Sunday, 20 December 2020

तू मोठा आहेस ना!


'तू मोठा आहेस ना', हे वाक्य ऐकून मी आता खूप कंटाळलो आहे. 'दादा' होण्याचा एवढा मोठा तोटा असतो, हे मला हे वाक्य ऐकून आता कळाले आहे.

मी आठ वर्षांचा आहे. माझी छोटी बहिण चार वर्षांची आहे. पण ती फक्त नावालाच छोटी आहे. तिचीच दादागिरी घरामध्ये असते. ती म्हणेल ती गोष्ट सगळेजणं करतात. आई, बाबा, आजी, आजोबा तिचेच लाड करतात. माझ्यासाठी पण काही गोष्टी घेऊन येतात. पण माझ्या प्रत्येक गोष्टींवर तिचा डोळा असतो. घरात खाऊ आणला की,  एखाद्या खादाडखाऊ राक्षसाप्रमाणे लगेच ती फस्त करते. आणि मी आपला थोडं थोडं करून खातो. जास्त वेळ मजा यावी म्हणून. तर तिला त्याच्यातीलही हिस्सा द्यावा लागतो.

बरं खाण्यापिण्याच्या वस्तू जाऊ द्या. पण माझ्या अभ्यासाच्या आणि खेळण्याच्या वस्तू तर तिच्या कामाच्या नाहीत ना. पण त्यादेखील तिला पाहिजे असतात. आई-बाबा म्हणतात, 'अरे, ती थोडावेळ खेळेल आणि मग टाकून देईल'. पण तसे होत नाही. जोपर्यंत मला अभ्यास करायचा असतो, मला खेळायचं असतं, तोपर्यंत ती माझ्या मागेच असते. माझ्या अनेक होमवर्कवर तिने रंगरंगोटी केली आहे. आणि इथपर्यंत तिला हात लावू दिला तर आई-बाबा मलाच रागवतात. वाक्य तेच, 'तू मोठा आहेस ना! तुला कळत नाही का?'

मला खरंच कळत नाही मी कसं वागायचं? परवा माझा वाढदिवस सगळ्यांनी मिळून खुप छान साजरा केला. सगळ्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणले होते. मला ते गिफ्ट खूप आवडले. मी खूप आनंदी होतो. पण जसे जसे आम्ही गिफ्ट काढून घरात पाहत होतो, तशी या ढमाबाई ने लुडबूड करायला सुरुवात केली.

एक तर मी मुलगा, त्याहूनही माझ्या वयाचे सगळे गिफ्ट वेगळे. पझल, चेस, बुमर असे सगळे. मला सांगा हे सगळे गिफ्ट तिच्या कामाचे तरी आहेत का?

पण नाही. ती खूप रडली. मग मीही खूप रडलो. आई-बाबांना म्हणालो, "उद्या गिफ्ट खराब झाल्यावर मलाच तुम्ही रागवाल."

आणि खरंच असंच होतं नेहमी.

मी असा छोट्या बहिणीमुळे रडायला लागलो की आजी आजोबा म्हणतात, "अरे तू तर लाडोबा आहेस. तुझे खूप लाड झाले. आणि आम्ही प्रत्येक जण अगदी रोज तुझ्यासाठी काही ना काहीतरी आणायचो."

पण या सगळ्याचा काय उपयोग? मला तेव्हा कळत नव्हतं. आणि जेव्हापासून कळत आहे, तेव्हापासून या ठमाकाकूंची दादागिरी पाहतो आहे.

बरं या सगळ्यांच्या गोष्टी आपापल्या सोईप्रमाणे असतात. म्हणजे मला केवळ माझ्या छोट्या बहिणीच्या बाबतीत 'तू मोठा आहेस ना' हे वाक्य ऐकवले जाते. पण मी जर इतर काही गोष्टी करत असेल, आई-बाबा किंवा आजी-आजोबांसोबत जायचे असेल, काही करायचे असेल तर मला लगेच ऐकवतात 'तू लहान आहेस तुला कळणार नाही.'

आता असं दोन्ही बाजूने हे सगळे वागत असतील तर मला कळणार तरी कसं!

पण परवा मला काहीतरी वेगळे कळाले. नाही, यावेळेस मला कोणी समजावून नाही सांगितले. तर त्यांच्या वागण्यातून मला ते कळाले.

खुप दिवसानंतर आत्तू घरी आली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. खूप दिवस राहिली. सोबत दादू, त्याची छोटी बहिण ही होती. आम्ही खूप धमाल मस्ती केली. बाबानीही काही दिवस सुट्टी काढली होती. बाबा आत्तू पेक्षा मोठा आहे. पण बाबा अगदी प्रत्येक गोष्ट आत्तूला विचारून करत होता. तिच्या आवडीच्या वस्तू, तिला फिरायला नेणे, पिक्चर असं सगळं त्याने आत्तूच्या आवडीचे केले. आणि तिच्या सोबत खूप खूप वेळ गप्पा देखील मारल्या.

आत्तूला जेव्हा आम्ही स्टेशनवर सोडण्यासाठी गेलो तेव्हा मला थोडेसे काहीतरी वेगळे कळाले. की, बाबा असं का वागला? किंवा मी दादा आहे, मोठा आहे म्हणजेच कसं वागलं पाहिजे.

जाता जाता आत्तू बाबांना म्हणाली, "दादा, तू अगदी सगळं बाबांप्रमाणे करतो. तू माझा मोठा भाऊ आहे, याचा मला खूप अभिमान आहे."

त्या दिवसापासून मात्र मी ठरवले की, आता हा 'अभिमान' शोधायचा. तो काहीतरी भारी असतो. अगदी गिफ्टपेक्षा ही भारी.

आणि म्हणुन असं काही करायचं की, आत्तूने बोललेले वाक्य माझी छोटी बहिण देखील मला म्हणेल. थोडासा त्रास होईल, ऐकावे लागले तरी ऐकेन ते नेहमीच वाक्य 'तू मोठा आहेस ना'

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 13 December 2020

बस




'बस'. जीला बस म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये 'एसटी' अधिक म्हणल्या गेले किंबहुना अजूनही म्हंटले जात आहे, ती ही 'बस' नेहमीच जवळची वाटत आलेली. बालपणी 'झुक झुक गाडी'चे आकर्षण होतेच. पण मामाच्या गावी किंवा इतर कुठेही जाण्यासाठी सहज उपलब्ध असलेली बसच असायची. त्यामुळे बसचा प्रवास नेहमीच आनंददायी वाटायचा.

आता बस खूप विकसित झाली आहे. साधारण तीस एक वर्षांपूर्वीची ही लालपरी काही वेगळीच होती. खिडकीची जागा तशी सगळ्यांनाच आवडते. पण मला लहानपणी आवडायची ती चालकाच्या मागची लांबलचक सीट. खिडकी पेक्षाही या सीटवर गुडघ्यांवर उभे राहून बस पुढे पुढे कशी जात आहे, हे पाहतानाची गंमत खूप छान असायची. आपल्या शेजारून धावणाऱ्या झाडांपेक्षाही समोरून धावत येऊन मागे जाणारी झाडे आणि केवळ आपल्यालाच दिसणारा समोरचा डोंगर अधिक आनंददायी असायचा.

आपली बस इतर कोणत्याही वाहनाच्या पुढे जात आहे, ही भावनादेखील नसायची. बहुदा असा आविर्भाव चालकांच्याही मनात नसावा, म्हणुनच.

एका संयमी गतीने कुणालाही घाईघाईने न ओलांडता स्वतःचा वेगात सातत्य ठेवत बस पुढे जायची.  तेव्हा रस्ते एकेरी होते. पण तरीही त्या प्रवासाची सुरक्षितता होती. आणि बहुतांश प्रवास हा दिवसाचा असायचा. कुठेही जायचे म्हटले की अंतर उणेपुरे दोन किंवा तीन तासाचे असायचे. क्वचित कधी रात्री देखील बसने प्रवास झाला. त्यात तर गंमत अधिक असायची. दिवसा पाहिलेल्या गोष्टी शोधायचो. किंवा विशेष करून किलोमीटरचा दगड शोधण्यातील मजा अधिक असायची. 

बसने प्रवास करताना वेळ किती लागतो, हा विचारही तेव्हा कल्पनेत नसायचा. उलट आपल्याला एवढे किलोमीटर जायचे आहे याचाच अधिक आनंद असायचा.

स्वाभाविकच सगळ्या सुट्ट्यांच्या कालावधीतच प्रवास व्हायचा. अर्थातच उन्हाळा असायचा, पण बसने प्रवास करताना ऊन खूप आहे, खूप तापले आहे, असे आम्हाला कधी जाणवले नाही. ना कधीही वडीलधाऱ्यांना बोलताना पाहिले. बहुदा बसमधील हा प्रवास सगळ्यांच्या अंगवळनी पडलेला होता. विशेष करून उन्हाळ्यातील.

कदाचीत त्याकाळी कुणी वातानुकूलित बस ची कुणी कल्पनादेखील केली नव्हती. अनुभव तर मुळात नव्हताच. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस अशा तीनही ऋतूंमध्ये प्रवासात कधी 'बस लागली' नाही. पण ज्यांना बस लागते त्यांच्याबद्दल कायमच राग येण्यापेक्षा वाईट अधिक वाटत आलेले आहे. कारण प्रवासाचा आनंद काही वेळ निघून जायचा.

बसमध्ये जागा मिळवणे, हा देखील एक आनंददायी प्रकार असायचा. वयाने लहान आणि प्रकृतीनेही सडपातळ त्यामुळे कधी चालकाच्या बाजूने चढून समोरची जागा मिळवायची. तर कधी उतरत असणाऱ्या प्रवाशांच्या मधून चढून आपल्या आवडत्या जागेपर्यंत पोहोचणे. सारेच मजेशीर असायचे.

