Sunday, 31 October 2021

चौथी मूलभूत गरज




मनोरंजन.
होय. 'मनोरंजन' ही चौथी मूलभूत गरज आहे. आणि ती देखील अनादिकालापासून. अर्थातच अनादिकालापासून असे असल्यामुळे तिने मानवाच्या विकासाच्या सगळ्या अवस्था पाहिल्या आहेत. या विकासाच्या मार्गात अनेक वर्ष मानवाला तिची अत्यंत गरज होती. अगदी आपल्याला बाल्यावस्थेपासून शिकवलेल्या तीन मूलभूत गरजां इतकीच महत्वाची होती. किंबहुना आहे देखील.

मुळातच मानवाचा विकास, उत्क्रांती पाहत असताना तो जसा भौतिक दृष्ट्या अधिक आधुनिक होत गेला, प्रगत होत गेला हे पाहिले जाते, तसेच सांस्कृतिक, सामाजिक दृष्ट्या देखील त्याची प्रगती पाहिली जाते. परंतु का कुणास ठाऊक, नकळतपणे कदाचित केवळ शासन व्यवस्थेच्या दृष्टिकोनातूनच विचार केला गेला की काय, म्हणून अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, असेच आजवर मानले गेलेले आहे.

परंतु या तीन गरजां शिवाय जसा माणूस जगू शकत नाही. जशा या गरजा शरीराशी संबंधित आहेत. तसेच जी दिसत नाही त्या मनाशी ही मानवाची एक गरज संबंधित असते तीच मनोरंजन...

आजच्या डिजिटल युगात मनोरंजनाची अनंत साधने आहेत म्हणून की काय ती आजच्या काळात आपल्याला मूलभूत गरज बनलेली आहे, असे मुळीच नाही. तर 'रंजन' हीच मानवाची मूलभूत गरज आहे. केवळ 'पोटभरणे' इथपर्यंतच जीवन असते. तर 'मनभरे' पर्यंत काम करणारी माणसेच निर्माण झाली नसती. खचित पोट नाही भरले तरी मन भरलं की, माणूस सुखी होतो. ही अवस्था असते. अर्थात मनाचा विचार संपूर्ण दिवसात कोणत्याही क्षणाला सोडून देता येत नाही.

हल्ली म्हणून मनोरंजनावर अफाट खर्च होतो, खरंतर हा देखील आपला एक गैरसमज आहे. आपल्या प्राचीन इतिहासावर एक दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येईल, आपल्या पूर्वजांची मनोरंजनाची साधने सर्वार्थाने प्रगत होती. म्हणूनच की काय चौसष्ठ कलांचा शोध हा त्यांच्याच काळातील आहे. उलटपक्षी आज आपल्याला कितीजणांना या चौसष्ठ  कला ठावूक आहेत? अर्थातच अत्यंत नगण्य लोकांना. आपल्याला तर त्यांची नावे देखील सांगता येणार नाहीत.

गरज ही शोधाची जननी आहे, या उक्तीप्रमाणे आपल्या पूर्वजांनी मूलभूत गरजां सोबतच मना करीता या चौसष्ठ कलांचा शोध लावलेला आहे, असे लक्षात येते. भजन, किर्तन, प्रवचन, संगीत इत्यादी पासून आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या त्यांच्या प्रवासात चौसष्ठ कलां पर्यंत ते जाऊन पोहोचले.

अर्थातच केवळ उदरनिर्वाहाच्या गरजां इतकेच आपले पूर्वज अडकून राहिले असते तर मात्र 'मनुष्यप्राणी' म्हणून राहिले असते. परंतु त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रसंगी स्वतःची आबाळ करून त्यांनी ती कला जोपासली. अर्थातच त्यांचे जिथे मन रमत होते, ते त्यांनी केले अर्थातच मनोरंजन केले.

मुळात मनोरंजन होत नाही, तिथे मनुष्य राहूच शकत नाही. हल्लीच्या काळात तर मन रमत नाही म्हणून नोकरी व्यवसाय सारं काही खचित वडिलोपार्जित गोष्टी सोडून देखील अन्य गोष्टींकडे गेलेला मनुष्य पाहायला मिळतो. आपल्याला कौतुक वाटते पण ही गोष्ट नवीन नाही, तिचा आधारच 'मन' आहे म्हणून....

