त्याच्या बोलण्यात कधीही एकही इंग्रजी शब्द यायचा नाही.
ती एकदा त्याला म्हणाली,
‘तुला इतकं साधं आणि शुद्ध मराठी कसं बोलता येतं?’
त्यावर तो उत्तरला,
‘कधीतरी मातृभाषेवरही प्रेम करून बघ.’
त्याच्या बोलण्यात कधीही एकही इंग्रजी शब्द यायचा नाही.
ती एकदा त्याला म्हणाली,
‘तुला इतकं साधं आणि शुद्ध मराठी कसं बोलता येतं?’
त्यावर तो उत्तरला,
‘कधीतरी मातृभाषेवरही प्रेम करून बघ.’
विश्वाच्या पसऱ्यात पृथ्वीचे स्थान एका टिंबापेक्षाही लहान आहे, त्याला विज्ञानशाखेचा अभ्यास करतांना लक्षात आले.
“मग मनुष्याच्या अस्तित्वाचे काय?”, त्याने कुतूहलाने शिक्षकांना विचारले.
त्यावर ते उत्तराले, “अस्तित्वाची काळजी न करता आभाळा एव्हढ मन करुन जगणे”.
वय पुढे सरकत जात होते, तसा तो तिची अधिकाधिक काळजी करू लागला.
एव्हाना तिला कळून चुकले होते, त्याने आपल्या सौंदर्यापेक्षा सदैव आपल्या मनाच्यासौंदर्यावर अधिक प्रेम केले आहे’.
तो विचार करत होता, ‘आपल्या आवडीचा पक्ष सत्तास्थापन करू शकेल का?’
नंतर त्याच्या लक्षात आले, ‘निवडून आलेले सरकार जनतेचेच तर असते’.
एव्हाना लोकशाही रुजत चालली होती.
सर्वच स्तरांवर अनेक प्रयत्नकरुनही मतदानाची टक्केवारी यावेळेंसदेखील वाढली नाही.
त्यावर एका राजकीय विश्लेषकाने विधान केले, ‘नागरिकांना ‘कर्तव्यदक्षता’ हा शब्द केवळ प्रशासनाशी संबंधीत हवा आहे’.
आजोबांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्या त्यांच्या नातवाला मात्र जाणीव झाली होती, ‘कर्तव्य’ सुरू व्हायचे तर वय असते परंतू संपायचे नाही.
‘अठरावं वरीस मोक्याचं’, तरुणांचा मतदानातील सहभाग वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने अशी जाहिरात केली.
टक्केवारी वाढली परंतू अत्यल्पप्रमाणांत.
ते पाहून शिक्षण समितीने ‘मूल्यधिष्टीत शिक्षणप्रणाली’वर भर देण्यास सुरूवात केली.
‘भारतीय राजकारणांत आरोप-प्रत्यारोपांची जागा आता हेवे-दावे किंबहुना प्रतिशोधाने घेतली आहे…’,
एक राजकीय विश्लेषक आपल्या पुस्तक प्रकाशन समारंभात मनोगत व्यक्त करत होते.
त्यांच्या पुस्तकाचे शीर्षक होते,
‘नवमहाभारतातील राजकारण’.
बांग्लादेशातील कट्टरपंथीयांनी इस्कॉन संस्थेला आतंकवादी घोषीत केले.
तेंव्हा भारतीय सनातन संस्थांना काळजी वाटायला लागली.
परंतू त्यांनी लगेचच ‘संघे शक्ती कलयुगे’ या वेदमंत्रांवर काम करण्यास सुरुवात केली.
एका नेते महहोदयांनी ‘निवडून आलो तर एका महापुरुषाचे मंदिर उभारू’, असे जाहीर केले.
त्यावर त्या गावांतील एक ज्येष्ठ व्यक्ती खंत व्यक्त करत म्हणाली,
‘महापुरुषांना देवत्व बहाल केले की नकळत आपण त्यांचे कर्तृत्व नाकारत असतो’.
एका राजकीय पक्षाने एक गठ्ठा मतांसाठी एका संप्रदायाला अमर्याद अधिकार दिले.
काही वर्षांनी घटनेने ते अधिकार रद्द करण्याचा निर्णय दिला.
तेंव्हा त्या संप्रदायातील लोक म्हणू लागले, ‘हा देश आपल्याला राहण्यायोग्य राहिला नाही.’
तिने वयाच्या चाळीशीत मुलीसोबत महाविद्यालयांत प्रवेश घेतला.
एव्हाना तिच्या मुलीला कळून चुकले होते, ‘आपल्याला आवडीचे क्षेत्र निवडण्याचा अधिकार किमान वीस वर्ष आधी मिळाला आहे’.
तो त्याच्या कळत्यावयांत आलेल्या लाडोला वाढदिवसाची काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करत होता.
तितक्यात तीच त्याला म्हणाली, “मी यावर्षीच्या माझ्या वाढदिवसाला तुम्हांसगळ्यांना काही देऊ का?”
तो तिच्याकडे पाहत विचार करू लागला,
‘मला तर ‘समृद्धी’ मिळाली आहे’.
तो तात्विक. ती भावनिक.
एकदा तो भावनिक झाला. तेंव्हा तिने त्याला पूर्णपणे समजून घेतले.
आता त्याला तिच्या सोबत वागण्याचा मार्ग कळाला होता.
‘जय श्रीराम म्हणणारे हिंसक असतात’, असे एका राजकीय नेत्याने विधान केले.
त्यानंतर काही दिवसांनी एका शांतताप्रिय समजाने गणपती मिरवणुकीवर दगफेक झाली.
त्या वेळेला त्या राजकीय नेत्यानी धर्मनिरपेक्षतेचा मार्ग स्वीकारला.
एक मतदार ‘आपल्या आवडीचा उमेदवार निवडून आला नाही. म्हणून आपले मत वाया गेले आहे’, असे समजत होता.
त्यावेळेस लोकशाही विचार करत होती, ‘बहुदा मला भारतात रुजवायला अजून काही द्यावा लागेल’.