बसची वाट पाहणे हादेखील एक आनंददायी प्रकार असायचा. कारण तेव्हा बसची फार वारंवारता नव्हती. त्यामुळे ठराविकच बस पकडावी लागायची. पण त्याही गर्दीमध्ये कधी कंटाळा नव्हता. लिंबूटिंबू होऊन, अर्ध्या तिकिटात खूप प्रवास केला. आजी आजोबांपासून ते आई बाबां पर्यंत सगळ्यांसोबत खूप फिरलो. त्यामुळे बालपणीच्या प्रवासाच्या आठवणी बहुतकरून या बसशीच निगडित आहेत.

आता ही बसने फिरतो. पण एकटाच असतो. नोकरीनिमित्त गावोगावी जावे लागते. बहुतांश वेळा वातानुकूलित बस उभ्या असतात. पण मी मात्र लालपरीतच बसतो. बालपण परत अनुभवायचे असते. पण एक खंत सदैव आहे, चालकाच्या मागची सीट हरवली आहे आणि त्यावरचे बालपण देखील....

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 29 November 2020

अलक


 भांडण

लग्नानंतर नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले. दोघांत कडाक्याचे भांडण झाले. दोघेही आपापल्या मतांवर ठाम होती. तशी ती रागारागात घर सोडून बाहेर पडली. त्यानेही तिला अडवले नाही.

थोड्या वेळानंतर मात्र तो अस्वस्थ झाला. पण स्वतःहून तिला फोन करण्याचे त्याला धाडस झाले नाही. नंतर जवळ जवळ सहा-सात तासानंतर ती घरी परतली. नि सोबत भलेमोठे सामान होते.

म्हणाली, "मला राग आला की, मी मन शांत होईपर्यंत मी शॉपिंग करण्यासाठी जात असते, आजही असेच केले."

त्यानंतर लग्नाला खुप वर्षे उलटली तरी दोघांत कधीही भांडण झाले नाही. अगदी एका अक्षराचे देखील...

एकता

'एकता', त्याने 'उत्स्फूर्त वक्तृत्व' स्पर्धेकरीता चिठ्ठी उचलली त्यावेळेस आलेला हा विषय.

मग पुढील तीन मिनिटांत त्याने 'एकसंघ भारताच्या एकतेतील विविधता मांडली...'

मुहूर्त

एकदा एका भक्ताने सद्गुरुंना प्रश्न विचारला, "एखादी चांगली गोष्ट सुरू करण्याचा मुहूर्त कसा पहावा?"

त्यावर ते सद्गुरू म्हणाले, "खरंतर मुहूर्त पाहून कार्य करणे, ही एक तांत्रिक बाब आहे. पण खरा मुहूर्त तोच ज्याक्षणी तुमच्या मनात ती चांगली गोष्ट करण्याची इच्छा निर्माण झाली..."

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९



Sunday, 1 November 2020

कुरवाळीन दुःखाला

लहानपणी कधीतरी एकदा काटा पायात रुतल्याचे आठवते. त्यानंतर मी स्वतः तो काटा काढायचा प्रयत्न केला. परंतु त्याचा एक छोटासा भाग पायातच राहिला. तो काही केल्या निघाला नाही. आणि नंतर नंतर त्या काट्याचे 'गुदगुद होणे' बरे ही वाटू लागले होते.

हा सगळा प्रसंग याकरिता आठवला की, झालेला त्रास, असलेलं दुःख कुरवाळले की कालांतराने बरे वाटायला लागते. ते दुःख समूळ नष्ट झाले तर कदाचित इतरांसमोर व्यक्त करण्याकरता काहीच शिल्लक राहणार नाही. दुःखाचे ही भांडवल करता येतं, हा खरंतर व्यावहारिक जीवनात पदार्पण केल्यानंतर लागलेला शोध. पण वास्तविक सत्य.

जे दुःख वाट्याला येते किंबहुना ज्या व्यक्तीमुळे येतं खरंतर ते प्रासंगीकच असतं. पण त्या व्यक्ती बाबतीत ते सदैव धरवून ठेवल्या जातं. त्या दुखाच्या प्रसंगानंतर किंवा आधी ती व्यक्ती नेहमीच चांगली वागत आलेली असते. परंतु ही गोष्ट अगदी सोईने विसरली जाते.

दुःखाचे प्रसंग सदैव छोटेसेच असतात. परंतु 'दुःख पर्वताएव्हढे' या उक्तीप्रमाणे त्याला सार्थ केले जाते. आणि 'सुख जवसाचा एव्हढे' असे नाही हे माहित असताना देखील त्यावर प्रयत्न केले जात नाहीत.

किंबहुना दुःख तेरा दिवसांच्या पलीकडे करायचे नाही, हे जणू परंपरेने आपल्याला आजवर शिकलेले आहेच. परंतु गेलेल्या व्यक्ती साठी ही गोष्ट तर लागू होते. आणि  जिवंत व्यक्ती बद्दल मात्र मनात ठेवली जाते.

हे दुःख असे सातत्याने मनात राहण्याचे आणखी एक विशेष कारण आहे.'आपण दुःखाला मोकळी वाट करून देत नाहीत'.

ज्याच्यामुळे दुःख वाट्याला आलेले असते त्याच्याजवळच ते थेट मांडत नाहीत. तर ते दुःख इतरांजवळ मांडतो. 'आपणच कसे बरोबर आहोत आणि ती व्यक्ती कशी चुकीची आहे', असे दाखवून एक प्रकारे सहानुभूतीच आपल्याला मिळवायची असते.

खरेतर ती व्यक्ती चुकली आहे किंवा त्या प्रसंगात तसं वागण्याचा अन्य काही हेतू होता का? हे जाणून घेण्याचा प्रयत्नच होत नाही. आणि शिवाय अशाप्रकारे परत तशी चूक होऊ नये असे त्या व्यक्तीला कळणार तरी कसे?

म्हणून खरेतर अशाप्रकारे आपले दुःख ज्याच्यामुळे वाट्याला आले आहे, त्याच्याजवळच थेट मांडल्याने जेवढं मन हलकं होतं तेवढं ते इतरांसमोर कुरवाळल्याने वाढतचं जातं. आणि थेट त्या व्यक्तीजवळ ते दुःख मांडण्याचं धाडस होत नसेल तर अजूनही मार्ग शिल्लक आहेतच.

'त्या व्यक्तीला माफ करणे'. हा खूप मोठ्या मनाचा मार्ग आहे. अत्यंत अवघड मार्ग आहे.

परंतु यापेक्षाही एक सोपा मार्ग आहेच. झालेल्या प्रसंग आणि ती व्यक्ती या दोन्हींकडे दुर्लक्ष करणे. काही घडलेच नाही या आविर्भावात वावरणे.

'कुरवाळीन दुःखाला' पासून 'सांभाळीन आणि वाढविणं सुखाला' असे तरच म्हणता, करता येईल...

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 13 September 2020

सेलिब्रेशन

 

तो अत्यंत काटकसरी. आणि ती बिनधास्त. हात सोडून खर्च करणारी. पण योग असा की तो तिच्या प्रेमात पडला. आणि तिने देखील होकार दिला.लग्न झाले.

खरंतर दोन विरुद्ध ध्रुवाच्या व्यक्ती एकत्र आल्या होत्या. तसे पहाता दोघांच्याही घरची परिस्थिती सर्वसाधारण होती. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली. पण स्वभावाने मात्र पूर्ण वेगळी.

त्याला त्याच्या वडीलांनी कधी त्याच्या स्वतःसाठी काही खर्च करायला वस्तू, कपडे घेण्यासाठी पैसे दिले तर तो ती वस्तू ते कपडे, बूट इत्यादी लागणाऱ्या वस्तू तर आणायचा पण त्याच्याजवळ काही पैसे देखील शिल्लक राहायचे. ही एकंदरीत त्याची काटकसर.

आणि तिला वडिलांकडून पैसे मिळाल्यानंतर ती ती वस्तू विकत घेऊन घरी यायची. आणि वरतून वडिलांना पैसे मागायची. 'थोडेसे पैसे कमी पडले ते तात्पुरते मैत्रिणीकडून घेतले', आणि शिवाय काही वस्तू विकत घ्यायच्या राहिल्या ते वेगळेच. असा एकंदरीत तिचा स्वभाव.

लग्नाच्या पूर्वी अगदी सुरुवातीला दोघे वारंवार भेटायला लागले, त्यावेळेस त्याने तिला विचारले होते, "तुला काय काय आवडतं?" त्या प्रश्नाचे तिने जे उत्तर दिले होते, त्याने तो प्रचंड धास्तावला होता. ती म्हणाली होती, "मला खरेदी करायला खूप आवडतं."

" आता आपला संसार कसा होणार?", याच विचारात तो सतत असायचा.

लग्नानंतरच्या पहिल्या खरेदीचा प्रसंग आला. त्याने स्वतःच्या मनाची खूप तयारी केली. 'आता बराच खर्च होणार', म्हणून. पण एव्हाना तिलाही त्याचा काटकसरी स्वभाव कळाला होता.

दोघेही बाजारात गेली. घरातील कार्यक्रमानिमित्त सगळ्यांसाठीच काही ना काही वस्तू घ्यायच्या होत्या. नि ती बिनधास्तपणे खरेदी करत सुटली. तिने खरेदी करताना कुठलीही कमतरता ठेवली नाही. अगदी प्रत्येकासाठी तिने खूप छान आणि सुंदर वस्तू विकत घेतल्या.

तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला वाटले होते 'ती थोडीशी समजून घेईल. हात आखडता येईल'. पण उलट ती अजून बिनधास्त झाली होती.

खरेदी करून बाहेर पडल्या नंतर त्याचा चेहऱ्यावरची चिंता आणि तिच्या चेहऱ्यावरुन ओसांडून वाहणारा आनंद टिपण्यासारखा होता.

त्यावर ती म्हणाली, " मी आनंदाचा प्रत्येक क्षण सेलिब्रेट करते. आनंद दाबून ठेवण्यात काय अर्थ आहे? आणि मग खरेदी केली की, मला अधिक मोकळ वाटतं. मग ती खरेदी, तो खर्च स्वतःसाठी असो नाहीतर घरच्यांसाठी."

