Thursday, 17 October 2019

गाढवाला गोपाळशेठ म्हणावे


अगदी शुल्लक गोष्टीवरून सुरू झालेल्या गप्पांचे रुपांतर वादांत झाले. मित्र त्याचे म्हणणे मांडत होता. नि मी माझं. वस्तुस्थितीत माणसांच्या अशा वादांच्या विषयांमध्ये त्यांना स्वतःला असे काही करायचे नसते. बहुतांश वेळा गप्पांचे विषय सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी असे जागतिक स्तरावरील असतात. आणि आपलं मत मांडत असताना कुठेतरी त्याचा दुराग्रह होतो. आणि त्याचे रूपांतर पुढे वादांत होत जात असते. असेच त्या दिवशीही झाले.

गप्पांमध्ये मी अगदी संदर्भ देऊन सांगत होतो. माझं मत मांडत होतो. पण सगळं काही कळत असताना, अगदी जिवाभावाचा मित्र मात्र चुकीच्या दिशेने जात होता. त्याचे म्हणणे खोटे आहे, हे बहुदा त्यालाही कळत होते. तरीही तो त्याच्या मतांवर तो ठाम होता. माझी चिडचिड झाली. मी तसाच विषय अर्धवट टाकून निघालो. घरी पोहोचलो.

अर्थात घरी पोहोचल्यानंतर आमच्या मुखकमलावरून बायकोने ओळखलेच,  आज नक्कीच कोणाशी तरी वाद झाला असेल म्हणून.
असा मानसिक हवामानाचा अंदाज बायकां व्यतिरिक्त चांगलं कोणीही सांगू शकत नाही.

हात पाय धुऊन झाल्यावर इतर कोणताही विषय न करता पाणी आणि चहाचा कप पुढे करत तिने थेट प्रश्न केला, "काय, आज कोणाशी भांडण झालं?" बरे झाले तिने विषयाला वाट मोकळी करून दिली म्हणून. मग मी ही मनातील सगळी भडास बाहेर काढली. आणि बोलून मोकळा झालो.
तर त्यावर तिने समारोपाचा विधान केलं,  म्हणाली, "जाऊद्याना, आपण केवळ 'गाढवाला गोपाळशेठ म्हणावे.' "
आणि स्वयंपाकाच्या तयारीला निघून गेली.
मी मात्र आवाक झालो होतो.

माझ्या मित्रा सोबत झालेल्या एकंदरीत वादांवर तिने अगदी रामबाण उपाय दिला होता. समोरचा चुकतो आहे, कदाचित हे त्यालाही कळते आहे. आपल्याला कळत असतंच. पण समोरचा जर स्वत:चे म्हणणे मान्य करत नसेल तर ते म्हणने आपण मान्य करायचे, चुकीचे असताना देखील!
आणि 'गाढवाला गोपाळशेठ म्हणायचे'!!! अर्थात उघडपणे नाही.

वादाने भंडावून गेलेलं माझा डोकं शांत झालं. आणि लहान मुलाला जणू नवीन खेळणी मिळावी, तसा प्रचंड आनंद झाला. खुप वेळ त्या म्हणीच्या भोवती घुटमळत राहिलो. नि मग ठरवलं ज्या ज्या वेळी असे वादाचे प्रसंग निर्माण होतील, त्या त्या वेळेला हाच उपाय अवलंबवायचा, म्हणजे आपल्याला शांतता मिळेल.

या आनंदाच्या मन:स्थिती मध्ये आणखी थोडा वेळ गेला. आणि वीज कडकडावी तसा साक्षात्कार झाला.
मी बसल्या जागेवरून बायकोकडे पाहायला लागलो. की, आजवर कितीतरी वेळा आमच्या दोघांमधील वादांमध्ये तिने माझ्या म्हणण्यात हो मधे हो मिसळले होते. जणू माघार घेण्यात तिचा पुढाकार अनेक प्रसंगांमधे असायचा. मलाही विजयाचा आनंद मिळाला होताच. बहुदा माझा पुरुषीबाणाही तिने जपला होता.
म्हणजे एवढ्या वर्षात मी अनेकदा चुकलो असेल म्हणा, पण त्या प्रत्येक वेळेला बायको शांत राहिली होती आणि मला 'गोपाळशेठ' म्हणाली होती!!!