मतदारांनी धर्माविषयी बोलणाऱ्या राजकीय नेत्याकडे दुर्लक्ष करत जातीविषयी बोलणाऱ्याला नेत्याला मतदान केले…
असो.
ही राजकीय नेत्याची कथा नाही, दिशाहीन नागरिकाची आहे.
‘माझ्या एका मताने काही फरक पडणार नाही. मी गावाकडे मतदान करायला, या वेळेस येणार नाही’, त्याचा मित्र त्याला फोनवर सांगत होता.
तेंव्हा त्याने मित्राला,
‘हिटलर एकाच मताने निवडून सत्तेत आला होता. नि नंतर जगाचा कसा इतिहास बदलला’ हे सांगितले.
त्यानंतर त्याच्या मित्राने प्रत्येकवेळेस मतदानाचा हक्क बजावला.
त्याने तिला दिवाळीचा फराळ करण्यापासून ते आवराआवारीपर्यंत अगदी सगळयां छोट्या छोट्या गिष्टींमध्ये मदत केली. स्वाभाविकच त्याचे खूप कौतुक झाले. ती मात्र तटस्थपणे विचार करत होती, ‘आपल्याला दोन नाही तर तीन मुलं आहेत’.
ती दिवाळीकरिता आलेल्या सर्व पाहुणेमंडळींना वाटीलावून घरात आली तसा तिला तयार झालेला कामाचा डोंगर दिसला. ती क्षणभर थांबली.
मग तिने गेल्या पाच दिवसांतील गोड आठवणींचा विचार केला. नि पदर कंबरेत खोचला. तेंव्हा कामाचा डोंगर दिवाळीच्या फटाक्याप्रमाणे धुडुंबकन ओडून गेला.
एका नेतेमहोदयांनी निवडणुकीचा प्रचार करतांना एका महिला उमेदवाराविषयी असभ्यतेचे विधान केले.
“माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे”, ही त्यांची त्यावरची सारवासारव.
ती महिला उमेदवार त्यांच्यावर गुन्हा दाखल करत म्हणाली,
“घर असो वा राजकारण महिलांनीच कंबरकसून स्वच्छता केली पाहिजे”.
तो पर्यावरण प्रेमी होता. त्याने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करायचा निश्चय केला होता.
परंतू रशिया-युक्रेन, इस्राईल-हमास यांच्यातील युद्धांमुळे झालेल्या प्रदूषणाचा विचार केला आणि मनसोक्त फटाके वाजवत दिवाळी साजरी केली.
त्याला कोणताही उमेदवार सक्षम वाटत नव्हता. तो NOTA पर्याय निवडून मतदान करणार होता.
एकदा त्याच्या वाचनात आले, ‘NOTA चा लाभ अयोग्य उमेदवारालाच अधिक होतो.
मग त्याने ‘एव्हेलेबल बेस्ट’ हे सुत्र वापरुन मतदान केले.
एका ज्येष्ठ राजकीय विचारवंतांनी भारतीय लोकशाहीचे वर्णन करणारे ‘पक्षीय राजकारण’ असे आपले पुस्तक प्रकाशीत केले.
त्यातील ‘चिंताजनक’ या सदरात ते लिहितात, ‘ पूर्वीच्याकाळी मित्रपक्ष आणि विरुद्धपक्ष, असे दोन पक्ष असायचे. आता मात्र सत्तारूढपक्ष आणि शत्रूपक्ष, असे दोन पक्ष असतात’.
“ ‘सत्तेसाठी अभद्र युती’केल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष लोकशाही कमकुवत करत आहेत”, एक राजकीय विश्लेषक एका मुलाखतीमध्ये आपले मत व्यक्त करत होते.
“मग लोकशाही सक्षम होण्यासाठी काय उपाय?”, मुलखतकाराने त्यांना प्रश्न विचारला.
ते उत्तरादाखल म्हणाले,
“नागरीकर्तव्यांची जाणीव करून देत निद्रिस्त मतदारराजाला जागे करणे”.
एका पक्षाने आपल्या कार्यकाळात जनतेला अनेक मोफत गोष्टी देऊ केल्या.
परंतू जनतेने पुढील निवडणुकीत त्यांना नाकारले.
एका तज्ञ व्यक्तीने या निकालाचे परीक्षण करत विधान केले,
“लोकशाही आता रुजू लागली आहे.”
‘अपेक्षीत उमेदवार निवडून न आल्यामुळे, आपले मत वाया गेले’, असे एका तरुणाला वाटत होते.
‘अज्ञानातून आलेले विचार’, असे म्हणत लोकशाही हे सगळं पाहत होती.
एका राजकीय पक्षाने सत्तेच्या लोभापोटी आपली विचारसरणी बदलली.
आता निष्ठवान मतदाते निष्पक्ष झाले आहेत.
एव्हाना दोघांनाही कळत नाहीये, नुकसान देशाचे होते आहे.
‘मतदान करतांना NOTA चा पर्याय निवडला तर त्याचा फायदा अयोग्य व्यक्तीला होतो’,
एक ज्येष्ठ विचारवंत या आशयाची मांडणी करत होते.
तरीही लोकांना हा विषय पटत नाही, असे त्यांना जाणवले.
मग त्यांनी ‘महाराज धृतराष्ट्र’ यांचे चरित्र कथन केले.
“या देशांत प्रत्येक नेता आपण निवडून यावे म्हणून जोमाने प्रचार करत असतो”,
एक राजकीय विश्लेषक भारतीय लोकशाहीचे चित्रण मांडत होते.
ते पूढे म्हणाले, “मतदार राजाला मात्र त्याच्या एका मताची अजून किंमत ओळखता आलेली नाहीये”.
‘‘राष्ट्र प्रथम’ म्हणणाऱ्या पक्षांनाच मतदान करा’., एका ज्येष्ठ विचारवंताचा या आशयाचा लेख प्रकाशित झाला.