त्याला खर्चाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला होता. आता तो बिनधास्त होत होता. 'सेलिब्रेशन'चे जणू नवे 'गिफ्ट' त्याला मिळाले होते....


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 6 September 2020

आपली रीत...

कंपनीच्या कामानिमित्त बाहेरगावी नेहमीच जात  असतो. जिथे जे साधन उपलब्ध असेल त्याने प्रवास करावा लागतो, बस, रेल्वे, जीप इ. तसा त्या दिवशी बसने प्रवास करीत होतो. गाडीत गर्दी नव्हती. माझ्या शेजारील सीट रिकामी होती.

बस एका गावाला थांबली. काही बसमध्ये प्रवासी चढले. माझ्या शेजारील सीटवर एक आजोबा येऊन बसले. आणि बसत असताना नकळत त्यांचा पाय माझ्या पायाला लागला. तसे आजोबा लगेच दोन्ही हात माझ्या गुडघ्याला लावून पाया पडले. मी अत्यंत खजील झालो.

दुसऱ्याला पायाला पाय लागल्यावर 'पाया पडणे' हे माझ्यासाठी नवीन नव्हते. पण 'साठी' ओलांडलेल्या व्यक्तीने पाया पडणे, हे मुळीच अपेक्षित नव्हते. मी आजोबांना म्हणालो, "आजोबा, तुम्हाला मी नातवा प्रमाणे आहे, माझ्या उगाच पाया पडलात." त्यावर आजोबा म्हणाले, "पोरा, असं न करून कसं चालल, ही आपली रीत हाय."

खूप समाधान वाटले. अशा व्यक्ती मुळेच संस्कृती टिकून आहे. प्रत्यक्षात जीवनात अशा गोष्टी करणारी पिढी आजही अस्तित्वात आहे, ही गोष्ट पुढच्या पिढीसाठी 'एक आदर्शच' नव्हे तर 'आशीर्वाद'ही आहे. अशा थोरामोठ्या मंडळींनी दिलेल्या अनुभवामुळेच अशा गोष्टी आपणही त्या आचरणात आणण्याची दृष्टी मिळत असते.

परंतु कधीकधी नव्या पिढीकडून आपण आता वेगळ्या संस्कृतीकडे जात आहोत, असे वाटायला लागले आहे. कारण असेच एकदा एका सार्वजनिक ठिकाणी बसलो असताना एक किशोरवयीन मुलगा शेजारी येऊन बसला. नि नकळत त्याचा पाय माझ्या पायाला लागला. आता प्रतिक्रिया साठी मी वाट पाहत होतो. तसा तो मुलगा म्हणाला, "सॉरी हं काका." आणि असे म्हणून चालला गेला.

'प्रत्यक्ष पाया पडणे' वयस्कर व्यक्तींकडून ते 'सॉरी' एका किशोरवयीन मुलांकडून या बदलत चाललेल्या संस्कृतीचा प्रवास मी अनुभवत होतो. 'सॉरी पिढी'ला नाव ठेवता येणार नाही. उपदेश देता येणार नाही. हे मला पक्के जाणवले.

पण पाय लागल्यावर थेट पाया पडणाऱ्या पिढीची या नव्या पिढीची कुठेतरी गाठ घालून द्यावी लागणार आहे. आणि ही वर्तमान पिढीची जबाबदारी आहे, हे मात्र उमगले.

कारण त्या आजोबांचे वाक्य सतत माझ्या कानात घुमत होते. 'ही आपली रीत आहे. सोडून कशी चालेल...'

Sunday, 30 August 2020

कथा स्वातंत्र्याच्या


भारत अखंड

स्वातंत्र्य मिळवण्याच्या सगळ्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

इंग्रजांसोबत अनेक चर्चा झाल्या. परंतु आता मिळणारे स्वातंत्र्य खंडित नको आहे.

‘अखंड भारत’ हवा आहे, असा आग्रह सुरू होता. 

त्या करिता मोर्चे निघत होते, आंदोलने होत होती.

परंतु दुष्ट इंग्रजांनी धर्माच्या आधारावर ‘अखंड भारत’ खंडित केला.

स्वातंत्र्य मिळाले.

पण आंदोलने थांबली नाही.

आता परत एक वेगळी लाट उसळली होती, ‘भारत अखंड’ ठेवण्यासाठीची.


स्वातंत्र्याचे सर्वेक्षण

स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतर एक विदेशी अभ्यासकांचे पथक देशाची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्वेक्षणाकरिता भारतात आले होते. 

सरकारकडून परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली होती.

परंतु त्यांनी कोणत्या भागाचे सर्वेक्षण करावे, याचे ‘स्वातंत्र्य’ त्यांना दिले गेले नाही.


 वैचारिक स्वातंत्र्य

एक पत्रकार एका वर्तमानपत्रात नोकरीकरिता रुजू झाला.

पहिल्याच दिवशी मुख्य संपादकांनी त्याला आश्वासन दिले,

“पत्रकार म्हणून तुम्हाला तुमचे वैचारिक व लिखाण याचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच."

आणि जाता जाता म्हणाले, “केवळ आपल्या वर्तमानपत्राची 'विचारसरणी' कोणती आहे, हे लक्षात असू द्या.”


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 9 August 2020

सु'शांत'

तो अभिनेता. ती अभिनेत्री. दोघांनी काही चित्रपटांमध्ये सोबत काम केले. स्वभाविकच प्रेम निर्माण झाले. प्रेम विवाहदेखील झाला.

पण नंतर नंतर तो चिंताक्रांत व्हायला लागला. नैराश्‍य, वैफल्य हा त्याचा नित्याचाच विषय झाला होता.

आणि अशा विचारातून त्यांने स्वतःला एकेदिवशी संपवून टाकलं.

समाज माध्यमात चर्चेला उधाण आलं. अनेकांनी त्याच्या मृत्यूचे भांडवल करायचाही प्रयत्न केला.

पण ती शांत होती. तिने कोणालाही कसल्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.

कारण तिला त्याच्या सायकॅट्रिस्ट सांगितलं होतं, त्याला अत्यंत दुर्मिळ असा 'ल्यूपस' आजार झाला होता...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

साहित्यीकाचा मृत्यू

एका सुप्रसिद्ध साहित्यीकाच्या अंत्यसंस्कार करिता शहरातील सगळे सारस्वत जमले होते. त्यांना श्रद्धांजली वाहत असताना प्रत्येक जण त्यांच्या प्रचंड मोठ्या साहित्यसंपदेचे गुणगान करीत होते.

प्रतिभावंत, ज्ञानवंत, गुणवंत, किर्तीवंत, इत्यादी विशेषणे तसेच अनेक अलंकार आणि दृष्टांतांनी त्यांच्यावर शब्द सुमने वाहत होते.

प्रत्यक्षात उपस्थितांना असे भासत होते की एव्हाना शब्दांची चिता झाली आहे. आणि ते शब्द त्या महान साहित्यीकाला आता स्वत:त सामावून घेणार आहेत.

पण या अंतिम शब्द यात्रेत त्यांच्या चिरंजीवांचा सहभाग नव्हता. त्यांना त्या महान साहित्यीकाचे एकच साहित्य वाचायची घाई झाली होती. आणि ते म्हणजे त्यांचे 'मृत्युपत्र'.

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

साहित्यीक

खरंतर साहित्यीक होण्याचे त्याचे स्वप्न होते. पण तो 'कंटेंट रायटर' झाला. त्यातही त्याने मोठा नावलौकिक मिळवीला.अमाप प्रसिद्धी मिळविली.

एकदा त्याच्या क्लायंटनी त्याला विचारले,  "स्वतःसाठी काही लिहिता का?"

त्यावर स्मितहास्य करीत तो उत्तरला, "हो. लिहितो ना. पुढच्या महिन्यात मिळावयाच्या असाइनमेंटचे अंदाजपत्रक..."

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 2 August 2020

प्राची सुकन्या सरदेशमुख


शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेली प्राची रडत रडतच घरी आली. तिचे रडणे थांबत नव्हते. बहुदा शाळेत करमत नव्हते, असे तिच्या आई-वडिलांना वाटले. पण थोड्या वेळाने ती शांत झाल्यावर म्हणाली, "मला दोन नावे आहेत का ?"
त्यावर तिचे बाबा प्रतापराव म्हणाले, "तुला तर शंभर नावे आहेत. पिल्लू, गोडंबी, माऊ, चिऊताई... अशी कितीतरी तुला नावे आहेत." अगदी लडिवाळा भाषेत, विषयांतर होऊन ती शांत व्हावी या उद्देशाने ते म्हणाले.

परंतु प्राची मुद्दा सोडायला तयार नव्हती. ती म्हणाली, "मग 'सुकन्या' कोणाचे नाव आहे? तुम्ही मला या नावाने कधी हाक मारली नाही. आज शाळेत उपस्थित घेताना बाईंनी माझे नाव 'प्राची सुकन्या सरदेशमुख' असे घेतले. त्यानंतर वर्गातील सगळ्या मुली मला 'दोन नाव असलेली मुलगी' म्हणून चिडवत होत्या."

आता सारा मुद्दा प्राचीच्या आई-बाबांच्या म्हणजेच प्रतापराव आणि सुकन्या यांच्या लक्षात आला.
आणि सुकन्याच्या डोळ्यासमोर तो सगळा प्रसंग उभा राहिला.

सुकन्या आणि प्रतापरावांना पहिल्या मुलीच्या पाठीवर दुसरी मुलगीच झाली होती. घर तसे संपन्न. शेती, मोठा वाडा, गाडी, गडी, नोकर-चाकर अगदी कशाचीही कमतरता नव्हती. परंतु सुकन्याला एका गोष्टीची कायम खंत होती. की, आपण घराण्याला 'वारस' देऊ शकलो नाही. 

त्यावर प्रतापरावांनी तिला अनेक वेळा समजावले देखील होते. आपल्या दोन्ही मुली आपल्या वारसदार आहेत. मुलीदेखील कौतुक कर्तृत्ववान असतात. म्हणून मुलेच काय तेवढा 'वंश' पुढे नेत असतात तर मुलींचाही वाटा तितकाच अमुल्य असतो.