अजिंठा, वेरूळ, एलिफंटा अशी कितीतरी लेण्यांमधील कला पाहिल्यानंतर जाणवते, ज्या कलाकारांनी हे महान कार्य केले, त्यांना किती असे मानधन मिळाले असेल? अर्थातच अत्यल्प. किंवा मिळाले असले तरी त्यांचे नाव इतिहासात प्रसिद्ध ही नाही. पण तरीही तीन मूलभूत गरजांचा विचार न करता, चौथ्या गरजेचा अर्थात मनाचा अधिक विचार केला. प्रचंड अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जागतिक  आश्चर्यात गणना करता येईल एवढे महान कार्य त्यांनी केले.

शिवाय पूर्वी राजे-महाराजे त्यांच्या राज्यसभेमध्ये अनेक मंत्र्यांसह भाट देखील असत. अर्थातच एक प्रकारचे भाट  म्हणजे स्तुतिपाठक होते. बहुतांश वेळेला राजाचं मनोरंजन करणे, हेच त्यांचे एकमेव  कार्य असे. आजच्या युगातही महानगरांमध्ये अति श्रीमंतांकडे अशाच प्रकारचे भाट बोलवून कार्यक्रम करण्याची देखील प्रथा आहे. सुट्टीच्या दिवशी हे एक प्रकारचे लाईव्ह मनोरंजनही असते, जे सामान्य माणूसदेखील आता करु लागला आहे.

आणि हो! गरीब ही त्याची मनोरंजनाची साधने शोधतच असतो. केवळ त्यांना आर्थिकतेच्या मापात मोजायला नको. एवढेच. तात्पर्य गरीब असो वा धनिक मनोरंजन हे लागतेच. शिवाय मनुष्य असो वा देव मनोरंजना शिवाय राहू शकत नाही. बघा ना कोणत्याही देवाची प्रतिमा, शस्त्रास्त्रांच्यासह प्रत्येक देवतेच्या हातात कोणते ना कोणते तरी वाद्य आहे....

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 24 October 2021

आत्मविस्मृती

                             


            'अग्निपंख' या आपल्या आत्मचरित्रात डॉ.अब्दुल कलाम यांनी एक प्रसंग वर्णन केलेला आहे. अमेरिकेतील नासाच्या मुख्य सेंटरला ते भेट द्यायला गेलेले असतात त्याच वेळेला वर्जिनीयातील नासाच्या अन्य एका सेंटरला देखील ते भेट द्यायला जातात. आणि त्या सेंटर मध्ये प्रवेश केल्यानंतर स्वागतकक्षाच्या मागे एक युद्धाचे रेखाटलेले चित्र त्यांचे लक्ष वेधून घेते. त्या चित्राकडे थांबून पहाण्याचे कारण म्हणजे त्या चित्रातील युद्धात असलेला क्षेपणास्त्राचा प्रसंग. आणि क्षेपणास्त्र चालवणारे सैनिक 'गोरे' नाही आहेत. 'सावळे' आहेत. पुढे विचारपूस  केल्यानंतर त्यांना कळतं, जगातली ही पहिली युद्धाची घटना होती ज्यात भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध करत असताना क्षेपणास्त्राचा प्रयोग केला होता. टिपू सुलतानच्या एका सेनापतीने असे महान कार्य केले होते. बरे झाले. डॉ.अब्दुल कलाम यांनी हा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केला. नाही तर हाच उल्लेख अन्य एखाद्या भारतीयानी केला असता तर पुराणातली कथा म्हणून त्यास हिणवण्यात आले असते.


औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली ती केवळ युरोपातून. उर्वरित जग आणि विशेष करून भारत तोपर्यंत अज्ञान अंधकारात जगत होता, असेच आपण मानतो.

यावरही अजून एक वेगळा विचार करुन पाहू की, डॉ.अब्दुल कलाम यांनी वर्णन केलेल्या प्रसंगानंतर किती जणांना आनंद झाला असेल? कितीजणांचा ऊर भरून आला असेल? भारतासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची घटना आहे असे किती जणांना वाटले असेल?
याउलट प्रत्येकाला आश्चर्य वाटले असेल हे निश्चितच.

अर्थात आपण आत्मविस्मृत तर आहोतच आणि म्हणूनच आत्माभिमानी नाही आहोत. आणि पर्यायाने स्वदेश, स्वभाषा आणि संस्कृतीचा आपल्याला अभिमान नाही आहे. अगदी ठरवून 'अभिमान' हा शब्दप्रयोग केला 'गर्व' नाही. कारण 'अभिमान' हा माणसाचे अधःपतन होऊ देत नाहीत 'गर्व' तसे करतो, म्हणून.