त्यावर ‘वाचकांच्या प्रतिसाद’ या सदरात एका नागरिकाची प्रतिक्रिया प्रकाशित झाली,
‘राष्ट्र प्रथम या संकल्पनेपूर्वी आपण जगातील प्रथम राष्ट्र आहोत,
ही भावना जागृत झाली पाहिजे’.
मास्यांना फिशटँकमध्ये आणून सोडल्यानंतर सुरक्षित वाटायला लागले.
काही वेळानंतर मात्र त्यांना लक्षात आले,
आपण ‘सुरक्षित’तेसाठी ‘स्वातंत्र्याची’ किंमत मोजली होती.
‘बदमाशांचे सर्वात पहिले आश्रयस्थान म्हणजे राजकारण….’,
तो एका ज्येष्ठ विचारवंताचे पुस्तक वाचत होता.
तो क्षणभरासाठी विचलित झाला.
त्याला कळत नव्हते,
‘संविधान वाचवा’ असे कोण म्हणत आहेत?’
“उन्हाळा, हिवाळा, पावसाळा”,
त्याच्या मुलाला ऋतू क्रमाने न सांगता आल्यामुळे तो काळजीत पडला.
मग त्याने स्वतःच्या दिनक्रमात ‘पर्यावरणा’साठी स्थान ठेवले.
तिची किशोरवयीन मुलगी आनंदनगरीतील उंच आकाशपाळण्यात देखील बिनधास्तपणे बसली.
ती मुलीचे ‘धाडस’ अनुभवत होती.
ती घरी आल्यावर त्याला म्हणाली,
“मी उगाच आपल्याला एक मुलगा असावा, अशी अपेक्षा ठेवून होते”.
“आई, तू रोजच नवरात्रीच्या रंगांच्या साड्या घालतेस. मलाही आजच्या निळ्या रंगाचा ड्रेस पाहिजे”, असे म्हणत तिची इटुकली लाडो रुसून बसली.
तिने या क्षणी मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला नाही.
उलट तिला आयुष्यातील एक-एक रंगाचा परिचय करून देण्यास सुरुवात केली.
‘ज्या व्यक्तीच्या माघारी तिच्या विषयी चांगलं बोललं जातं, ती उत्तम व्यक्ती’,
सद् गुरु विषय मांडत होते.
त्यांना भक्तांच्या चेहऱ्यांवर अस्वस्थता जाणवली.
मग त्यांनी लगेचच सोपा मार्ग दाखवला,
‘चांगलं दिसण्यांसाठी मनुष्य जसा प्रयत्न करतो तसां चांगलं असण्यासाठी प्रयत्न करायचा’.
तिने नवरात्रीच्या नऊ दिवसांत उपवासाचेही पदार्थ खाल्ले नाही. असे कठोर व्रत केले.
तिला दशमीला उपवास सोडतांना लक्षात आले होते,
‘आता इथून पुढे ‘जीवनावश्यक गोष्टी’ कशाकशाला म्हणायचे’.
‘पहिली मुलगी होऊ दे’,
तिने देवीला नवस केला.
नि विशेष म्हणजे तिला घरांतील कुणीही विरोध केला नाही.
नंतर तिने मुलगी झाल्यावर तिला पहिले काही शिकवले असेल तर, ते म्हणजे ‘जग कसे ही असो आपण स्वतःहून निर्णय घेणे’.
तिने नवरात्रीच्या दिवसांत शुद्ध तुपाचा अखंड दिवा लावला.
तिच्या किशोरवयीन मुलाच्या लक्षात येत होते,
‘सर्वोच्च गोष्ट प्राप्ती सर्वोत्तम गोष्ट दिल्या शिवाय होत नाही’.
तिने नवरात्रीचे नवरंग म्हणून कपाटातून नऊ साड्या काढून ठेवल्या.
परंतू का कुणास ठाऊक तिला जाणवत होते, देवीच्या पूजेत एव्हढेच पुरेसे आहे, असे नाही.
नि मग तिने देवीच्या पूजेत ‘आत्मरंग’ मिसळला.
तिने देवीच्या नऊ दिवसांच्या नऊ रुपांचे ध्यान केले. तिला अत्यंत शांतता लाभत होती.
तिला दहाव्या दिवसाचे ध्यान करतांना मात्र जाणीव झाली,
आता आपल्याला या रुपात अधिक काळ राहण्याची आवश्यकता आहे.
त्याच्या मित्रांनी वयाचे १८ वर्ष पूर्ण होताहेत म्हणून पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी अर्ज भरला.
तो थोडा वेडा होता.
त्याने मतदार यादीत नाव नोंदवणवियास प्राधान्य दिले.
त्याचे ठाम मत होते ‘सगळे राजकारणी भ्रष्टाचारी आहेत’.
म्हणून त्याने कधीही मतदान केले नाही.
त्याला हे कधीही उमगले नाही की,
समाजातील सज्जनशक्ती मतदान करत नाही म्हणून योग्य व्यक्ती निवडून येत नाही.
तो ‘नवतरुणांचा मतदानांतील सहभाग’ या विषयाचा अभ्यास करत होता.
त्याने एकदंरीत सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून विषय बदलला.
आता तो नव्या विषयाचा अभ्यास करतो आहे,
‘नवतरुणांचा निवडणुकीतील सहभाग’.
“भाषा तीन प्रकारच्या असतात”, तो विद्यार्थ्यांना शिकवत होता.
“पहिली. शब्दांची भाषा”, म्हणत तो वर्णन करू लागला.
त्याची देहबोली आणि डोळ्यांतील भाव पाहून विद्यार्थ्यांना भाषेचे इतर दोन प्रकार देखिल कळाले.
लोकं दोन-पाच वर्षांच्या कार्यकाळातच स्वतःच्या कामाचा संदर्भ द्यायला लागतात.
त्यांनी मात्र चाळीस वर्ष शास्त्रज्ञ म्हणून काम करत असतांना असा अभिनिवेश कधीही बाळगला नाही.
निवृत्तीनंतर आत्मचरित्र प्रकाशित केले.
शिर्षक होते ‘प्र-योगी’.