पण स्वतः उच्चशिक्षित असून ही सुकन्याला तिचं मन सारखं खात होतं. तिने अनेक उपास-तापास केले, अनेक नवस केले, आता तिसऱ्या वेळेला मुलगाच व्हावा म्हणून. परंतु देवाच्या मनात काही वेगळेच होते. तिसऱ्या वेळेस ही मुलगीच झाली.

सुकन्याला अपार दुःख झाले. आपले आयुष्य वाया गेले, असे वाटायला लागले. तिने अबोला धरला. प्रतापरावांनी खूप समजावले. पण तरीही तिला तिचे दुःख शांत करता आले नाही.

मुलगी झाल्यानंतर जवळजवळ सव्वा महिना उलटला. 
बारशाचा दिवस उजाडला. अगदी सकाळी सकाळी सूर्याच्या उगवतीच्या वेळी प्रतापराव सुकन्याला म्हणाले, 'बघ सुर्याची पहिली किरण पृथ्वीला प्रकाशमान करत आहे. सगळ्या जगाला अंतःकरणातून अंधकारातून बाहेर काढत आहे. म्हणून आपण आपल्या मुलीचे नाव या पहिल्या किरणांना घेऊन येणाऱ्या या दिशेप्रमाणे 'प्राची' ठेवूया. आणि तिचे पूर्ण नाव 'प्राची सुकन्या सरदेशमुख असे असेल."

सुकन्या अगदी आश्चर्य चकित होऊन प्रतापरावांकडे पाहत राहिली. पुढे प्रतापराव म्हणाले, " असे याकरिता की, कर्तृत्व आणि वारशाचा संबंध केवळ मुलांशीच नसतो. हे केवळ तुला, प्राचीलाच नव्हे तर सबंध जगतालाही कळावे. आणि मुलगा झाल्याची शल्य तुझ्या मनात नसावे. म्हणून विशेषत्वाने प्राचीच्या नावा मागे तुझे नाव लावूया."

सुकन्याच्या मनातील सारे मळभ दूर झाले होते. परंतु स्त्री म्हणून, पत्नी म्हणून आणि आई म्हणून तिला तिचा हा सर्वोच्च सन्मान वाटला होता.

हा सगळा प्रसंग आठवून रडणाऱ्या प्राचीतही तिला गोडपणा जाणवत होता. तिने प्राचीला कुठल्याही प्रकारे न समजावून सांगता घट्ट मिठी मारून कुशीत घेतले...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Friday, 10 July 2020

दुसरा चहा


रोज सकाळी साधारण सहा सव्वासहाला जाग येतेच. रात्री झोपेपर्यंत बारा वाजलेले असतात, तरीही. पण आता ही नित्याचीच सवय झाली आहे. माझ्या आधीच आई-बाबा उठलेले असतात. आईने सकाळचा पहिला चहा देखील करून ठेवलेला असतो. जो तो आपाप
ला चहा पिऊन घेतो. थोड्या वेळानंतर आंघोळपांघोळ करून सात-साडेसात होत आले की, दुसरा चहा येतो.

यावेळी आई-बाबा आणि मी असे थोडेसे निवांत झालेलो असतो. सकाळच्या एकदम प्रसन्न वेळी खूप छान गप्पा होतात. आई-बाबांच्या प्रकृतीची चौकशी होते. आणि त्यांनाही काही बोलायचे असते, दिवसभराच्या कामाच्या धामधुमीत असा निवांतपणा परत मिळत नाही. बऱ्याच वेळा त्यांच्या अनुभवांचे प्रसंगही ऊर्जा देऊन जातात. धावत्या जगाकडे पाहण्याचा स्थिर दृष्टीकोन मिळतो. 'कष्टातील आनंद' कसा शोधावा, याचा जणू अगदी कमी वेळात परिपाठच मिळत असतो. असो.
तर हे सगळे घडते, ते अगदी सकाळच्या मंगलमय क्षणी आणि दुसऱ्या चहाच्या वेळी.

'चहा' हे खरेच अमृततुल्य आहे. संपर्कपेय आहे. चहा नसता तर खरंच काय मिळालं नसतं, हे कधीच कळलं नसतं. तर असा हा 'चहा' माझा जीव की प्राण आहे.

पण तो सौभाग्यवतींना मात्र आवडत नाही. परंतु घरात आल्या नंतर तिने हे चहाचे गुऱ्हाळ आणि त्यावर होणारे पुराण पहिले. त्या नंतर मात्र ती ही अधूनमधून चहा घ्यायला लागली. ती साधारण थोडीशी उशिरा उठते. म्हणजे माझ्या 'दुसऱ्या चहा'च्या वेळेपर्यंत.

तिचे तोंडधुणे होत आले की, मीच तिला विचारतो, "अगं, तुझ्यासाठी चहा टाकू का?" त्यावर तिचे उत्तर, "राहू द्या!" (यात तिच्यासाठी काम वाढेल, हा भाव असतो) मीच देते करून तुम्हाला." मी निरुत्तर होऊन वर्तमानपत्र चाळत बसतो. नि थोड्या वेळानंतर दुसरा चहा सौभाग्यवतींसह.

आता बोलायचं कमी आणि ऐकायचं जास्त असतं. आणि अधून मधून दुसऱ्या चहाची स्तुती. पण या अगदीच थोड्या वेळात दिवसभराचे सगळे नियोजन होऊन जाते. म्हणजे ऐकून पूर्ण होते!
आता केवळ करायचे शिल्लक राहिलेली असते. त्यातही एखादी गोष्ट 'हो माझ्या लक्षात राहील, मी करेण', असे म्हणण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला. पण नंतर नंतर प्रचिती येत गेली की, आपल्या काही लक्षात राहत नाही. ज्याची उजळणी ती बिचारी लगेच कधीही करून देत नाही. त्यासाठी ती दुसऱ्या चहा पर्यंत थांबलेली असते. तिच्या संयमाचा मला सदैव कौतुक आहे.

तिच्या खरंच कुठलीही यादी न करता सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. आणि मी यादी करून देऊनही विसरतो. पण 'मला तू माझ्यावर रागवलीस की, चहा सोबतचा कुरकुरीतपणा वाढतो', असे सांगायचे असते. पण एवढ्या वर्षांच्या सहवासात ते कधीच जमले नाही.
'दुसरा चहा' गमावण्याची भीती! बाकी काही नाही...

पण ती नित्यनेमाने दुसरा चहा करत राहिली. आता मुले देखील मोठी झाली आहेत. ती चहा घेत नाहीत. पण अधून-मधून मुलगी मात्र दुसरा चहा करून देते. आणि आमच्या गप्पात सहभागी होते. खरंतर मला तिची मदतच होते. थोड्या शिव्या कमी बसतात ना! आणि तिचा मला वाचवण्यावर नेहमीच अधिक भर असतो. 

मग सौभाग्यवती कामाला निघून जातात. आणि मुली सोबतच्या गप्पा वाढायला लागल्या. तिलाही खूप सांगायचे असते. बाबा सगळ्यांत जवळचा आणि पहिला मित्र असतो ना!
मग मी तिच्यासोबत दुसरा चहा घ्यायला लागलो. चहाच्या कपात वादळे असतात, असं ऐकलं होतं. पण मला सातत्याने संबंध आयुष्यभर चहासोबत उत्तरे आणि प्रेम मिळत गेले.

आयुष्य ओसरत गेले. निवृत्तीला आलो. दुसरा चहा सुरूच होता. पण एव्हाना सून आली होती.
तिच्यासोबत पहिल्यांदा दुसरा चहा घेतला. आणि 'बाबा', 'आजोबा' किंवा 'सासरा' म्हणून वागण्यापेक्षा 'नातवा' प्रमाणे वागायला लागलो.

त्याचे श्रेय तिलाच. आता दुसऱ्या चहाच्या वेळी मी बोलत असतो आणि ती ऐकत असते. असे 'जीवाचे कान' करून ऐकणारा श्रोता मला पहिल्यांदाच मिळाला होता.

'संयम, धीर, शांत स्वभाव हा सगळ्या मुलींनाच मिळतो कसा?' हा मला कायम पडलेला प्रश्न होता. ज्याचे सुरुवातीला मी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला देखील. पण नंतर नंतर लक्षात यायला लागले की, तो देह धारण करून आपली आयुष्यभर वेगवेगळ्या रुपात सोबत करत आहे, एवढेच पुरेसे आहे.

जीवनात आई, सौभाग्यवती, कन्या आणि आता सुनबाई अशी सगळीच नाती उलगडताना अनुभवायला मिळाली. ती केवळ 'दुसऱ्या चहा'च्या वेळी...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Friday, 26 June 2020

भेटवस्तू

'एकदा का एखाद्या व्यक्तीला आपलं म्हणून स्वीकारलं की तिचे गुणही आपले आणि दोषही आपलेच', हा जीवनाचा मंत्र त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या लग्नात कानमंत्र म्हणून दिला.

खरंतर सासरी जाणाऱ्या नवरी मुलीला असा कानमंत्र देण्याची प्रथा आहे. परंतु परक्याची मुलगी आपल्या घरात आल्यानंतर तिच्या विषयीचा आपला दृष्टिकोन कसा असावा, याचे जणू स्पष्टीकरण त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले होते. कदाचित, त्याच्या लग्नात त्याला मिळालेल्या सगळ्या भेटवस्तू आणि आशीर्वाद यांच्यापेक्षा काकणभर वर अशी ही गोष्ट त्याला मिळाली होती.

पाठवणीच्या प्रसंगी ती स्वाभाविकच रडावलेली. परंतु आश्वस्त हाताने धरून तो तिला घरी घेऊन आला.

इतर कोणाही सामान्यांप्रमाणेच पाहण्याचा कार्यक्रम, बोलाचाली, साखरपुडा, लग्न इत्यादी कार्यक्रम पार पडले होते. प्रेमविवाह किंवा पूर्वीचा परीचय असे काही नव्हते.

