Sunday, 19 January 2020

लग्नानंतरची माणसं ( तो, ती आणि त्यांच्या कथा)


"लग्नानंतर माणसं खूप बदलून जातात". तिची अनुभवी मैत्रीण तिला म्हणाली. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल मैत्रिणीला खूप काही सांगत होती. तसे पाहता तिचा काही प्रेमविवाह नव्हता. पण तिच्या मैत्रिणीच्या या विधानानंतर तिचं भरभरून बोलणं एकदमच थांबलं.

लग्न ठरल्यानंतर त्या दोघांच्या खूप भेटी होत होत्या. स्वभाविकच प्रेमातील काही वचनंही दिली गेली होती. 'तिच्यावरचे प्रेम कधीही कमी नाही होऊ देणार', 'तिची जीवनभर काळजी घेईन', अशा आशयाची वचने.
किंवा त्याचा नोकरीच्या सगळ्या वेळा सांभाळून तिला आवर्जून भेटणं आणि तिच्यासाठी काहीतरी भेट आणणं. हे तिच्यासाठी सारंच सुखकारक होतं.

पण मैत्रिणीच्या बोलल्यानंतर ती खूप दुखावल्या गेली. खरंतर नव्या संसाराला नेमकी सुरुवात होणार होती. त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या चांगल्या-वाईट प्रसंगाचा अनुभव वेळेनुसार मिळणार होताच. तिने बराच विचार केला. आणि मोकळेपणाने त्या दोघांच्या पुढच्या भेटीत त्याला मैत्रिणीने सांगितलेली वाक्य तिने सांगितले.

स्वाभाविकच त्याच्यासाठीही तो धक्का होता. तिच्याप्रमाणे तो ही अंतर्मुख झाला. पुढे काही क्षण दोघेही शांतपणे बसले. मग थोड्या वेळाने तो निघून गेला. जात असताना 'येतो' देखील म्हणाला नाही. आता मात्र ती खूपच रडावली.

दिवसात आठ-दहा फोन आणि किमान एक भेट हा नित्याचा क्रम आता थांबला. त्याने जवळजवळ आठ दिवस तिला फोनही केला नाही. ती बिचारी मात्र त्याच्या फोनची आणि भेटीची अशी दोन्हीच्याही प्रतीक्षेत राहिली.

पण तो खूपच अंतर्मुख झाला होता. कारण हा प्रसंग त्याच्यासोबत दुसऱ्यांदा घडत होता. तो पदवीच्या शिक्षणाच्या निमित्ताने शहराच्या ठिकाणी त्याच्या काकांकडे काही दिवस राहायला होता, तेव्हा त्याची धाकटी चुलत बहीण त्याला अशाच आशयाचे वाक्य बोलली होती. की, 'एकदा का नोकरी-व्यवसाय सुरू झाला की, कुणी लक्षात ठेवत नाही. आणि कुणी परत साधं भेटायलाही येत नाही.' त्यावेळेस 'माझ्याबाबतीत तरी असं काही होणार नाही', असं तो बहिणीला ठामपणे म्हणाला होता.

पण त्यानंतर त्याचे पदव्युत्तरचे शिक्षण झाले आणि नोकरीलाही तीन-चार वर्ष होत आली होती. आणि या तीन चार वर्षानंतर तोच प्रश्न नव्या स्वरूपात आणि नव्या व्यक्तीमार्फत समोर आला होता. आणि खरंच तो त्याच्या चुलत बहिणीला या तीन-चार वर्षात भेटलाही नव्हता.

आता मात्र जीवनातील वास्तविकतेची जाणीव त्याला झाली. त्याने मग तिला खूप विचारपूर्वक अगदी एका ओळीचे पत्र  लिहीले. पत्रातील ती एक ओळ वाचून ती  सुखावलीच नाही तर स्थिरावली देखील. कारण त्याने कोणतेही 'कारण' दिले नव्हते. एक ओळीचा एक छोटासा प्रश्न विचारला होता. ज्याची तिने मूकसंमती देऊन टाकली होती.
आणि तो प्रश्न किंवा ती ओळ होती,
'लग्नानंतर बदलणाऱ्या माणसांकडे जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर येत जाणाऱ्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणारी माणसं, या दृष्टिकोनातून पाहूया का?'


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 12 January 2020

खर्चास कारण की...


