Sunday, 30 August 2020

कथा स्वातंत्र्याच्या


भारत अखंड

स्वातंत्र्य मिळवण्याच्या सगळ्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

इंग्रजांसोबत अनेक चर्चा झाल्या. परंतु आता मिळणारे स्वातंत्र्य खंडित नको आहे.

‘अखंड भारत’ हवा आहे, असा आग्रह सुरू होता. 

त्या करिता मोर्चे निघत होते, आंदोलने होत होती.

परंतु दुष्ट इंग्रजांनी धर्माच्या आधारावर ‘अखंड भारत’ खंडित केला.

स्वातंत्र्य मिळाले.

पण आंदोलने थांबली नाही.

आता परत एक वेगळी लाट उसळली होती, ‘भारत अखंड’ ठेवण्यासाठीची.


स्वातंत्र्याचे सर्वेक्षण

स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर एक विदेशी अभ्यासकांचे पथक देशाची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्वेक्षणाकरिता भारतात आले होते. 

सरकारकडून परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली होती.

परंतु त्यांनी कोणत्या भागाचे सर्वेक्षण करावे, याचे ‘स्वातंत्र्य’ त्यांना दिले गेले नाही.


 वैचारिक स्वातंत्र्य

एक पत्रकार एका वर्तमानपत्रात नोकरीकरिता रुजू झाला.

पहिल्याच दिवशी मुख्य संपादकांनी त्याला आश्वासन दिले,

“पत्रकार म्हणून तुम्हाला तुमचे वैचारिक व लिखाण याचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच."

आणि जाता जाता म्हणाले, “केवळ आपल्या वर्तमानपत्राची 'विचारसरणी' कोणती आहे, हे लक्षात असू द्या.”


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 9 August 2020

सु'शांत'

तो अभिनेता. ती अभिनेत्री. दोघांनी काही चित्रपटांमध्ये सोबत काम केले. स्वभाविकच प्रेम निर्माण झाले. प्रेम विवाहदेखील झाला.

पण नंतर नंतर तो चिंताक्रांत व्हायला लागला. नैराश्‍य, वैफल्य हा त्याचा नित्याचाच विषय झाला होता.

आणि अशा विचारातून त्यांने स्वतःला एकेदिवशी संपवून टाकलं.

समाज माध्यमात चर्चेला उधाण आलं. अनेकांनी त्याच्या मृत्यूचे भांडवल करायचाही प्रयत्न केला.

पण ती शांत होती. तिने कोणालाही कसल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.

कारण तिला त्याच्या सायकॅट्रिस्ट सांगितलं होतं, त्याला अत्यंत दुर्मिळ असा 'ल्यूपस' आजार झाला होता...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

साहित्यीकाचा मृत्यू

एका सुप्रसिद्ध साहित्यीकाच्या अंत्यसंस्कार करिता शहरातील सगळे सारस्वत जमले होते. त्यांना श्रद्धांजली वाहत असताना प्रत्येक जण त्यांच्या प्रचंड मोठ्या साहित्यसंपदेचे गुणगान करीत होते.

प्रतिभावंत, ज्ञानवंत, गुणवंत, किर्तीवंत, इत्यादी विशेषणे तसेच अनेक अलंकार आणि दृष्टांतांनी त्यांच्यावर शब्द सुमने वाहत होते.

प्रत्यक्षात उपस्थितांना असे भासत होते की एव्हाना शब्दांची चिता झाली आहे. आणि ते शब्द त्या महान साहित्यीकाला आता स्वत:त सामावून घेणार आहेत.

पण या अंतिम शब्द यात्रेत त्यांच्या चिरंजीवांचा सहभाग नव्हता. त्यांना त्या महान साहित्यीकाचे एकच साहित्य वाचायची घाई झाली होती. आणि ते म्हणजे त्यांचे 'मृत्युपत्र'.

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

साहित्यीक

खरंतर साहित्यीक होण्याचे त्याचे स्वप्न होते. पण तो 'कंटेंट रायटर' झाला. त्यातही त्याने मोठा नावलौकिक मिळवीला.अमाप प्रसिद्धी मिळविली.

एकदा त्याच्या क्लायंटनी त्याला विचारले,  "स्वतःसाठी काही लिहिता का?"

त्यावर स्मितहास्य करीत तो उत्तरला, "हो. लिहितो ना. पुढच्या महिन्यात मिळावयाच्या असाइनमेंटचे अंदाजपत्रक..."