नात्यांची गुंफण उलगडायला लागली. दिवस मागे भराभर पडत होते. आणि अधूनमधून आता कुरबुरही व्हायला लागली. 'नवरा-बायको म्हंटलं की, असे छोटे-छोटे वाद होणारच', असे सुरुवातीला त्याला वाटले. म्हणून त्याने सुरुवातीच्या वादांकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर नंतर प्रकरण वाढत जात होते. त्याने खूप विचार केला. वडिलांनी दिलेला कानमंत्र आठवून तो शांत व्हायचा.
परंतु होणारी ही छोटी-छोटी भांडणे कशी थांबवयाची, यावर त्याला मार्ग सापडत नव्हता.

पाहता पाहता लग्नाला एक वर्ष होत आले. लग्नाचा पहिला वाढदिवस जवळ येऊन ठेपला. पण त्याचे मन अजूनही अस्थिर होते. तिला भेटवस्तू घेण्यासाठी तो खूप फिरला. कोणतीही वस्तू पाहिली की, त्याला काहीतरी उणीव जाणवायची. परंतू ती मात्र खूप उत्साहात होती.

प्रत्यक्ष लग्नाचा वाढदिवसाचा दिवस उजाडला.
घरातल्या घरातच अगदी साधेपणाने खूप छान तयारी तो, ती आणि त्याच्या आईबाबांनी मिळून केली होती. संध्याकाळी गोडधोड केले. जेवणे झाली. त्याच्या आईने त्या दोघांनाही ओवाळले. दोघे आई बाबांच्या पाया पडले. मग तिनेही त्याच्यासाठी आणलेल्या खूप सार्‍या भेटवस्तू त्याला दिल्या.

आणि आता तो काय देतो, यासाठी हात पुढे करून त्याच्या समोर ती उभी ठाकली.
त्यावर त्याने त्याचा हात तिच्या हातात दिला.
पाठवणीच्या वेळी घेतलेल्या आश्वस्त हाताला आता अनुभवाची जोड होती. 

'काय साध्य करायचे', हे त्याच्या बाबांनी सांगितले होतेच, पण ते 'कसे करायचे', हे त्याने शोधले होते.
आणि आता तिच 'भेटवस्तू' 'वचन' म्हणुन त्याने तिला दिली.
थोड्या अधिक प्रमाणात होणारी चहाच्या कपातील वादळं जणू आता शमणार होती.

भारावलेल्या प्रगल्भ स्वरात तो तिला म्हणाला, "मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध अप्रतिमच असतो. पण गजरा करून केसात माळले की, त्याला सौंदर्यही प्राप्त होते. तद्वतच आपल्या या सुंदर नात्यातील वेलीवर प्रेमा सोबतच मी तुझा आनंदाच्या किंवा कसोटीच्या अशा प्रत्येक क्षणी 'आदर'ही करेण..."

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 31 May 2020

खरेमामा-खोटेमामा


अंदाजे इयत्ता तिसरीच्या सुट्ट्या संपून चौथीच्या वर्गात गेलो होतो. शाळेच्या अगदीच पहिल्या काही दिवसांमध्ये केवळ सुट्ट्यांमध्ये केलेली धम्माल मजा एकमेकांना सांगणे, हा एकमेव उद्योग वर्गात सुरू होता. आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गावी जाणे म्हणजे 'मामाच्या गावा'ला जाणे हेच होते. त्याकाळी देखील 'मामाच्या गावाला जाऊया...' या गाण्याप्रमाणे सगळ्या सुट्ट्या अनुभवून आलेलो आम्ही सगळे होतो.

वर्गातील प्रत्येक जण आपापली गंमत, मस्ती, मजा सगळं काही अगदी आनंदाने सांगत होता. मी देखील या उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेली धम्माल मजा सांगितली.

मी अगदी सबंध बालपणात आठवणीत राहिल एवढा माझा जीव की प्राण तो 'आंबा' रोज सकाळ-संध्याकाळ खाल्ला होता. मला आंबा खूप आवडतो, म्हणून मामा रोज आंबा आणायचे. आमरसला अगदी एकही दिवस खंड पडला नव्हता. शिवाय बहीण-भावासोबत खेळलेलो खेळ याची मजा होतीच. पण स्मरणात राहिले ते मामांनी रोज आणलेले आंबे.

पण तेवढ्यात एक जवळच राहणारा मित्र म्हणाला, "का रे, तू तर मागच्या सुट्ट्यात वेगळ्याच मामाच्या गावी गेला होता. आणि या सुट्ट्यात वेगळ्या?"
त्याला बहुदा माझे नातेवाईक, माझे आजोळ माहीत असावे.

त्यावर मी म्हणालो, "अरे! तसे नाही. या वेळेस मी ज्या मामाच्या गावी गेलो होतो ना, ते माझ्या आत्याकडूनचे माझे मामा आहेत."

त्यावर क्षणार्धात तो मित्र म्हणाला, "म्हणजे तू खोट्यामामांच्या गावी गेला होता."

माझा चेहरा एकदमच पडला. मला दुःख कसे व्यक्त करावे ते कळत नव्हते. जणू त्याने माझ्या सर्व आनंदावर विरजण टाकले होते. मी हा धक्का न पचवून स्तब्ध होऊन उभा होतो. बहुदा त्याला माझी व्यथा कळाली असावी.

म्हणून स्पष्टीकरण देत तो म्हणाला, " अरे! असे बघ, आईच्या भावाला आपण नेहमीच 'अरे-तुरे' करत असतो. पण आत्याच्या नवऱ्याला करतो का? नाही ना! म्हणूनच ते नंतर झालेले मामा असतात. आणि म्हणूनच ते खोटेमामा असतात."

त्याच्या तर्कावर मी काहीही बोलू शकलो नाही. केवळ आठवत होतो, मामांनी केवळ आंबे आणलेले नव्हते. तर ते आणत असताना जीवही त्यामध्ये ओतला होता. आणि शिवाय स्वतःच्या मुलांना जेवढा जीव लावला, प्रेम लावले तितकेच मला देखील दिले होते.

पण माझा आनंद मी माझ्या पोटात ठेवून घेऊन गेलो.

त्यानंतर बालपण ओसरत गेले. तारुण्यात पोहोचलो. आणि नंतर शिक्षण आटोपून नोकरीला देखील लागलो. आणि आता जबाबदारीचे दिवस ही पटापट मागे पडत होते. जवळजवळ नोकरी लागल्यानंतरच्या पाच-सहा वर्षानंतर परत एकदा मामांच्या गावाला जाण्याचा योग आला.

मामांच्या गावाजवळ तालुक्याच्या ठिकाणी काम होते. सोबत ऑफिसची गाडी होती. दिवसभराचे काम आटोपले. आणि आता एकदा मामांना फोन करून त्यांच्या गावी जाऊन येऊ म्हणून त्यांना फोन केला. तर मामा नेमकेच तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांना जाऊन भेटलो. मी मामांच्या पाया पडणार तोच त्यांनी माझी गळाभेट घेतली.
खूप ऊर भरून आला.

मग आम्ही दोघेही गाडीत बसलो, मामांच्या गावी जाण्यासाठी. (होय! मी आजही 'मामांच्या गावी' असेच म्हणतो. आत्याचा उल्लेख तर त्यात आहेच, ती तर हक्काची आहेच, म्हणुन..) मामांनी आत्याला फोन करून कळवले, आम्ही येत आहोत म्हणून.

अंतर अगदीच सतरा-अठरा किलोमीटरचे होते. खूपच कमी. पण त्यात ही पूर्णवेळ मामा बोलत होते. गावात झालेले बदल, नवीन आलेल्या गोष्टी ऐकत अंतर जणू क्षणार्धात निघुन गेले. घर जवळ येताच मामांनी गाडी थांबवली. म्हणाले, "तू पुढे हो. मी आलोच."

मी घरी पोहोचलो. आत्याची भेट घेतली. हात-पाय धुतले. तेवढ्यात मामा आले. तर त्यांच्या हातात आंब्याची पिशवी होती.
ती माझ्या हातात देत म्हणाले, "मला अजूनही लक्षात आहे, तुला आंबा खूप आवडतो. पण आता आमरस तर नाही होऊ शकणार. म्हणून तुला सोबत देत आहे."

आत्याने माझ्यासाठी 'भजी-भाता'चा बेत केला होता. पण जेवत असताना माझे सगळे लक्ष मामांनी आणलेल्या आंब्यांच्या पिशवीकडे होते.

नंतर जेवणे आटोपली. थोडावेळ गप्पा मारल्या. आणि मामांच्या, आत्याच्या पाया पडून निघालो. गाडीत बसलो. आंब्याची पिशवी शेजारी ठेवली. नि त्या बालमित्राची आठवण आली. वाटून गेले, 'कोणत्या तोंडाने मामांना मी 'खोटेमामा' म्हणू किंवा समजून देखील...'

नाही. माझ्या मनात त्या बालमित्र विषयी राग मुळीच नाही आहे. उलट मला त्याची आठवण स्वाभाविकपणे राहीलच. कारण जणू त्याचा तर्क खोटा करण्याकरिता माझ्या जीवनात 'खरेमामा' 'खोटेमामा' बनून आले होते. 

काही वर्षांपूर्वी मामा जात राहिले.

एव्हाना मी देखील 'खरामामा'ही झालो आहे. आणि 'खोटामामा' देखील.
पण आता केवळ एकच अपेक्षा आहे, 'माझ्या 'खोट्यामामां'प्रमाणे (बालमित्रांच्या म्हणण्यानुसार) मला 'खरेमामा' होता आले म्हणजे माझ्या मामांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे होईल...'

माहितीस्तव - माझे खरेमामा -
स्व. उदय संतुकराव पांडे, ढाणकीकर
मु.पो.ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Wednesday, 20 May 2020

गर्दीची मानसिकता

कामानिमित्त नेहमीच बाहेर गावी जाणं होत असतं. असेच एकदा पहाटे पहाटे उठून तीन-चार तास प्रवास करून परगावी कामाला गेलो. दिवसभराचे काम आटोपले. जेवण केले. साधारण रात्रीचे नऊ-सव्वा नऊ झाले असतील. परतीच्या प्रवास सुरू झाला. बस पूर्णपणे भरलेली होती. मला अगदी शेवटच्या सीटवर जागा मिळाली. आणि दिवसभर बहुदा पायी चाललो असल्यामुळे की काय आणि नंतर पोटभर जेवण झाल्यामुळे स्वभाविकच बस निघाल्या निघाल्या डोळा लागला.