बायको.
छे! छे! कृपया गैरसमज करून घेऊ नका.  खर्चास कारण बायको मुळीच असू शकत नाही.
अहो! प्रश्न कधीही अवघड नसतात. त्रासदायक असतात ते मूळ प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर उत्तरातून निर्माण होणारा पोटप्रश्न. म्हणूनच खर्च झाला तर ज्येष्ठ, जाणकार आणि अनुभवी मंडळी म्हणतात, "ठिक आहे. खर्च झाला तर होऊ दे. पण काही बचत आहे का? गुंतवणूक आहे का?" आता हा पोटप्रश्न निरुत्तरित करणारा असतो. अगदी कधीकधी वैफल्यग्रस्त करणारा देखील असतो. पोट प्रश्नाचे उत्तर जर सकारात्मक असेल तर मूळ प्रश्न सहजपणे हाताळल्या आणि सोडवल्या देखील जातो. पण तेच पोटप्रश्नाचे उत्तर नकारात्मक असेल, तर अवघड होऊन बसते.

म्हणून मी निर्माण होणाऱ्या पोट प्रश्नाचे उत्तर आधीच देऊन टाकले. 'गुंतवणूक, बचत आहे का?' या पोटप्रश्नाचे उत्तर आहे, 'होय आहे.' आणि ते उत्तर आहे, 'बायको'.

बायको आपल्या भविष्याची, संसाराची सगळ्यात मोठी गुंतवणूक असते. (असे माझेच नाही तर सगळ्यात संसारवीरांचे प्रामाणिक मत आहे).
या 'गुंतवणुकी'चा परतावा एवढा सुखदायक असतो की, अनेक वेळा संकटाच्या क्षणी नव्हे खर्चाच्या प्रसंगी ती तिच्या कष्टाचं, संयमाचं माप सांभाळून धरते. अगदी आपल्या घरात माप ओलांडून आल्याच्या क्षणापासून. आणि आपल्याला तारते.

तर असे पोटप्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर मूळ प्रश्नाचे उत्तर तर राहिलेच, 'खर्चास कारण की...' अर्थात त्याचे उत्तर 'मीच की' असेच आहे.
क्षमा करा. परत एकदा गैरसमज होण्याला वाव आहे. मी यात बायकोला काहीही म्हणत नाही आहे. 'मी' म्हणजे 'मी'च असे मी हे उपरोधाने, उपहासाने म्हणत नाही आहे.

पोळ्याच्या सणाला हातात पोवत बांधल्यानंतर आई मला पाठमोरा उभा करून, डोक्यावरून अक्षता टाकायची आणि विचारायची, "अतीत कोण?" आणि मला म्हणायला सांगायची, 'मीच की'. अर्थात अतीत म्हणजे सत्व, रज, तम या सगळ्या गुणत्रयींच्या पलीकडील अवस्था. अवधूत अवस्था. 'अतित कोण आहे?' तर 'मीच आहे'. अर्थात या धार्मिक रूढी, परंपरा आपल्यालाच आपणच ते 'परमतत्त्व' आहोत याची जाणीव करुन देत असतात. आणि त्यानुसार मग या सांसारीक जीवनातील बंधनात कार्य करावे, असा उद्देश असतो. असो.

तर असे लहानपणी अशी कधी तरी आलेली समज आणि लग्नानंतर लागलेली सवय 'मीच की' असा मंत्र ध्यास करावा लागेल, याची मुळीच कल्पना नव्हती!
पण सारेच पुरुष असे माहीत असताना या मोहजालात अडकतात. आणि घडलेल्या प्रत्येक घटनांना जवाबदार  'मीच की' असं म्हणत असतात. मी आपला त्या सगळ्यांचा मात्र एक प्रतिनिधी.

तर हे तर एव्हाना हे स्पष्ट झाले आहे की, 'खर्चास कारण मीच आहे'. पण क्षमा करा, मी आर्थिक खर्चाबाबत बोलत नाही आहे.
अहो! कोणत्या साहित्यीकाचे एवढे धाडस किंवा बुद्धी की, त्याने सुनियोजित अर्थार्जन करावं आणि खर्च करावा. साहित्यीकांचा आणि 'अर्था'चा अर्थाअर्थी संबंध नाही. नव्हे नसतोच. साहित्यीकांच्या जवळ 'अर्था'चे भांडवल नसतेच मुळी. त्यांच्याजवळ असतं ते केवळ शब्दांचे मुद्दल. जे ते खर्च करत असतात. अर्थात म्हणून मी ही शब्दांच्या खर्चा बाबतच बोलतो आहे!
बघा ना 'खर्चास कारण मीच आहे' आणि 'शब्द खर्च करतो आहे' हे सांगण्यासाठी मला आतापर्यंत किती खर्च करावा लागला शब्दांचा.