बापरे! मी मात्र समजायचो बायको खूपच 'शांत' आणि 'समजूतदार' आहे, म्हणून. पण आज कळाले याही पेक्षा ती 'चाणाक्ष' अधिक आहे.

तसा कोणत्याही पुरुषाचा संसार टिकण्यामागे बायकाच असतात म्हणा. पण तो टिकवण्याचा हा आधुनीक मंत्र खूपच भयंकर होता. अर्थात माझ्या दृष्टीने.

मी आजवर घडलेले असे सगळे वादाचे प्रसंग आठवले, आणि त्या-त्या वेळी तिने घेतलेली माघार ही आठवली. थोडासा हिरमुसून गेलो आणि बराचसा सुखावलो देखील.
हवं तर 'गोपाळशेठ'ला आनंद झाला असे म्हणा...

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

Monday, 7 October 2019

साधना रंगदेवतेची


रंगदेवतेच्या साधकांनी केलेल्या परमोच्च  साधनेचे प्रसंग अगणित आहेत. बहुदा रंगदेवतिची साधना करण्याची तयारी बाळकडू मिळाल्याप्रमाणे लहानपणापासूनच अभिजात कलाकारांमध्ये असते. ज्याचे प्रकटीकरण प्रत्यक्षात प्रायोगिक किंवा व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केल्यावर होत असते.  तसेच अशी रंगदेवतिची साधना कुठेना कुठेतरी रसिक प्रेक्षकही करत असतात. सगळेच कलाकार असू शकत नाहीत. पण सगळेच साधक मात्र नक्की असतात. काही रंगमंचावरील तर काही रंगमंचासमोरील.

आणि असाच प्रसंग अनुभवायला मिळाला, तो रंगमंचासमोरील रंगदेवतेच्या साधकाचा.

"काय आपण दर्दी प्रेक्षक आहोत. सतत दीड वर्ष झाले तरी परभणीतील एकही नाटक चुकवले नाही."
अशी आमच्या आजवरच्या एकंदरीत सगळ्याच नाटकांच्या उपस्थितीबद्दल मी आणि माझा मित्र एक नाटक पाहत असताना बोलत होतो. आणि ते खरंही होतं.
सर्वसाधारणपणे कॉलेज संपले की, हे सर्व छंद व्यावसायिक जीवनात लुप्त होऊन जातात. जवळ उरतात त्या फक्त आठवणी. नि मग त्याच आयुष्यभर उगाळात रहायच्या.

पण आम्ही दोघेही कॉलेज संपून नोकरी करत असताना दीड वर्ष झाले तरी कुठलेच नाटक चुकवले नव्हते. म्हणून त्या दिवशी आम्हाला खरोखरच लक्षात आलं होतं की, गेल्या दीड वर्षात घर सांभाळत असताना (तसे पाहता दोघांचेही लग्न झाले नव्हते म्हणा‌‌) नाटकांचं वेड जपलं होतं. बहुदा हा थोडासा अभिमान नि बरचसा गर्व झाला होता.

ज्या गर्वाच्या 'गर्वहरणा'चे नाटक पुढील काही क्षणातच पार पडले. आणि ज्यांच्यामुळे असे झाले ते आजी-आजोबा आमच्या शेजारीच बसलेले होते.
बहुदा त्यांनी आमचे बोलणे ऐकले होते.

थोड्या वेळानंतर आजोबा म्हणाले, "मी पुर्णेत शिक्षक आहे. पुढच्या वर्षी निवृत्त होईन. लग्नाआधी एकटा आणि लग्नानंतर आम्ही दोघं असे परभणीला नाटक पहायला येतोय. संध्याकाळी डबा घेऊन येतो. नाटक साधारण साडेबाराच्या सुमारास सुटते आणि मग रात्री एकच्या रेल्वेने परत जातो. असे आम्ही गेली जवळजवळ २८-२९ वर्ष करत आहोत."

एवढे बोलून आजोबा थांबले. अर्थातच आम्ही नि:शब्द झालो होतो. आमच्या गर्वासमोर आजोबांनी, रंगदेवतेच्या एका निस्सीम साधकाने स्वतःच्या साधनेचा प्रचंड मोठा पडदा मोकळा केला होता.

©हेमंत पोहनेरकर

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...