भारत अखंड
स्वातंत्र्य मिळवण्याच्या सगळ्या हालचाली सुरू झाल्या होत्या.
इंग्रजांसोबत अनेक चर्चा झाल्या. परंतु आता मिळणारे स्वातंत्र्य खंडित नको आहे.
‘अखंड भारत’ हवा आहे, असा आग्रह सुरू होता.
त्या करिता मोर्चे निघत होते, आंदोलने होत होती.
परंतु दुष्ट इंग्रजांनी धर्माच्या आधारावर ‘अखंड भारत’ खंडित केला.
स्वातंत्र्य मिळाले.
पण आंदोलने थांबली नाही.
आता परत एक वेगळी लाट उसळली होती, ‘भारत अखंड’ ठेवण्यासाठीची.
स्वातंत्र्याचे सर्वेक्षण
स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर एक विदेशी अभ्यासकांचे पथक देशाची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्वेक्षणाकरिता भारतात आले होते.
सरकारकडून परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली होती.
परंतु त्यांनी कोणत्या भागाचे सर्वेक्षण करावे, याचे ‘स्वातंत्र्य’ त्यांना दिले गेले नाही.
वैचारिक स्वातंत्र्य
एक पत्रकार एका वर्तमानपत्रात नोकरीकरिता रुजू झाला.
पहिल्याच दिवशी मुख्य संपादकांनी त्याला आश्वासन दिले,
“पत्रकार म्हणून तुम्हाला तुमचे वैचारिक व लिखाण याचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच."
आणि जाता जाता म्हणाले, “केवळ आपल्या वर्तमानपत्राची 'विचारसरणी' कोणती आहे, हे लक्षात असू द्या.”
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
No comments:
Post a Comment