जगात जी औद्योगिक क्रांती झाली त्याच्या अभिनंदनास ते ते देश पात्र आहेतच. पण त्या काळात आपण गहन अंधकारात होतो, असे समजण्याचे कारण नाही. इंग्रज आल्यानंतरच काय ती भारताची प्रगती झाली, असे गोड गैरसमज असलेले आपण सारे भारतीय आहोत. प्रकांडपंडित आणि इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार श्री शशी थरूर यांनी ब्रिटन युनियनमधे दिलेले साधारण पाच वर्षां पूर्वीचे संसदीय भाषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजले होते. त्या भाषणात त्यांनी वर्णन केले की, इंग्रज येण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था कशी संपन्न आणि परिपूर्ण होती. याऊलट इंग्रज आल्यानंतर भारताचा जीडीपी कसा घसरला.

परत एकदा बरेच आले, हा संदर्भ देखील काँग्रेसच्या नेत्यांनी दिला म्हणून. असे अजूनही अनेक उदाहरणे सांगता येतील की ज्यातून स्पष्ट होयील आपला इतिहास गौरवशाली आणि अभिमानाचा आहे. पण तथाकथित पुरोगाम्यांना 'आमचे अजून ग्रहण सुटले नाही' या आशयाच्याच सार्‍या घटना पाहायच्या असतात.

खरं तर जगाच्या पाठीवर असा कोणताही देश नसेल ज्यातील नागरिक व तथाकथित बुद्धिवादी लोक स्व्तःच्याच देशाला सातत्याने एक तर नाव ठेवतात किंवा इतर देशच काय ते प्रगत आहेत, असे गुणगाण गात असतात.

जगातील प्रगत देशांना स्वतःचा इतिहास मांडत असताना इसवी सनाचा आधार घ्यावा लागतो. इसवी सन पूर्व शंभर वर्ष, पाचशे वर्ष, एक हजार वर्ष अशी उलटी कालगणना करून स्वतःच्या अस्तित्वाचे संदर्भ द्यावे लागतात. त्याच ठिकाणी भारतीय कालगणना युगाब्द ५१२१ पासूनची अस्तित्व दर्शवते.

कोणत्याही शास्त्राच्या कलेचा किंवा विज्ञानाच्या खोलात गेलो तरी भारतीयांचे अस्तित्व दिसेलच. हो! पण आजच्या डिजिटल युगात एक तर ते आपण जगासमोर व्यवस्थितपणे मांडू शकलो नाही आहोत किंवा त्याचे पेटंट देखील मिळवू शकलो नाही आहोत. उदाहरणार्थ कडुनिंब. कडुनिंबा सारख्या गोष्टीचे पेटंट पाश्चात्य देशांकडे जाते, या पेक्षा खेदाची बाब ती कोणती? अर्थात हा देखील आत्मविस्मृतीचाच परिणाम आहे. म्हणूनच 'आत्मवृस्मृती' हा भारतीयांना लागलेला सगळ्यात मोठा अभिशाप आहे.

शिवाय स्वातंत्र्यानंतर आपल्यावर लादल्या गेलेल्या मेकॉलेच्या शिक्षणप्रणालीला देखील दोष देऊन चालणार नाही. कारण जशी आत्मविस्मृती प्रगतीला मारक ठरते तसेच इतरांना दोष देऊनही विकास होऊ शकत नाही.

किंवा विशेषत्वाने अधोरेखित करण्याची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या भारतीय परंपरेत सगळेच काही होते. आणि जगात कोणताही शोध लागला तरी देखील प्राचीन भारतीय ज्ञानाचा संबंध आहे असे दाखवतो असे स्तोम माजवणाऱ्या पासून देखिल सावध होणे गरजेचे आहे. कारण आत्मविस्मृती इतकाच अनावश्यक अभिमानही घातक आहे.

थोडक्यात काय तर आपल्या एकंदरीत आजच्या स्थितीला आपली आत्मविस्मृतीच जबाबदार आहे. याचे कारण जर डॉ.बाबासाहेब आंबेडकरंच्या शब्दांत सांगायचे झाले तर, जसे अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. तसेच 'जाणीव' झालेले अकार्यक्षम लोक अधिक जबाबदार असतात.