‘…संत तेथे विवेका असणे की जे’, शिक्षक दृष्टांत अलंकार शिकवत होते.
काही विद्यार्थ्यांना समजला नाही. तेंव्हा त्यांनी परत एक दृष्टांत दिला. आणि असेच पाच-सात वेळेला झाले.
तरीही ते तितक्याच शांतपणे शिकवत होते.
ते पाहून शिक्षकांकडे एक विद्यार्थी पुटपुटला ‘संत तेथे विवेका’.
त्याचा नित्य मद्यसेवनाने मृत्यू झाला.
एव्हाना कोणत्याही गोष्टीतील ‘सातत्य’ मनुष्याला अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाते,
या गोष्टीची प्रचिती त्याच्या मित्रांना आली होती.
त्याने तिला वाढदिवसाची भेट म्हणून ‘पैठणी’ दिली.
मोरांनी पिसारा फुलवून नाचावे तसे काहीसे झाले. नि ती क्षणभर थांबली.
पैठणी मिळाल्याचा आनंद होताच.
परंतू त्याने सर्वसामान्य परिस्थितीत केलेल्या नियोजनाने ती अधिक भारवली.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर काही धर्मांधांनी दगडफेक केली.
त्यावरही सामाजिक सलोखा हिंदुनीच जपला.
या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा हजारोंवर्षांच्या परंपरेची ‘पंथनिरपेक्षतेची’ प्रचिती सर्वांना दिली.
भारतीय शास्त्रज्ञांनी चंद्रयान-४ ची घोषणा केली. तर दुसरीकडे सामान्य भारतीय चतुर्थी, पौर्णिमा आणि अमावस्या यांचे पालन करत होते.
काही पुरोगामी मंडळींना हा विरोधाभास वाटत होता.
परंतू देवी-देवता देखील शस्त्र आणि शास्त्रचे पुरस्कर्ते आहेत, हे ते विसरले होते.
तिच्या तरुण मुलीने ढोल पथकांत सहभागी व्हायचा निर्णय घेतला.
तिनेही क्षणांत होकार दिला.
एव्हाना तिला कळून चुकले होते, ‘वडील नसलेली मुलगी परिस्थीतीशी दोन हात करण्यास सक्षम झाली आहे’.
तिच्या इटुकल्या लाडोबाने गणपतीच्या मिरवणुकीत खूप छान ढोल वाजवला.
त्याच्या ठोक्यावर तिचेही पाय थरकत होते.
ती त्याची संगीत विषयाची आवड ओळखत स्वतःशीच पुटपुटली ‘बाळाचे पाय पाळण्यात’.
एका शहरातील व्यापारीवर्ग जीवघेण्या स्पर्धेच्या युगांत एकत्र येऊन व्यवसायाची देवाणघेवाण करायचे.
अशक्य गोष्ट शक्य कशी झाली, याची पाहणी झाली, तेंव्हा लक्षात आले,
त्यांनी या कृतीला आध्यात्मिक अधिष्ठान देत ‘उद्योग मंत्र’ असे संबोधले होते.
शववाहिका चालकाने बराच वेळ गाडी चालवल्यानंतर रेडिओ सुरु केला.
गाणी वाजायला लागताच मृतव्यक्तीच्या नातेवाईकाला प्रचिती आली,
‘मनोरंजन ही चौथी मूलभूत गरज आहे’.
‘मृत्यू सोबत वैर संपत असतं’, त्याला हे विधान खोटे ठरवायचे होते.
म्हणून मग त्याने प्रत्येकाला क्षमा करण्यास सुरवात केली. त्याला आनंदही होत होता.
नि त्याने एका क्षणी शोध घेण्यास सुरुवात केली की, ‘त्याला कुणी क्षमा केली आहे का नाही?’
त्यावेळेस तो अधिक आनंदी झाला.
एका राजकीय नेत्याने परदेशात जाऊन भारत विरोधी वक्तव्य केले.
एव्हाना सगळ्यांना कळुन चुकले होते,
‘ते मूळ भारतीय नाही आहेत’.
ती महालक्ष्मी समोर ‘शांत मनाने’ हात जोडून उभी होती.
तिला ‘सुखप्राप्तीसाठी काय मागावे’, हे कळून चुकले होते.
वक्फ बोर्डाने एका संपूर्ण गावावरच दावा केला.
गावांतील नागरिकांवर क्षणांत बेघर होण्याची वेळ आली.
परंतू त्यांनी संयमाने जाती-पातीतील भेद विसरत ‘हिंदू’ म्हणून न्यायालयात धांव घेतली.
त्यांना प्रकरण जिंकल्यानंतर लक्षात आले, इथून पुढे आपली एकच ओळख असली पाहिजे.
ती महालक्ष्मीला वाण देत म्हणाली, “आता आयुष्यभराचा मुक्काम माझ्याच घरी कर”.
तिची भक्तीवर प्रसन्न होत महालक्ष्मी खरोखरच थांबली.
एव्हाना तिला कळून चुकले होते ‘चंचल व्यक्ती असते, लक्ष्मी नाही’.
“स्वप्न पाहावी. ती पूर्ण होत असतात”, पॅराऑलिम्पिक मधील एक सुवर्ण पदक विजेता संबोधित करत होता.
एव्हाना श्रोत्यांना परिस्थिती पुढे ‘हतबल होणे’ हा वाक्प्रचार खोटा वाटत होता.
तो नास्तिक होता.
परंतू त्याने एकदा तल्लीन होऊन आरती म्हणणाऱ्या काही भक्तांना पाहिले.
त्या दिवसांपासून त्याचा ‘आर्तभावने’कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
‘नातू म्हणजे दुधावरची साय’, आजी त्याला लाडाने म्हणायची.
त्याला आजीची विशेष आठवण येण्याचे कारण म्हणजे आता तो ही बाप झाला होता. परंतू विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्याच्या मुलाला जीव लावायला आजी जवळ नव्हती.