पण का कुणास ठाऊक या जगाच्या संसारात एवढी सुंदर सुंदर नाती आहेत आणि त्यांना बांधणार्‍या भावना आहेत, ज्यांनी हे जीवन सुंदर होतं. तृप्तता देणारं असतं. आणि नेमकं तेच साहित्यीकांच्या दृष्टीस पडतं आणि ते खर्च करतात तो शब्दांचा.

मुळात अशा सगळ्याच कलाकृती आधीच विद्यमान असतात. थोडीशी शब्दांची जुळवाजुळव झाली की, त्याला एक मूर्त रूप येतं. ज्याला साहित्यकृती म्हटल्या जातं.

संसारातील नाती ही सातत्याने उलगडत जाणारी नाती असतात. कधी दुःखाचे तर कधी सुखाचे अनुभव देणारी ही नाती असतात. म्हणूनच ही सुंदर नाती जोपर्यंत आहेत, तोपर्यंत साहित्यीकांचे शब्द आहेत. जे अशा प्रत्येक प्रसंगाला खर्ची पडत असतात. आणि तरीही ते कधीही संपून जात नाहीत, वाया जात नाहीत. कारण ते जगातील सगळ्या सुंदर नात्यांच्या 'अक्षय थाळी'तून निर्माण झालेले असतात, म्हणून.

एखाद्या साहित्यीकाने उद्योग थाटला असता आणि खर्च केला असता तर काय झाले असते? अर्थातच 'खर्च' शब्दाला समानार्थी 'कर्ज' शब्द जोडला गेला असता. पण साहित्यीकांच्या 'खर्चा'ला 'कर्ज' हा 'वर्ज्य' असतो. प्रसंगी त्यांचा खर्च होणारा शब्द कधीकधी 'खर्जा'तील असू शकतो. अर्थात तो ही आर्जवी असतो.

असं अर्थात शब्दांचं भांडार, मी मागणी घालत असताना बायकोसमोर मांडलं होतं. जी बापूडी त्यात अडकली.

त्यावेळेस माझ्या जवळ 'अर्थ' नाही, हे मी तिला पहिल्या भेटीतच सांगून टाकले होते. पण कदाचित खर्च होणाऱ्या शब्दांच्या अर्थाच्या प्रेमात ती पडली. आणि मूळ 'अर्था'चे तिला भानच राहिले नाही. आणि अडकली. तर अशी माझी एकंदरीत 'गुंतवणुकी'ची सुरुवात तेथूनच झाली.

कोण म्हणतं की, जगातल्या सुंदर साहित्यकृती ह्या लग्नाआधीच्या प्रियकर आणि प्रेयसीच्या निर्माण होणाऱ्या प्रेमातूनच निर्माण होत असतात म्हणून. अहो! लग्नानंतर बायकोला वेळेवर किराणा नाही आणून दिला तरी देखील सुंदर साहित्यकृती निर्माण होत असतात. अर्थात! हा माझा स्वानुभव आहे.

म्हणूनच 'बायको' ही केवळ माझ्या मुलांची जन्मदात्रीच नाही तर माझ्या खर्ची पडलेल्या अनेक शब्दांची देखील जन्मदात्री तीच आहे.

म्हणून लग्न झाल्यानंतर प्रेमाला किंवा साहित्यीकाला ओहोटी लागते, असे जे म्हंटले जाते ते साफ खोटे आहे. माझा अनुभव या बाबतीत पूर्णपणे उलटा आहे, जो माझ्या 'गुंतवणुकी'ने वेळोवेळी सिद्ध केला आहे. आता तर माझी छोटी मुलगी देखील म्हणते, 'बाबा! तू किती बोलतोस रे'. त्यावर तिला देखिली एखादी गोष्ट सांगावी लागते. शब्दांच्या जगात एक फेरफटका मारला की, तिच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद खूप समाधानकारक असतो. अशावेळी खर्ची पडलेल्या शब्दांमुळे तृप्तता लाभते. अर्थात खर्च मात्र वाढतच जातो. याला कारण अर्थातच मीच आहे.
असो तुर्तास थांबतो. 'गुंतवणूकी'ची काळजी घ्यायला हवी ना!


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...