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 2 August 2020

प्राची सुकन्या सरदेशमुख


शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेली प्राची रडत रडतच घरी आली. तिचे रडणे थांबत नव्हते. बहुदा शाळेत करमत नव्हते, असे तिच्या आई-वडिलांना वाटले. पण थोड्या वेळाने ती शांत झाल्यावर म्हणाली, "मला दोन नावे आहेत का ?"
त्यावर तिचे बाबा प्रतापराव म्हणाले, "तुला तर शंभर नावे आहेत. पिल्लू, गोडंबी, माऊ, चिऊताई... अशी कितीतरी तुला नावे आहेत." अगदी लडिवाळा भाषेत, विषयांतर होऊन ती शांत व्हावी या उद्देशाने ते म्हणाले.

परंतु प्राची मुद्दा सोडायला तयार नव्हती. ती म्हणाली, "मग 'सुकन्या' कोणाचे नाव आहे? तुम्ही मला या नावाने कधी हाक मारली नाही. आज शाळेत उपस्थित घेताना बाईंनी माझे नाव 'प्राची सुकन्या सरदेशमुख' असे घेतले. त्यानंतर वर्गातील सगळ्या मुली मला 'दोन नाव असलेली मुलगी' म्हणून चिडवत होत्या."

आता सारा मुद्दा प्राचीच्या आई-बाबांच्या म्हणजेच प्रतापराव आणि सुकन्या यांच्या लक्षात आला.
आणि सुकन्याच्या डोळ्यासमोर तो सगळा प्रसंग उभा राहिला.

सुकन्या आणि प्रतापरावांना पहिल्या मुलीच्या पाठीवर दुसरी मुलगीच झाली होती. घर तसे संपन्न. शेती, मोठा वाडा, गाडी, गडी, नोकर-चाकर अगदी कशाचीही कमतरता नव्हती. परंतु सुकन्याला एका गोष्टीची कायम खंत होती. की, आपण घराण्याला 'वारस' देऊ शकलो नाही. 

त्यावर प्रतापरावांनी तिला अनेक वेळा समजावले देखील होते. आपल्या दोन्ही मुली आपल्या वारसदार आहेत. मुलीदेखील कौतुक कर्तृत्ववान असतात. म्हणून मुलेच काय तेवढा 'वंश' पुढे नेत असतात तर मुलींचाही वाटा तितकाच अमुल्य असतो.

पण स्वतः उच्चशिक्षित असून ही सुकन्याला तिचं मन सारखं खात होतं. तिने अनेक उपास-तापास केले, अनेक नवस केले, आता तिसऱ्या वेळेला मुलगाच व्हावा म्हणून. परंतु देवाच्या मनात काही वेगळेच होते. तिसऱ्या वेळेस ही मुलगीच झाली.

सुकन्याला अपार दुःख झाले. आपले आयुष्य वाया गेले, असे वाटायला लागले. तिने अबोला धरला. प्रतापरावांनी खूप समजावले. पण तरीही तिला तिचे दुःख शांत करता आले नाही.

मुलगी झाल्यानंतर जवळजवळ सव्वा महिना उलटला. 
बारशाचा दिवस उजाडला. अगदी सकाळी सकाळी सूर्याच्या उगवतीच्या वेळी प्रतापराव सुकन्याला म्हणाले, 'बघ सुर्याची पहिली किरण पृथ्वीला प्रकाशमान करत आहे. सगळ्या जगाला अंतःकरणातून अंधकारातून बाहेर काढत आहे. म्हणून आपण आपल्या मुलीचे नाव या पहिल्या किरणांना घेऊन येणाऱ्या या दिशेप्रमाणे 'प्राची' ठेवूया. आणि तिचे पूर्ण नाव 'प्राची सुकन्या सरदेशमुख असे असेल."

सुकन्या अगदी आश्चर्य चकित होऊन प्रतापरावांकडे पाहत राहिली. पुढे प्रतापराव म्हणाले, " असे याकरिता की, कर्तृत्व आणि वारशाचा संबंध केवळ मुलांशीच नसतो. हे केवळ तुला, प्राचीलाच नव्हे तर सबंध जगतालाही कळावे. आणि मुलगा झाल्याची शल्य तुझ्या मनात नसावे. म्हणून विशेषत्वाने प्राचीच्या नावा मागे तुझे नाव लावूया."

सुकन्याच्या मनातील सारे मळभ दूर झाले होते. परंतु स्त्री म्हणून, पत्नी म्हणून आणि आई म्हणून तिला तिचा हा सर्वोच्च सन्मान वाटला होता.

हा सगळा प्रसंग आठवून रडणाऱ्या प्राचीतही तिला गोडपणा जाणवत होता. तिने प्राचीला कुठल्याही प्रकारे न समजावून सांगता घट्ट मिठी मारून कुशीत घेतले...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...