म्हणूनच या ठिकाणी जे सुशिक्षित असण्यापेक्षा ही सुजाण आणि सूसंकृत नागरिक आहेत अर्थात आत्मविस्मृत नाही आहेत असे नागरिक, त्यांची जबाबदारी अधिक आहे. आपले जुने सारे विज्ञाननिष्ठ संबंध घेत, त्याचा संदर्भ वर्तमानात लावत उपयोग करता आला पाहिजे. आणि भविष्यातील भारत घडवता येतो याची जाणीव मग आपोआपच येत जाईल. आणि इतरांना आत्मविस्मृतीतून प्रत्यक्ष उदाहरणांमधून बाहेर काढता येईल.


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 17 October 2021

मला तुम्ही आवडत नाहीत...


होय! मी तुमच्या बद्दलच बोलतोय
इर्षा, द्वेष, अहंकार, अहंभाव, नावड
अशी कितीतरी गोष्टी सांगता येतील.
छे! छे! उघडपणे मुळीच नाही
आतल्याआत मनाच्या गाभार्‍यात
प्रसन्नतेच्या जागी, मी प्रसिद्धीला ठेवले आहे
म्हणूनच मला तुम्ही आवडत नाही...

तुम्ही माझ्यापेक्षा वरचढ,
तुमची बुद्धी, तुमची प्रगती, तुमची संपन्नता
एकंदरीतच तुमचं कौतुक करणे
मला कधीच जमले नाही.
सांगा ना! खरच एकदा
‘मी’ नेहमीच मोठा असतो ना!
म्हणूनच मला तुम्ही आवडत नाहीत...

तसा मी ही साधारणच आहे.
पण मी कुठेतरी वाचले होते,
‘सामान्य माणसात
काही असामान्य गोष्टी असतात’
त्या दिवशीपासून हे माझे गृहीतक पक्के होते 
की, तो असामी ‘मी’च!
म्हणूनच मला तुम्ही आवडत नाहीत...

असो, तरीही मी एकदा
तुमच्याशी संपर्क करेण,
तुम्हाला भेटेण,
बघूया तरी..
तुमची आभा किती मोठी आहे ?
‘मी’ दिपून गेला नाही, तर...?
हरवण्यासाठी ‘मी'ला तुम्ही मदत केली नाही तर...
मग मात्र मला तुम्ही नक्कीच आवडणार नाही....

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

Sunday, 3 October 2021

जया अंगी मोठेपणा...

"जया अंगी 'मोठेपणा'...
             ...तया प्रसिद्धी भरपूर".

साधारण दोन वर्षांपूर्वी अभिजीत बिचकुले (सातारा) चे प्रकरण संबंध महाराष्ट्र गाजले. सुरू असलेल्या शोमधून, बिग बॉस मधून त्याला थेट तुरुंगात जावे लागले. आणि प्रकरणीही तसे पहाता अगदी साधे होते- चेक बाऊन्स होण्याचे.
परंतु या सगळ्या प्रकाराणावर सहज दृष्टी टाकली तरी कळून येते,  ती म्हणजे 'कर्तव्यशून्यता'. आणि तरीही हवा हवासा वाटणारा 'मोठेपणा'. कारण एकदा का हा 'मोठेपणा' आला की, त्या मागोमाग 'प्रसिद्धी' अगदी अपोआप येते.

मूळात कर्तुत्व नसेल आणि तरीही नावलौकिक व्हावा असे वाटत असेल, तर 'मोठेपणा'चा मार्ग अगदी सोईचा असतो. मग त्या करिता नको नको ती आश्वासने, नको नको त्या बढाया आणि नको नको  त्या फुशारक्या माराव्या लागतात. कारण विनासायास प्रसिद्धी हवी असते.

पूर्वी ब्रॅण्ड तयार व्हायला वर्षानुवर्षे लागायची. अपार कष्ट, चिकाटी, सचोटी, प्रामाणिकपणा इत्यादी सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक असायचा. तेव्हा कुठे एखादी गोष्ट नावारूपाला येत असे. परंतु आता 'काळ बदलला' असे म्हणणे अगदी स्वाभाविक आहे. खरंतरं 'बदल' ही एकमेव गोष्ट जगत शाश्वत आहे.
म्हणुनच 'मोठेपण'चा 'मोठेपणा' झाला.

आता आधी ब्रँड बनवला जातो. त्याची विश्वासार्हता अक्षरशः पटवली जाते. किंबहुना आपल्याला वेड्यात काढलं जातं.