थोडेसे अंतर पुढे गेल्यानंतर रस्त्यात बस अचानक थांबली. तेव्हा जोराचा आरडाओरडा सुरू झालेला होता. 'बॉम्ब- बॉम्ब' असे प्रवासी ओरडत होते. जो तो जीव मुठीत घेऊन खाली उतरण्याची धडपड करत होता. बायका,मुले, वृद्ध सगळेच घाबरलेले होते. परंतु बसमध्ये अचानक उसळलेल्या या गर्दीमुळे काहीच कळत नव्हते. प्रत्येक जण केवळ एकमेकाला ढकलत बाहेर पडायची घाई करत होता. आणि पुढच्या काही वेळातच सगळे प्रवासी खाली उतरले. परंतु मी आणि माझ्या सीटवरील पाच प्रवासी स्तब्ध होऊन उभे होतो.

कारण आमच्या सीटच्या समोरील सीट खालूनच धूर निघत होता. आणि तो सगळ्या बसमध्ये पसरला होता. परंतु आमच्यापैकी कोणाचीही धाडस झाले नाही त्या सीटच्या पुढे जाण्याचे. बसमधील मागची आपत्कालीन खिडकी उघडण्याचा ही बराच प्रयत्न केला. पण ती खिडकी तारेने भरलेली होती. कारण माहित नाही.
कदाचित काळ आला होता.

पण बहुदा वेळ आलेली नव्हती. रस्ता देखील अगदीच निर्मनुष्य होता. दुसरे कोणते वाहन ही शेजारून गेले नाही. आणि दूरपर्यंत कुठेही प्रकाशही दिसत नव्हता.

काही क्षण नीरव शांतता पसरली. उतरलेल्या प्रवाशांचाही आता आवाज येत नव्हता. थोड्या वेळाने बसमधील तो धूरही बाहेर पडत होता. थोडेसे दिसायला लागले होते. तसा एक तरुण बसमध्ये त्या धूर निघणाऱ्या सीटच्या दिशेने येत होता.
आता बाहेरील प्रवासी पुन्हा ओरडायला लागले. 'नको जाऊ. नको जाऊ', असे ते ओरडत होते. पण तो अगदी शांतपणे त्या सीट जवळ आला. आणि त्याने त्या सीट खाली पडलेली एक छोटीशी सिलेंडरची टाकी बाहेर काढली. आणि बस बाहेर परत चालत गेला. आम्ही देखील त्याच्या मागे अगदी सावकाश आणि खूप अंतर ठेवून खाली उतरलो.

खाली उतरल्यावर तो तरुण म्हणाला, "ही नायट्रोजन सिलेंडरची टाकी आहे. ती आडवी पडल्यामुळे यातून धूर बाहेर आला. पण घाबरण्याचे काहीच कारण नाही. ही टाकी फुटणार नाही आहे."

सगळ्यांना एकदम हायसे वाटले. पण लोकांनी त्याला मारायचेच शिल्लक ठेवले होते, एवढे त्याला बोलले होते. सगळ्यांनी मिळून दिलेल्या शिव्या खाऊन तो तरुण गयावया करायला लागला, रडायला लागला. पण थोड्यावेळानी प्रकरण निवळले. आता सगळ्या प्रवाशांची बस मध्ये परत चढण्याची घाई परत सुरु झाली होती.

मी अगदी बसच्या दाराशी उभा होतो. मी बसमध्ये चढणार तोच अचानक मी मागे वळून प्रवाशांकडे पाहिले आहे. कारण काहीतरी वेगळे वाटत होते. तर लक्षात आले की, प्रत्येक प्रवाश्याच्या हातात स्वतःची पिशवी, बॅग असे अगदी सगळे प्रवासी संपूर्ण सामानासह खाली उतरलेले होते. मी लगेच बस मध्ये चढून फळ्यांवर पाहिले, आता धूर तर मुळीच नव्हता. पण बसमध्ये अगदी नावापुरती देखील एकही बॅग सामानाच्या फळीवर नव्हती.

मी आचंभित होऊन पाहत राहिलो. आताही मनात पूर्वी इतकीच भीती तयार झाली होती. पण तिचे कारण वेगळे होते.
'एकीकडे अत्यंत निष्काळजीपणे सिलेंडरची टाकी घेऊन प्रवास करणारा तो तरुण. आणि दुसरीकडे जीवावर बेतलेला प्रसंग आला असतानाही सगळ्या सामनासह खाली उतरलेले प्रवासी..."

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Saturday, 16 May 2020

छंद

'शाळा सुटली, पाटी फुटली' म्हणत शाळेतून घरी परततानांचा आनंद अनुभवलेले दिवस आजही अगदी स्पष्ट आठवतात. विशेषतः शनिवारी दुपारची अर्धी शाळा संपल्यानंतरचा आनंद खूप असायचा. कारण शनिवारचा अर्धा दिवस आणि रविवारचा पूर्ण दिवस केवळ सुट्टी. म्हणजे खेळणे. धमाल-मस्ती करणे. मनसोक्त त्या सुट्टीचा आनंद घेणे. एवढेच सरळ सोपे जीवन असायचे.
आणि हो! 'छंद' म्हणून करावे असे खरंतर त्या वेळी काही माहीत नव्हते. कळत नव्हते किंवा डोळ्यासमोर तसे फारसे कोणाचे उदाहरणही नव्हते.

काळ मागे पडला. वेगाने पुढे सरकला. इतका की ते दिवस इतिहास जमा झाले असे वाटावे. ते खेळणे, ती धमाल-मस्ती, त्या सुट्ट्या सगळेच केवळ आठवणीत राहिले होते.

परंतु निसर्गापुढे सगळेच हतबल. 'न भूतो, न भविष्यती' असा जागतिक महासंकटाचा, महामारीचा सामना करावा लागेल, असे कुणालाही वाटणे अशक्यच. पण तसे झाले. सगळेच 'स्थानबद्ध' झाले. (मी मुद्दामहूनच 'स्थानबद्ध' हा शब्द वापरत आहे. 'संचारबंदी' सारख्या शब्दांनी परत अनुभवायला मिळणारे बालपण कोमेजेले, ही भीती. एवढेच.) पण ते दिवस कदाचीत अनुभवण्याची परत वेळ आली.

आणि आता घरात मुलांसोबत मनसोक्त खेळ, मस्ती, धिंगाणा करत घालायला सुरुवात झाली. मुलांनाही कधी नव्हे ते आई-बाबा एवढा वेळ घरात म्हणजे पर्वणीच होती. खाणे-पिणे, रोज नवीन पदार्थ, भारतीय, परदेशी सगळेच खाऊन मज्जा सुरू झाली. आणि मग घरात जुने बालपणीचे खेळ ही भरपूर खेळलो.

परंतु काही दिवस उलटल्यानंतर वर्तमानपत्र, टीव्ही किंवा आताच्या अमाप सामाजिक प्रसारमाध्यमांतून सगळ्या स्तरावरच्या घरात असलेल्या लोकांनी जोपासलेले छंद प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली.
खरंतर बालपणीची आपल्याला आवडणारी गोष्ट, आपला 'छंद' कदाचित पुढचे शिक्षण आणि त्यानंतर अंगावर पडलेली जबाबदारी यामध्ये कुठेतरी हरवून गेलेला. परंतु बहुतेकांनी तो जोपासला. परत स्वतःला नव्याने अनुभवण्याचा किबहुना स्वतःच बालपण जगण्याचा तो क्षण. कित्येकांनी या क्षणांचं सार्थक केलं. या संधीचं सोनं केलं.

अशी ही कला जोपासणाऱ्या, छंद जगणाऱ्या सगळ्या अभिजात आणि अज्ञात कलाकारांचे अभिनंदनच. परंतु अशा या सगळ्या अज्ञात कलाकारांच्या कलांच्या सादरीकरणाचा अनुभवणारा आजचा हा काळ वेगळा आहे. खरंतर नुसता वेगळा किंवा नवा असता तर ठीक होते.

पण हा काळ स्पर्धेचा आहे.
होय. 'कलेमध्ये स्पर्धा' ही संकल्पनाच, गोष्टच मुळात पूर्णपणे चुकीची आहे. पण ते आजचे दाहक वास्तव आहे. खरंतर जिथे कला नांदते तिथे केवळ निर्भेळ आनंद असतो. आणि जिथे कलेमध्ये स्पर्धेचा शिरकाव व्हायला सुरुवात होते, तिथे स्तुती मिळवण्याचा हव्यास व्हायला सुरुवात होते. परंतु मनुष्य नकळतपणे या सगळ्यामध्ये ओढला जात असतो. इतरांनी केलं की, 'आपल्याला ते यावं', 'आपणही ते करावं', किंवा 'आपणही काहीतरी छंद जोपासू या आणि आपल्या मुलांना ही तसे शिकवू या' असे कुठेतरी वाटायला सुरुवात होते.

पण मी माझ्या बालपणात मागे वळून पाहिले. मी ज्या ठिकाणी वाढलो, त्या ठिकाणी असे चित्रकला, संगीत, नृत्य, दुर्मिळ गोष्टींचा संग्रह करणे इत्यादी असे काहीच नव्हते. मी तसा आठवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मला काहीच आठवले नाही. आठवत होते ते म्हणजे कुठलीही साधने नसताना सुट्ट्यांमध्ये मित्रांसोबत मनसोक्त आनंदात घालवलेले दिवस. कधीच कंटाळा आला. (नाही, नाही आता तर 'बोअर' असा शब्द वापरायला हवा.) असे बोअर कधी झालेच नाही. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक वेळेस मनसोक्त खेळणे आणि आनंद मिळवणे हाच जणू 'छंद' असायचा.

