहाल केले गेले तर त्यासारखे दुर्दैव कोणतेही असणार नाही. कारण एखाद्या महापुरुषाला देवत्व दिले की, आपण केवळ त्याचे गुणगान गाऊन, त्याचा उत्सव साजरा करण्यात धन्यता मानतो. परंतु शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. जाणते राजे होते. 'आधी केले, मग सांगितले', हे देखील त्यांनी केले नाही. तर स्वतः सिद्ध होऊन, उदाहरण म्हणून उभे ठाकले. आणि इतरांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतः तसे बनण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

शिवाजीमहाराजांचे मावळे 'मी शिवाजी' म्हणुन जगले. शिवाजीमहाराजां इतकीच ध्येयनिष्ठा, सामर्थ्य, साहस आणि समर्पणाचा भाव त्यांच्यातही होता. म्हणूनच अत्यंत कमी कालावधीमध्ये हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले गेले. प्रसंगी शिवाजीमहाराजांवर कोणतेही संकट न येऊ देता स्वतःचे प्राणार्पण केले. संकटे स्वतःच्या छातीवर झेलली परंतु मूळ शिवाजीमहाराजांना धक्का लागू दिला नाही. शिवचरित्रामध्ये अशी मावळ्यांची नावे घ्यायची झाल्यास एक पुस्तकही कमी पडेल.

खरंतर 'शिवचरित्र' आणि 'शिवकथा' उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेच. पण शिवचरित्र कथन करणे किंवा ऐकणे, यात भागवताचे पारायण करून पुण्य मिळण्यासारखा उद्देश नसून ते आचरण करण्याची प्रेरणा मिळणे अपेक्षित आहे.

पण तथाकथीत बुद्धीजीवी समाजाचे प्रतिनिधी म्हणून विचार करतो की, 'शिवाजी इतरांच्या नाही तर माझ्या घरात जन्माला यावा'. (पूर्वी तर हा देखील विचार नसायचा.) आणि शिवाजी स्वतःच्या घरात जन्माला आला. तरी आपण विभक्तच. कारण 'मी शिवाजी' म्हणुन आपण पुढे येणारच नाही. संकटांचा अनुभव आणि पर्यायाने त्याकरिता करावा लागणारा त्याग आपल्याला कधी अनुभवताच येणार नाही.

खरंतर उभ्या महाराष्ट्राला शिवाजीमहाराज  सांगण्याची गरजच नाही. कारण असं गाव महाराष्ट्रात नाही, ज्यात शिवाजी नावाची व्यक्ती, शिवाजी चौक, शिवाजीनगर किंवा शिवाजीमहाराजांचा पुतळा नाही असे नाही. परंतु अभाव आहे तो 'मी शिवाजी' ही सिद्ध संकल्पना जगण्याचा.

म्हणूणच राष्ट्रासमोर आलेल्या संकटांकडे पाहत असताना त्यातील 'माझी जबाबदारी काय?', असे म्हणून पाहण्याची दृष्टी आली की, 'मी शिवाजी' म्हणुन संकल्पना प्रत्यक्षात अनुभवण्याचा प्रवास सुरू झाला आहे, असे होईल...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...