‘अतित कोण’?, पोळ्याच्या दिवशी आईने त्याच्या डोक्यावर अक्षता टाकत प्रश्न विचारला.
‘मीच’, त्याने देखील प्रथेप्रमाणे उत्तर दिले.
आणि अंतर्मुख झाला.
एव्हाना त्याला एक लेखक म्हणून ‘कल्पनातीत’, ‘शब्दातीत’ विषयांसाठीचे उत्तर मिळाले होते.
त्याने ‘राष्ट्रीय क्रिडा दिवसाच्या शुभेच्छा’ असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते.
ते पाहून त्याचा मुलगा खूप रडला.
त्याने मुलाला खेळात करिअर करायची परवानगी दिली नव्हती.
त्याला एक नवीन कथाबीज सुचले, ‘पतीच्या जाचामुळे पत्नीने केलेली आत्महत्या’.
परंतू तो या कथाबीजाचाचे कथेमध्ये रुपांतर करू शकला नाही.
त्याला राहून राहुन प्रश्न पडत होता ‘मग ‘पुरुषार्थ’ शब्दाला काळीमा तर लागणार नाही.
काही परकीय आक्रमकांचा भारतातील श्रद्धा स्थानांवर हल्ला करणे, हाच उद्देश राहिला.
आज त्यातील प्रमुख एका श्रद्धा स्थानाचे पुनर्निर्माण झाले.
जाणकार मात्र त्यांस ‘राष्ट्र मंदिराचे निर्माण’ म्हणत आहेत.
तो : आपल्याला एकच मुल हवं आहे.
ती : नाही. दोन होऊ देऊ.
तो : एकालाच सर्व काही देऊ.
ती : नी त्या एकाला कुणाचीतरी सोबत नको?
एव्हाना तो दुसरं मुल झाल्यानंतर हस्तांतरित झालेले ‘वडिलपण’ अनुभवत आहे.
त्याला आवडीचे रुपांतर व्यवसायात करू न शकल्याचे शल्य होते.
त्याची मन:स्थिती पाहून पत्नीने त्याला आठवण करुन दिली, ‘आवड प्रियसी प्रमाणे असते. आणि विस्मरणांतच शांती असते’.
त्याला आवडीचे रुपांतर व्यवसायात करू न शकल्याचे शल्य होते.
त्याची मन:स्थिती पाहून पत्नीने त्याला आठवण करुन दिली, ‘आवड प्रियसी प्रमाणे असते.’
ते निवृत्ती नंतर पत्नीला अधिक वेळ देऊ लागले. तिने मात्र एकट्यानेच संसाराचे रहाटगडागे चालवण्याचा निर्णय घेतला.
तिच्या या वयातील बंडाला कारण होते,
पतीने तिची काळजी करण्याच्या दिवसांत स्वतःला कामाला वाहुन घेतलेले.
त्याने चाळीशी ओलांडल्यानंतर दाढी-मिश्या वाढवलेल्या पाहून मित्रांनी खूप मजा घेतली.
त्याला वाटले होते, आता वय दिसले पाहिजे. झाले उलटेच, मित्रांमुळे तारुण्य अधिक अनुभवायला आले.
तो एकदा सहजच म्हणून गेला, “मुलं झाल्यानंतर बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम कमी होतं“.
तिचं जीव लावणं खरंतर त्याला कळालंच नाही.
अनेक वर्षांच्या संसारानंतर त्याला उमगलं, आईनंतर आईसारखी काळजी करणारी तीचतर आहे.
तिच्या इटुकल्या लाडोबाला चांदोमामा खूप आवडायचा. परंतू तो आमावस्येकडे जाणारा चंद्र पाहून हिरमुसून जात असे.
तरीही तिने त्याला कधी समजावून सांगितले नाही.
भावना होती ‘त्याची आयुष्यातील सगळ्या चढ-उतारासाठीची तयारी असावी’.
तो कधी कधी स्वतःच्या निर्णयांवर स्वतःच शंका घ्यायचा.
परंतू काही दिवसांनंतर त्याच्या वागण्यात आमूलाग्र बदल झाला, त्याच्या वाचनात एक लेख आला होता.
शिर्षक होते ‘पूर्व विचार. पूर्ण विचार’.
त्याला सरकारने हाती घेतलेल्या ‘महिला सुरक्षा अभियाना’वर एक गीत लिहून मागितले. नुकत्याच झालेल्या आत्याचाराची पार्श्वभूमी होतीच.
तो विषण्णमनाने ‘रक्षाबंधन’ या पलिकडे काही लिहू शकला नाही.
मुलगा खूप आनंदाने वयोवृद्ध आईला नवीन बांधलेले घर दाखवायला घेऊन गेला.
आईचे डोळे भरून आले.
ती म्हणाली, “आता इथून पुढचे पावसाळे सुखाचे असतील. कारण तू बांधलेले घर गळत नाही”.
त्याने ज्या वयांत प्रेम कविता लिहायची त्या वयांत भारतमातेची आरती रचली.
आई त्याचवेळी समजून गेली, चिरंजीवांनी मोठ्या आईची पूजा आरंभिली आहे.
एव्हाना तिला कळून चुकले होते ‘आपणच मुलाला लहानपणी क्रांतीकारांच्या गोष्टी सांगायचो’.
‘अखंड भारत’ की ‘भारत अखंड’ या दोन संकल्पनेत काही राजकीय मंडळी अडकली होती.
तेंव्हा एका साहित्यिकाने या राजकीय मंडळींना एक पुस्तक भेट दिले.
नाव होते ‘विस्मृत इतिहासाचे परिणाम’.
बांग्लादेशातील हिंदूंवर जीवघेणे हल्ले झाले, अनन्वित अत्याचार झाले तरी त्यांनी देश सोडला नाही.
मुलाखती दरम्यान एक बांग्लादेशी हिंदू म्हणाला, “आम्ही रामाचा वारसा जपतोय. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’.
त्याने दहावीचे महत्त्वाचे वर्ष असे म्हणून तबला वर्ग बंद केला.