माझं स्वतःचं बालपण असं असताना मग मी माझ्या मुलांवर ओझं का टाकावं. आणि कला ही तर अभिजात असते ना! मग इतरांची मुले करत आहेत म्हणून मी माझ्या मुलांवर एका अर्थाने अवास्तव ताण तणाव का आणावा. शिक्षणाच्या जगात स्पर्धा आहेच. पण कलेच्या, छंदाच्या जगाला स्पर्धेचे रुप का द्यावे.
आणि मुलांवरही त्याचे ओझे का टाकावे.

मी स्वतः कलाकार कधीच नव्हतो. आणि आता बनणे ही शक्य नाही. सामान्यपणे जीवन जगत असताना सगळ्या अभिजात कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेणे आणि त्यांना मनमुराद दाद देणे, मात्र मला नेहमीच जमत आलेले आहे.
कदाचित तो आनंद मिळवणे हाच माझा छंद असू शकतो!

म्हणूनच मी ठरवले आहे, माझ्या मुलांना कलेसारख्या आनंदाच्या क्षेत्राचा कलाकार बनण्या सोबतच ती कला एक रसिक म्हणूनही अनुभवता येते, निर्भेळ आनंद मिळवता येतो, याचे स्वतः उदाहरण बणून त्यांच्यासमोर ठेवायचे आहे.
म्हणजे त्यांना कलेचे खरे दर्शन होईल.
आणि मग ते ठरवतील की त्यांचा 'छंद' कलाकार होऊन जीवन जगण्याचा आहे की रसिक होऊन...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Saturday, 15 February 2020

सासुरवाशीन




'स्वीकारणे' हा अमूल्य असा दागिना अंगावर परिधान करुन, ती माप ओलांडून माझ्या घरात आली. अर्थात माझी सौभाग्यवती, बायको. बाबांच्या घरचे सगळे मोहपाश तिने मागे टाकले. आणि घरातील प्रत्येक गोष्ट सहजपणे स्वीकारली, अगदी उणीवांसह.
लग्नापूर्वी बोलत असताना कितीतरी वेळा तिच्या तोंडून ऐकायला मिळालं होतं,  'माझ्या बाबांच्या घरी असं आहे, तसं आहे'. अगदी तिच्या सगळ्या नातेवाईकनातेवाईकांविषयी देखील ती भरभरून बोलायची. तिच्या माहेरच्या गोष्टींविषयी 'माझं', 'माझे' या शब्दांचा उल्लेख मी कितीतरी वेळा ऐकाला. आणि विशेष करून 'माझे बाबा' तिच्या रोजच्या बोलण्यात एक अनिवार्य भाग.

त्याच मुलीच्या लग्नाच्या काही दिवसांतच तिच्या माहेरी पहिल्यांदा तिच्या सोबत गेल्यानंतर, तिच्या बोलण्यात एक वाक्य आलं. ज्याने मला आश्चर्य कमी आणि धक्का अधिक बसला.
बोलता, बोलता तिच्या बाबांना ती म्हणाली, 'तुमच्या घरी असं आहे'.
मी केवळ तिच्याकडे पाहतच राहिलो. 'माझे बाबा', 'माझं घर', असे म्हणणाऱ्या मुलीने लग्न होऊन सासरी आल्यानंतर अगदी सहजपणे स्वीकारली आणि त्यानूसार जगयलही लागली. किती सहजपणे ती सासरशी 'संलग्नीत' झाली. जिथे जीवनातील वीस-पंचवीस वर्षे घालवली, त्यांना क्षणार्धात 'तुमचं घर' असं संबोधलं. आणि सासुरवाशिन झाली. या सासुरवाशिनीचा अभिमान वाटला, तो हा पहिला प्रसंग होता.

पण नंतर नंतर तिने अक्षरशः माझ्या घरावर ताबा मिळवला. आता 'माझे घर' केवळ नावापुरतेच राहिले. माझे आई-बाबा तिचे आई-बाबा झाले. माझे नातेवाईक तिचे नातेवाईक झाले. माझी प्रत्येक गोष्ट तिची झाली. ती सहजपणे म्हणायला लागली, 'आपले आई-बाबा'. पण मी प्रयत्न करूनही तिच्या आई-बाबांचा उल्लेख कायमच 'तुझी आई', 'तुझे बाबा' असाच केला. तिच्या इतक्या सहजपणे स्वीकारायला मला जमलेच नाही.

जसजसा अनुभव येत होता, तसे तसे घरातील तिचे महत्त्व वाढत जात होते. माझ्या कौतुकाला अक्षरशः ओहटी लागली होती. आई घरातील प्रत्येक गोष्ट तिला विचारून करायला लागली. लग्नकार्य असो, अन्य कोणताही छोटासा कार्यक्रम असो, मला विचारणारी आई सगळं काही तिला विचारायला, सांगायला लागली. अगदीच 'सुनबाई' वगैरे म्हणणं नाही. पण नावानेच का होईना, कायम तिचेच नाव घ्यायला लागली. खुप प्रेमाने मी तिचे नाव लग्नात बदलले होते. तर त्यावरही सगळ्यांनीच अधिकार गाजवला. मी आपला वरवरच्या कामा पुरता राहिलो. मला घरातील गोष्टी कळायला लागल्या, त्या ठरल्यानंतर. साधी सत्यनारायणाची पूजा करायची आहे, हे प्रथम मला कळले, ते पूजेसाठी आणायच्या सामानाची यादी हातात आल्यानंतर.

हे प्रकरण इतकं हाताबाहेर गेलं की,  नातेवाईकांमध्येही तिचेच नाव ऐकू यायला लागले. पूर्वी नातेवाईकांकडे एकटा जायचो, प्रसंगी आई-बाबांनाही सोबत असायचे, सगळे कसे अगदी छान माझ्याशी गप्पा मारायचे, माझी चौकशी करायचे. पण बायको आल्यापासून नातेवाईकांकडे गेलो तर, केवळ तिच्याशीच गप्पा. तिचीच चौकशी. आणि ती सोबत नसेल तरीही तिच्याच विषयी विचारणार. बायकोने माझ्यावर जादू केली इथपर्यंत ठाऊक होते. पण सगळ्या नातेवाईकांना होईल, याची मुळीच कल्पना नव्हती.
'आपलेपणा' आणि 'अलिप्तपणा' इतक्या सहजपणे सोबत घेऊन ती आली होती की, मी प्रयत्न करूनही तसे वागू शकत नव्हतो. एकदा तिच्या बाबांच्या विषयी काही सुचवण्याचा, निर्णयाचा विषय निघाला. त्यावर ती ठामपणे तिच्या बाबांना म्हणाली, 'तुमचा निर्णय. तुम्ही घ्या. आता माझ्यापेक्षा दादाचा तुमच्या अधिक अधिकार आहे'.

'सासुरवाशीन' झालेली मुलगी कशी असते, हे मी अनुभवत होतो. आणि समृद्ध होत होतो. आणि कदाचित तिने मला दिलेल्या या नव्या अनुभवामूळे की काय मी केवळ आनंदीच झालो नाही तर व्यापक ही झालो. याच विचारांनी मी आजूबाजूला पाहायला लागलो. तर लक्षात आले की, सगळ्याच सासुरवाशीन अशाच असतात. ताई, आई, काकू, मावशी, आत्या, आजी अगदी कुणीही असो सगळ्या एकाच जातकुळीच्या.

जीवनात पहिल्यांदा वाटले की, पोटच्या पोरां व्यतिरिक्त अभिमान वाटावा आणि मनमोकळेपणाने कौतुक करावं अशी परक्याची एकच मुलगी असते. आणि ती म्हणजे बायको. अन्यथा इतरांच्या मुलांची स्तुती आणि प्रगती मनुष्य सहजपणे पाहू शकत नाही, करू शकत नाही. पण 'सासुरवाशीन' वेगळी असते.
आणि कदाचित पूर्वजन्माचे पुण्य आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद म्हणून की काय,  जगातील त्या सगळ्या भाग्यवंतांपैकी मी ही एक झालो, ज्याच्या पोटी देवाने मुलगी दिली.

आजही तो प्रसंग आठवतो. दवाखान्यात होतो. डिलिव्हरीचा दिवस होता. डॉक्टरांनी आवाज दिला. बोलावून सांगितले 'मुलगी झाली' आहे. पेढे आधीच आणून ठेवले होते. आई बाबांना पेढे दिले.  पाया पडलो. आणि वेड्यासारखा व्हरांड्यातील सगळ्यांना पेढे वाटायला लागलो.  आनंदाने सांगत होतो, 'मुलगी झाली आहे', 'मुलगी झाली आहे'. पेढे वाटता वाटता एका आजोबांनी कदाचीत खात्री करण्याच्या उद्देशाने की काय परत विचारले 'मुलगा झाला वाटते'.
अगदी नि:शब्द होऊन उभा राहिलो. आणि मनातल्या वाटून गेले, 'कुणाचेतरी घर संपन्न आणि समृद्ध करण्यासाठी माझ्यापोटी 'सासुरवाशीन' आली आहे...'

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९


Sunday, 2 February 2020

कर्तव्य आणि निवृत्ती

सचोटी, प्रामाणिकपणा, अपरिमीत कष्ट, मनमेळाऊपणा, साधेपणा आणि अगदी कोणत्याही क्षणी कशाचाही विचार न करता मदतीला धावून जाणे, अशी कितीतरी स्वभाववैशिष्ट्ये त्याच्या बाबांची सांगता येतील. याचा अनुभव त्यांच्या सहकाऱ्यांनी, वरिष्ठांनी, मित्र, नातेवाईक अशा सगळ्यांनीच अनुभवलेला. एकार्थाने  कर्तव्यदक्ष असे व्यक्तिमत्त्व म्हणजे त्याचे बाबा.

जे आज निवृत्त होत होते. अपार कष्ट करून छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करायचे काम, त्याच्या बाबांनी केले होते. त्यांच्या संस्थेचा नावलौकिक पंचक्रोशीत पोहोचलेला होता. पण ठरलेल्या नियमानुसार, वयोमानानुसार सगळ्यांप्रमाणेच त्याचे बाबा देखील आज निवृत्त होत होते.

