Sunday, 25 November 2018

अभिधा


खरं तर तुला मूर्त रुपात येऊन काही दिवसच झाले आहेत. 

पण माझ्या जाणत्या वयापासून तू माझ्या सोबत आहेस. 

माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून तू सातत्याने मला व्यक्त होत गेलीस.

तुझ अमूर्त रूप मला नेहमीच भगवंताच्या निराकार रुपाची आठवण करून देतं.

तू शब्दांची शक्ती. अगदी साधी सहज सरळ समजून येणारी. कुठल्याही अलंकाराशिवाय. 

तू सातत्याने जाणीवेच्या विश्वात घेवून जाणारी.

तू प्रतिभेचं रूप साकारणारी. तू तेज आणि तिमिराचा अर्थ सांगणारी.

तू उत्पती आणि लय यांची साक्ष देणारी. प्रतिमा आणि प्रतिमान यातील अंतर समजावून सांगणारी.

रूप, रंग, गंध या लेण्यांनासाज चढवणारी. कला, कलाकृती आणि कलाकार यांना शब्दातून व्यक्त करणारी.

तुझ्या सख्या व्यंजना आणि लक्षणा यांच्याशी कोणतीही तुलना न करता सहज सुंदरता जपणारी.

गुंतागुंत, दुर्बोधता, कठीणता उलगडून दाखवणारी.

तू विश्वरूप दर्शन स्पष्टपणे मांडणारी. तू प्रत्यक्ष विनायकाला जयग्रंथात स्थान बद्ध करणारी.

तुझ वर्णन अनादी, अनंत असंच आहे.

जीवनाच्या शेवटच्याक्षणापासून ते आत्म्याच्या प्रवासापर्यंत वर्णन करण्याकरिता केवळ तुझीच तर सोबत आहे.

अभिधा, तुझ्या या निर्गुण, निराकाररूपाचं व्यक्त होणार भांडार आमच्या समोर सातत्याने प्रगट होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

©हेमंत पोहनेरकर

Sunday, 18 November 2018

तिचा मित्र


'त्याची मैत्रीण' हा तिने स्वीकारलेला शब्द.
आणि त्याला न पचणारा विषय म्हणजे 'तिचा मित्र'.

खरं पाहता ‘शक्ती’ ही स्त्रीवाचक. परंतू ती भगवंताने त्याला दिली.
आणि तिला स्वतःला अन्याय झाला असं वाटू नये म्हणून की काय,
मग भगवंताने सहनशक्ती मात्र तिला दिली.

समंजसपणा, नमतेघेणे, जुळवूण घेणे हे तिच्या साठी जणू अलंकारच झाले. आणि ती ते ही आनंदाने मिरवते.

मोकळेपणा, वेळेचं स्वातंत्र्य, विचारांचा-निर्णयांचा अधिकार मात्र
त्याने स्वतःजवळ ठेवला. आणि कदाचित नाव दिलं 'पुरुषार्थ'.

विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य तो ही मान्य करतोच.
पण आचरणाच्या वेळी त्याला कुलमर्यादेचा आधार घ्यावा लागतो.

जणू चारित्र्य संस्थेचा तोच मालक आहे.

शंका हा शब्द तसा नाकारात्मच. पण त्याने जर घेतली तर तिला सकारत्मकतेच वलय प्राप्त होतं. कारण त्याचा विचार हा कल्याणासाठीचाच असतो.
आणि ती ही नेहेमी तेवढीच सोशिक.
वेळोवेळी उत्तर देत आली आहे, त्याने नजरेने विचारलेल्या प्रश्नांची.
उत्तीर्ण होणं श्वासांइतकं आवश्यक असेल म्हणून की काय, ती प्रत्येक अग्नीपरीक्षेत उजळून निघाली आहे.

केवळ तिची एकच अपेक्षा आहे. अधिकार, कर्तव्य या सार्यांना बाजूला ठेवून
तोच जर तिचा मित्र झाला तर तिच मन अधिक हलकं होईल.

 ©हेमंत पोहनेरकर

Sunday, 4 November 2018

मनुष्य



एकात्मवाद, द्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद हे सारे वाद मनुष्याने मनुष्याकरिताच मांडले.
अर्थात सर्वांच साध्य मनुष्याचा मोक्ष हेच होतं.

पण एके दिवशी एक नवाच वाद निर्माण झाला.

हा वाद पंचमहाभूतांमधील होता.

पृथ्वी म्हणाली, "स्पर्शाला अर्थ आणि आकार मी प्राप्त करून दिला".
जल म्हणाले, "मी तर जीवन. माझ्या विना जीवनाची कल्पनाच व्यर्थ".
तेज म्हणाले, "चैतन्य तर माझ्यामुळेच निर्माण झाले".
वायु म्हणाला, "मी तर प्राणवायू. माझ्या संचाराविना सारे काही स्तब्ध".
आकाश म्हणाले, "काम, क्रोध, शोक, मोह, भय मी निर्माण केले. कल्पनाविलास ही मीच".

ही सगळी पंचमहाभूते आपआपल्या मतांवर खूपच ठाम होती.
प्रत्येकजन आत्मस्तुतीच रमाला होता.
आणि शेवटी वाद एवढा वाढला की, प्रत्येक महाभूतानी विभक्त व्हायच ठरवलं.

पण काळाचा महिमा इतका अगाध की,
मोक्षाच्या वाटेवरील मनुष्याला मात्र तिळमात्र काळजी नव्हती.


@हेमंत विनोद पोहनेरकर

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...