त्याला दहावीत तर चांगले गुण मिळाले परंतु बंद पडलेले तबलावादन परत कधीही सुरु झाले नाही.
तो आता मोठं झाल्यावर कामाच्या धकाधकीत ‘आनंद’ शोधतो आहे.
ती नागपंचमीची पूजा करुन कॉलेजमध्ये पोहचली. ‘प्रगत काळातील मागास तरूणी’ म्हणून मैत्रिणींनी तिची अवहेलना केली.
तिने संस्कृतीचा वारसा जपण्यासाठीची ही खूप छोटी किंमत आहे, असे समजत मैत्रिणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.
तिने अनेक वर्षानंतर नागपंचमीचे निमित्तसाधून कंबरकसून मनसोक्त झोका खेळला. हिंदोळे मात्र मनाला बसले.
परंतू ती थांबली नाही.
एव्हाना तिच्या आधुनिक युगातील मुलींना आता आई कमी आणि मैत्रीण अधिक दिसत होती.
एके काळी ‘दिल्लीला जाणे म्हणजे भारतात जाणे’, असे ईशान्य भारतीय म्हणायचे.
एका ‘मूळभारतीय शिक्षण न्यास’ नावाच्या संस्थेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्य सुरु केले.
काही दशकांनंतर मोठे सामाजिक परिवर्तन पाहायला मिळत आहे.
तेंव्हा त्या संस्थेने श्रेय मात्र ईशान्य भारतीय नागरिकांना दिले.
एका राजकीय पक्षाचे अस्तित्व संकटात आले होते. जातींच्चे राजकारणही क्लिष्ट होत चालले होते.
मग त्यांनी ‘धर्मनिरपेक्ष भारत’ म्हणत धर्मावर आधारित आरक्षणचा नारा दिला.
निसर्ग कोपला की मनुष्याचा बळी घेतो. आणि दुसरीकडे प्रफुल्लीत, बहरलेल्या निसर्गाचा बळी घेण्याचे कार्य मनुष्याने सुरू ठेवलेले आहे.
मनुष्याचे दुदैवच.
एव्हाना ‘दोहन’ न उमजलेल्या मनुष्याला निसर्गाने ‘दहन’ दाखवणे सुरूकेले आहे.
आजी इटुकला लाडोबाला शाळेत जाताना स्वतःच्या बूट सोबतच बाबांचेही बूट कपड्याने स्वच्छ करतांना पाहून म्हणाली, “बाळा, बाबांचे बूट का पुसून ठेवतो आहेस?”
“बाबाही ऑफिसला जाताना आजोबांचे बूट पुसून ठेवतो ना!”, लाडोबा उत्तरला.
डोळे भरून आलेल्या आजीने विचार केला, ‘पेरले ते उगवते’.
“बाबा, मोठं झाल्यावर माझाही असा कार्यक्रम करायचा आहे”, एक भरतनाट्यम मधील अरेंगेतरमचा कार्यक्रम पाहताना नृत्याची आवड असलेली त्याची इटुकली लाडो त्याला म्हणाली.
तत्क्षणी त्याने तिच्या भविष्याची चिंता करणे थांबवले.
तो आपल्या ‘पिलाने गरुडझेप घेण्याची क्षमता ठेवली आहे’, या विचारानेच समाधान पावला.
पणजी आजीने गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरु असलेला संतत धार पाऊस थांबावा म्हणून नग्न अवस्थेतील तान्हया बाळाकडून पावसाला चटका दिला.
त्यावर बाळाच्या आईने ‘अंधश्रद्धा’ म्हणून हिणवले.
तो मात्र दोघींनाही समजावत बसला नाही. तो ‘आपले पूर्वज कोपलेल्या निसर्गालाही शिक्षा करण्याची बुद्धी ठेवत होते’ या विचारनेच समाधानी होता.
मुंबईतील मुलांना ‘पाऊस’ विषयावर निबंध लिहायला सांगितले. तेव्हा जवळ जवळ सर्व विद्यार्थ्यांनी पुराचे वर्णन केले.
विद्यार्थ्यांची अशी दशा पाहून शिक्षकांनी आता ‘निसर्ग शाळा’ उपक्रम हाती घेतला आहे.
तो डॉक्टर झाला.
एकदा त्याच्या वाचनात आले,
‘रोग जसे सांसर्गिक आसतात तशी ऊर्जा देखील सांसर्गिकच असते’.
आता तो त्याच्या समुपदेशनानेच अनेक रुग्ण निरोगी होताना अनुभवतो आहे.
‘अभद्र युती हे वर्तमान राजकारणाचे विदारकरुप लोकशाहीला मारक आहे’, असे विधान एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने केले.
त्यावर एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने
‘राजकारणात सदैव मित्र अथवा शत्रु पक्ष असतं नाही’
या त्यांच्याच विधानाची त्यांना आठवण करुन दिली.
सरकारने अपघातातील मृतांच्या घरी काही रक्कम देण्याची घोषणा केली.
अपघातात वाचलेली लोकं आयुष्याची किंमत ओळखून आता वाहने चालवायला लागली होती.
परंतू उर्वरित नागरिकांनी अजून धडा घेतलेला नाही.
दुष्काळ दुष्काळ म्हणतांना ओला दुष्काळ कधी आला कळलेच नाही.
यंदा आनंद साजरा करायचे ठरवले होते. परंतू दुःखाचाच मुक्काम वाढला.
तेंव्हा तिने घरात आलेल्या गंगामाईची ओटी भरली,
भावना होती, ‘किमान पाण्याने का होईना घर भरले’.
‘आजच्या धावत्या युगात गुरुंची आवश्यकता नाही’,
एका कोचनी विधान केले.
त्यानंतर त्यांच्याकडे शिकायला येणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी होत गेली.
परंतू त्यांना त्याचे कारण कधीही कळाले नाही.
‘विशालगडावरील अतिक्रमणाकडे धार्मिक सहिष्णुतेच्या दृष्टीने पहिले पाहिजे’, असे विधान एका ज्येष्ठ नेत्यांनी केले.