'आप **** नही जानते?'
'अरे ये **** नही जानते?'
अशा आशयाच्या जाहिरातींमधून आपल्यावर त्या गोष्टीचा भडिमार केला जातो. मार्केटिंगचे हे तंत्र खरंतरं वस्तूंना लागू होते. पण बदत्या जगत आपण ते  जीवनाच्या मंत्राला लावून घेतले आणि यंत्रवत झालो.

वर्तमानाचा डोलारा पेलणारा भूतकाळाचा पाया नाही आहे, म्हणून भविष्य दोलायमान झाले आहे. कदाचित असे भविष्य ज्ञान देखील असते. परंतु प्रसिद्धी या गोंडस आभासी दृश्य खाली अगदी ठरवून गाडले जाते.
म्हणतात ना, 'सुप्रसिद्धी' किंवा 'कुप्रसिद्धी' असे काही मूळी असतच नाही. असते ती केवळ प्रसिद्धी. आणि म्हणून ती प्रसिद्धी मिळवण्याकरिता पाहिजे त्या पद्धतीची नीती, रिती व स्थिती अवलंबिली जाते.

हिंदी मूळाक्षरांमधे आधी 'क' अक्षर येते व नंतर 'ख'. अर्थात हिंदी भाषिक विशेष करुन या गोष्टीचा उल्लेख या करिता करत असतात की, पहिले 'क'माओ फिर 'खा'ओ.

परंतु जिथे सातत्याने चर्चेत राहणे हेच उद्दिष्ट असते, तिथे स्वकष्टाचा आणि स्वकमाईचा मार्गही शॉर्टकटनेच मिळवण्याचा प्रयत्न होतो. आणि तोच 'मोठेपणा'चा मार्ग असतो.

जगद्गुरू संत तुकोबारायांनी 'जया अंगी 'मोठेपण', तया यातना कठीण', असे त्यांच्या अभंगात लिहून ठेवले आहे. सबंध विश्वाला कष्टाची जाणीव तर आहेच पण प्रसंगी कष्ट करून कधी अवहेलना ही सहन करण्याचा प्रसंग ओढवेल, याची जणू पूर्वसूचनाच दिली आहे. आणि बहुदा पूर्वीचा तो आपल्या समाजाचा स्वभावही होता.

परंतु आता सातत्याने 'ट्रेन्डीँग' राहण्याकरिता काही ना काही तरी सुरूच ठेवावे लागेल ना. मग चारचौघात फिरत असताना तसा अभिनिवेष बाळगला जातो. अभ्यासाच्या बैठकीची जागा आता 'मोठेपणा'चा अधिक आभास, या गोष्टीच्या अभ्यासाने अधिक घेतली आहे.  आणि एकदा का मोठेपणाचा हा स्वभाव झाला की तो चित्त स्थिर कसे ठेवू देईल? मोठेपणाला ओढ प्रसिद्धीची असते.
नव्हे मोठेपणाच्या अस्तित्वातच प्रसिद्धी असते. ती दोघे एकत्र नांदत असतात.  म्हणून क्वचित प्रसंगी जर कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केलं, चारचौघात आपल्याला विचारलं गेलं नाही की,  अक्षरश: होणारा त्रास हा 'जीवन संपले' इतका भयावह असतो.

'मोठेपणा'च्या डोळ्यांवरील आलेल्या झापडांमूळे पूढचे काही दिसत नाही. मग लक्ष वेधून घेण्यासाठी अगदी किळसवाणी वाटावी अशी कृत्ये केली जातात. कारण कुणी विचारलं नाही तर मग पर्यायच नसतो ना. गेले काही दिवस प्रसिद्धीच्या झोतात मध्ये नाही ही भावनाच विषारी आहे.

पु. ल.देशपांडेनी सांगितलेलं 'पोकळी'चं वाक्य आता वाटतं केवळ संग्रहालयात ठेवण्यात योग्य झाले आहे. कारण शब्दाला लागलेला केवळ एक काना अर्थाकडून अनर्थाकडे घेऊन जात आहे. मुंगी होऊन साखर खाण्यात धन्यता मानण्याऐवजी, मोठेपणा मिळवण्यात जास्त सुख मानले जात आहे, हे प्रसिद्धीच्या जगातील दाहक सत्य झाले आहे. या सत्यापासून आपल्याला तुर्तास तरी दूर जाता येणार नाही.
'जया अंगी 'मोठेपणा'...
...तया प्रसिद्धी भरपूर'.


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...