दुसऱ्यादिवशी ‘एकांगी सहिष्णुतेचा सांगाती’ या शीर्षकाचा लेख वर्तमानपत्रात प्रकाशित झाला.
“नुस्ती अंधश्रद्धा आहे”,
एक निधर्मी डोक्यावर तुळशीची रोपं घेऊन जाणाऱ्या वारकरींना पाहून म्हणाले.
‘पर्यावरण आणि वारकरी परंपरा’,
या आशयाचा आषाढी एकादशी निमित्त वर्तमानपत्रात आलेला लेख मात्र त्यांनी वाचला नाही.
त्याला तारुण्याच्या उंबरठ्यावर शक्तीची उपासना करायचा छंद जडला.
परंतू त्याने काही दिवसांनी किर्तनकारांना किर्तनांत ‘भक्तीमध्ये अपार शक्ती’ असते’, असे मांडतांना ऐकले.
त्याने आपल्या मनातील गोंधळ बुवांसमोर मांडला.
त्यावर ते म्हणाले, “देवाने मनुष्याला शरीर आणि मन दोन्ही दिले आहे.”
एव्हाना तापमान ४५’ पर्यंत पोहंचले होते.
तिचा इटुकला लाडोबा म्हणाला,
“आई, सूर्यालापण खूप गर्मी होत असेल ना!”
त्यानंतर तिने त्याच्यासोबत जवळ जवळ ५० वृक्ष प्रकारातील रोपे लावली.
मोठं होत जातांना लाडोबाला लक्षात येत होते,
‘पृथ्वीला गर्मी होऊ द्यायची नाही’.
तो हिट अँड रन प्रकरणांत पकडल्या गेला. मृत तरुणाच्या वडिलांनी त्याला माफी मिळावी म्हणून न्यायालयाला विनंती अर्ज दिला.
या उलट अपराधी तरुणाच्या वडिलांना त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयात फिर्याद मांडली होती.
एव्हाना न्यायालयाने ‘बाप माणसाचे’ मन समजून घेण्यासाठी वेळ मागितला.
एक दिसायला अत्यंत सर्वसाधारण मुलगी आरशात तिचे सौंदर्य न्याहाळत होती.
तिला पाहून त्याचे नैराश्य पळाले.
एव्हाना त्याच्या चेहऱ्यावर कोड यायलालागले होते.
व्यवस्थापकांना वधूवर सूचक मंडळात मुलींची नोंदणी मुलांच्या नोंदणीच्या व्यस्तप्रमाणात असल्याचे जाणवले.
खोलवर विचार केल्यावर त्यांची चिंता अधिक वाढली.
त्यांनी सुरुवातीला ‘उच्चशिक्षित मुली’ असे लिहून नंतर ते खोडले. नि नंतर ‘वधूपालक’ लिहून त्यावर बराच वेळ घुटमळत राहिले.
तो छोट्या छोट्या गोष्टींवरून मुलांना खूप रागावयाचा. पुढे मुले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठी झाली.
एव्हाना मुलांना मायक्रोमॅनेजमेंट चांगले जमायला लागले होते.
परिणाम त्यांची कोणतीही नोकरी टिकत नव्हती.
त्याला काहीतरी चुकल्याची जाणीव झाली. आता तो मुलांना छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद शोधायला शिकवतो आहे.
‘जीवन हरवला आहे.
जीवन हरवले आहे.’
वडिलांनी वर्षासहलीत पाण्यात वाहून गेलेल्या तरुण मुलासाठी या दोनच ओळींचा शोकाकुल संदेश वर्तमानपत्रात दिला.
‘गतिशील विकास’.
त्याने हा विषय अत्यंत प्रभावीपणे व्याख्यानात मांडला.
सभागृह बाहेर पडताना त्याला एक तरुण त्याच्या आजोबांचे हात धरुन जाताना दिसला.
त्याने तत्क्षणी व्याख्यानाचा विषय मिळाला, ‘पायाभूत गतिशील विकास’.
तो ‘देश’ आणि ‘राष्ट्र’ या शब्दांच्या गोंधळात अडकला होता.
नंतर त्याच्या लक्षात आले,
‘आपण अजून प्रांतवाद सोडलेला नाही’.
त्याने अनेक मुलींकडून नकार आल्यानंतर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.
एव्हाना त्याला ‘यंदा कर्तव्य आहे’ आणि
‘किंकर्तव्यविमूढता’
हे दोन्ही वाक्य सारखीच वाटायला लागली होती.
‘गत १० वर्षातील भारताची प्रगती’, या विषयावर परिसंवाद सुरू होता.
अध्यक्षीय समारोपात वक्ते म्हणाले,
“प्रगती किती झाली वा नाही झाली यांवर अजूनही संवादसत्र होऊ शकते.
परंतू एक नक्की आहे,
आपण स्वावलंबी भारत होऊ पाहात आहोत”.
त्याची ‘मुलगी पसंत आहे’,
या शीर्षकाची कथा लिहायची राहून गेली.
कारण मुलगा इंजीनियर नाही आणि
त्याचे घर देखील पूण्यात नाही.
‘हिंदू हिंसक आहे’ आणि
‘आतंकवादाला धर्म नसतो’
अशी भूमिका एका विरोधीपक्ष नेत्याने घेतली.
एव्हाना अज्ञानात सुख असण्यापेक्षा
स्वार्थांत सुख अधिक आहे,
हे त्यांना कळून चुकले होते.
#अलक ३८४
‘जयां पुरुषांस ज्याचे ध्यान तयाशी तेची प्राप्त, त्याच्या वाचनात हे समर्थांचे वचन आले.
एव्हाना त्याला ज्योतिष आणि भविष्य यांतील फरक कळाल्यामुळे त्याने वर्तमानावर भर देण्यास सुरुवात केली.
‘जय फिलिस्तीन’ म्हणून एका मंत्री महोदयांनी संसदेत शपथ घेतली.
एव्हाना ‘वंदे मातरम’ हे सांप्रदायिकात वाढवणारे आहे,
अशी म्हणणारी मानवतावादी, धर्मनिरपेक्ष मंडळी त्यांच्या कामात व्यस्त होती.
त्यांनी ‘प्रयोपवेशन’ घेण्याचा निर्णय जाहीर केला. घरातील सर्वांवर जणू आभाळाचं कोसळले.
‘न्यायालय प्रयोपवेशनास अनुमती देत नाही’, त्यांच्या मुलांनी कळवळून मुद्दा मांडला.
ते अविचल राहिले.
एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते, ‘त्यांनी संपूर्ण जीवनच न्यायदेवतेला साक्षी ठेवून व्यतीत केले होते.’
ती त्याची बेकेट लिस्ट पाहून म्हणाली, “एव्हढी मोठी बकेट लिस्ट कधीच नसते!”
तो शांतच राहिला.
तिने पुन्हा ती बकेट लिस्ट पाहिली.
ती त्याने स्वतःसाठी घरातील सगळ्यांची एकत्रित केलेली बकेट लिस्ट होती.
तो : वरकरणी पहिलं प्रेम दुसरं प्रेम असं काही नसतच, असतं ते एक मात्र लग्न.
ती : ‘संलग्न’ एव्हढे जरी तुला कळले असते तरी बरे झाले असते.
‘पहिलं प्रेम’, ती नवऱ्याला माझी ओळख करून देत म्हणाली.
नि मला तिच्यासाठी लिहिलेल्या सगळ्या कविता आठवल्या.
तिने माझा भिडस्तपणा ठेचला होता.
एव्हाना काव्याचा अंतिम आधार घेत, मी पुटपुटलो, ‘न वरा’.
कॉलेज मध्ये असतांना एक मुलगी आवडली होती. तो काळ असा होता की, प्रपोज करायचे धाडसच झाले नाही.
पण कशी का होईना तिला चाहूल लागलीच.
तिने बेंचवर लिहून ठेवले होते, ‘पाहिलं प्रेम‘ आणि त्यावर फुली मारली होती.
१.
तो ‘मल्हार’ नावाने काव्य रचायचा.
अर्थातच स्वतःची जगाला कधी ओळख होऊ दिली नाही.
त्याने ‘आयुष्याच्या संध्याकाळी’ या काव्यात नमूद केले ‘माता-पित्यांनी त्याला ‘मल्हारी-म्हाळसाकांता’च्या चरणी वाहिले होते’.
२.
त्याने आजवर लिहिलेल्या कविता मोजायला सुरुवात केली. त्याने हजारी गाठल्याचे लक्षात आल्यावर मोजणी सोडली.
आणि ‘अनंता’ची कविता लिहिली.
३.
ती कवयित्री होती.
तो : मला कधी कधी मला तुझ्या कविता नाही कळत.
तिने त्याला ‘स्त्रीमन’ न उलागडाता आल्यामुळे क्षमा केले.
©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९
मी भारावलेल्या वातावरणात कविता शब्दबद्ध करत होतो
तितक्यात ती अत्यंत साधेपणांत
परंतु तिच्या मोहक रूपांत समोर प्रकट झाली
म्हणालो, “तू इतक्या लवकर का आलीस”
स्मितहास्यकरत ती तशीच मला भाळत उभी राहिली
मी परत पुढे म्हणालो,
“तुला अजुन मी पूर्ण शब्दबद्ध केले नाही.
तू नंतर ये ना!”
“वेडा कुठला”, ती म्हणाली,
“ मी तुझी कविता नाही,”
“मग”, मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिलो
ती उत्तरली,
“मी तुझी अभिधा आहे…”
तिच्या लाडोबाने शाळेतील कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला नाही.
त्याचा संकोचाचा स्वभाव. तिला खूप वाईट वाटले.
तो तिला म्हणाला, "आई, काय करू, मला सगळ्यांमध्ये जाऊन काही करायला खूप भीती वाटते."
मग तिने त्याला श्यामची आई पुस्तकातील 'श्यामच्या पोहण्या'विषयीची गोष्ट त्याला सांगितली.
नुकत्याच कळायला लागलेल्या तिच्या लाडोबाला उत्कृष्ट नृत्य सादर करूनही बक्षीस मिळाले नाही.
तो म्हणाला, "आई, हि पार्सलीटी आहे."
त्यावर तिने त्याला प्रश्न विचारला,
"बाळा, तुझा नृत्य करण्याचा आनंद तू बक्षिसावर अवलंबून ठेवणार आहेस का ?"
.
शाळेत बक्षीस वितरण झाले.
तिच्या इटुकल्या लाडोबाला एकही बक्षीस मिळाले नाही.
तो हिरमुसून गेला होता.
ती त्याच्या आवडीचे पेढे घेऊन घरी गेली.
घरी गेल्यावर त्याला म्हणाली, "आधी देवाला नैवद्य दाखव आणि मग सगळ्यांना वाट."
"पण आई", तो म्हणाला, "मला तर एकही बक्षीस मिळाले नाही."
त्यावर ती उत्तरली," तू प्रत्येक खेळांत भाग घेतलास ना, त्या साठी हे पेढे आहेत."
एव्हाना विमानाचा वेग ध्वनीच्या वेगा जवळ जवळ जाऊन पोहचला होता.
‘सामान्य माणसाच्या जीवनात काय फरक पडला’, यावर शास्त्रज्ञ विचारविमर्ष करत होते.
तेंव्हा त्यांच्या लक्षात आले,
आपण प्रकाशाचा वेगही साधला तरीही मनुष्याला मनाच्या वेगाचेच वेड अधिक आहे.
तो मुलांवर रागवायचा तेव्हा अक्षरशः भांड्यांतून आवाज यायचा.
त्याची आई त्याला सांगून सांगून थकली तरीही त्याचे ओरडणे थांबणे नाही.
काळ पुढे सरकला त्याची आई आता वयोवृद्ध झाली आहे.
नातवंड तिला श्रवणयंत्र घेण्यापासून परावृत्त करत आहेत.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...