निवृत्तीच्या निरोप समारंभात सगळेच भाऊक झाले होते. त्याच्या बाबांनीही एवढे सगळे कर्तृत्व असताना श्रेय सहकाऱ्यांना द्यायला ते विसरले नाहीत. आणि सर्वां विषयीची कृतज्ञता देखील त्यांनी व्यक्त केली.

पूढे अध्यक्षीय समारोपात त्यांच्या नवीन सहकाऱ्यांनी एक विधान केले ज्याचा ठाव उपस्थितांच्या काळजाने घेतला. ते म्हणाले, "आपण साक्षीदार आहोत या क्षणाचे की, प्रत्यक्ष 'कर्तव्य' निवृत्त होत असताना आपण पाहत आहोत."

अर्थात संस्थाचालक एका अर्थाने त्या संस्थेचा पालक असतो. आणि म्हणूणच वडिल कार्याने निवृत्त जरी झाले तरी कर्तव्याने कधीही होत नसतात. पण संस्था म्हणून असे होत होते हे मात्र निश्चित.

आणि या गोष्टीने त्यांच्या मनात घर केले. वरकरणी पूर्वीचा माणसांचा राबता आता घरात असणार नव्हता. आता पूर्ण दिवस अगदी निवांत असणार होता. आणि अशा दिवसांना सुरुवात देखील झाली. पण अविरत काम करत असलेल्या त्याच्या बाबांचा आता दिवस जाईनासा झाला. म्हणून त्यांनी विरंगुळा म्हणून अन्य सामाजिक, धार्मिक, सेवाभावी, पेन्शनर्स  असोशियन अशा वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेळ घालायला सुरुवात केली. पण त्यासोबतच प्रकृतीच्या ही अडचणी होत्याच. मधुमेह, रक्तदाब, गुडघेदुखी यामुळे येणारी पथ्ये आजपर्यंत कधीही पाळली नव्हती. पण 'आता आपल्यामुळे मुलांना त्रास नको', अशा भावना त्यांच्या मनात घर केले.

थोडेसे दिवस बदलत गेले. तो कामावरून घरी यायचा. तेव्हा स्वभाविक बाबा घरी असायचे, आजवर तो बाबांसाठी सोबत जेवायला थांबलेला असायचा,  आता बाबा त्याच्यासाठी थांबत होते. मग ताटांवर बसल्यानंतर खूप प्रयत्नपूर्वक बाबा सांगायचे की, 'आज कुठे कुठे गेलो होतो. आजचा दिवस कसा घालवला. आणि अगदी पूर्वीप्रमाणेच काहीही जबाबदारी नसतानादेखील व्यस्तता आहे', असं सांगायचा प्रयत्न करायचे.

परंतु दोघांनाही कळायचे, ही वरवरची मांडणी आहे म्हणून. पण समोर आलेल्या प्रसंगापूरती स्तुती करून तोही निघून जायचा.

कितीही नाही म्हटलं तरी निवृत्तीनंतर त्यांच्यावर खूप बंधने आली होती. हळूहळू  त्यांची कासावीस वाढत जात होती. खूप वाढत जाणारी ही तळमळ पाहून एके दिवशी जेवणे आटोपल्यानंतर तो बाबांना म्हणाला, "चला, आपण लॉन्गड्राईव्हला जाऊ या. आणि तुमच्या आवडीचे आइस्क्रीम खाऊया".

तो आपल्याला काही बोलणार आहे. हे त्याच्या बाबांना एव्हाना कळून चुकले. कारण अशा प्रसंगाचा अनुभव त्यांनी स्वतः त्याला दिला होता. त्याच्या दहावीनंतर तो मोठ्या शहरात पुढील शिक्षणासाठी गेला होता. पण रोज एव्हढया माणसांमध्ये वावरणारा तो, त्याला अगदी एका खोलीत आणि परक्या गावात रहाणे अशक्य झाले होते. अगदी खूप रडून रडून तो परत आला होता. तेव्हा त्याच्या बाबांनी त्याला गाडीवर बसवून असेच दुरू त्याच्या आवडीची आईस्क्रीम खायला नेले होते. आईसक्रिम खात असताना बाबा त्याला जे म्हणाले होते त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. उत्तरोत्तर अधिक पुढच्या शिक्षणासाठी अधिक मोठ्या शहरात गेला. व अधिक अधिक प्रगती केली. त्याचे बाबा त्याला म्हणाले होते, "तुला करमत नसेल तर तू निर्धास्तपणे परत ये. आपल्या गावातही चांगले शिक्षण आहेच. पण निर्णय विचार करून घे. आणि एवढे नक्की समज की, तू घेतलेला निर्णय मग तो कोणताही असो तुझा निर्णय तो माझा निर्णय असेल. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या पाठीशी असेण".

कोण उत्साह, विश्वास आणि धैर्य त्याच्यात आले होते. या विश्वासपूर्ण वक्तव्यानंतर त्यांनी सातत्याने प्रगती केली होती. आणि आता तो मोठा झालेला होता. निवृत्त झालेल्या बाबांना सोबत घेऊन जात होता.

त्याने एका हातात आईस्क्रीम बाबांना दिले आणि त्यांचा दुसरा हात स्वतःच्या हातात घेतला. कितीतरी वर्षानंतर त्याने बाबांना स्पर्श केला होता. टचकन दोघांचेही डोळ्यात पाणी आले. तो पुढे म्हणाला, "मला ठाऊक आहे, तुम्हाला कोणता प्रसंग आठवला असेल. आणि मी ही अगदी तसेच सांगणार आहे. तुम्ही आजपासून कोणतीही बंधने पाळायची नाहीत. अगदी प्रकृतीची देखील. तुम्हाला पाहिजे तिथे, पाहिजे तेव्हा, पाहिजे ते करा. पाहिजे तिथे जा. शांत बसलेले बाबा मी पाहू शकत नाही. कारण तुम्ही माझ्यातील उत्साह आणि चैतन्य आहात. आणि हो माझा या गोष्टीवर मुळीच विश्वास नाही की, 'कर्तव्य निवृत्त झाले आहे' ".

ओघळणारे अश्रु बाबांनी पुसले. आता त्यांनी त्याचा हात हातात घेतला आणि उत्तरादाखल म्हणाले, "हो खरे आहे. कर्तव्य कधीही निवृत्त होत नसतं. झालेच तर ते केवळ हस्तांतरित होतं. जसे या क्षणाला मी माझे कर्तव्य तुझात अनुभवत आहे".


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 19 January 2020

लग्नानंतरची माणसं ( तो, ती आणि त्यांच्या कथा)


"लग्नानंतर माणसं खूप बदलून जातात". तिची अनुभवी मैत्रीण तिला म्हणाली. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल मैत्रिणीला खूप काही सांगत होती. तसे पाहता तिचा काही प्रेमविवाह नव्हता. पण तिच्या मैत्रिणीच्या या विधानानंतर तिचं भरभरून बोलणं एकदमच थांबलं.

लग्न ठरल्यानंतर त्या दोघांच्या खूप भेटी होत होत्या. स्वभाविकच प्रेमातील काही वचनंही दिली गेली होती. 'तिच्यावरचे प्रेम कधीही कमी नाही होऊ देणार', 'तिची जीवनभर काळजी घेईन', अशा आशयाची वचने.
किंवा त्याचा नोकरीच्या सगळ्या वेळा सांभाळून तिला आवर्जून भेटणं आणि तिच्यासाठी काहीतरी भेट आणणं. हे तिच्यासाठी सारंच सुखकारक होतं.

पण मैत्रिणीच्या बोलल्यानंतर ती खूप दुखावल्या गेली. खरंतर नव्या संसाराला नेमकी सुरुवात होणार होती. त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या चांगल्या-वाईट प्रसंगाचा अनुभव वेळेनुसार मिळणार होताच. तिने बराच विचार केला. आणि मोकळेपणाने त्या दोघांच्या पुढच्या भेटीत त्याला मैत्रिणीने सांगितलेली वाक्य तिने सांगितले.

स्वाभाविकच त्याच्यासाठीही तो धक्का होता. तिच्याप्रमाणे तो ही अंतर्मुख झाला. पुढे काही क्षण दोघेही शांतपणे बसले. मग थोड्या वेळाने तो निघून गेला. जात असताना 'येतो' देखील म्हणाला नाही. आता मात्र ती खूपच रडावली.

दिवसात आठ-दहा फोन आणि किमान एक भेट हा नित्याचा क्रम आता थांबला. त्याने जवळजवळ आठ दिवस तिला फोनही केला नाही. ती बिचारी मात्र त्याच्या फोनची आणि भेटीची अशी दोन्हीच्याही प्रतीक्षेत राहिली.

पण तो खूपच अंतर्मुख झाला होता. कारण हा प्रसंग त्याच्यासोबत दुसऱ्यांदा घडत होता. तो पदवीच्या शिक्षणाच्या निमित्ताने शहराच्या ठिकाणी त्याच्या काकांकडे काही दिवस राहायला होता, तेव्हा त्याची धाकटी चुलत बहीण त्याला अशाच आशयाचे वाक्य बोलली होती. की, 'एकदा का नोकरी-व्यवसाय सुरू झाला की, कुणी लक्षात ठेवत नाही. आणि कुणी परत साधं भेटायलाही येत नाही.' त्यावेळेस 'माझ्याबाबतीत तरी असं काही होणार नाही', असं तो बहिणीला ठामपणे म्हणाला होता.

पण त्यानंतर त्याचे पदव्युत्तरचे शिक्षण झाले आणि नोकरीलाही तीन-चार वर्ष होत आली होती. आणि या तीन चार वर्षानंतर तोच प्रश्न नव्या स्वरूपात आणि नव्या व्यक्तीमार्फत समोर आला होता. आणि खरंच तो त्याच्या चुलत बहिणीला या तीन-चार वर्षात भेटलाही नव्हता.

आता मात्र जीवनातील वास्तविकतेची जाणीव त्याला झाली. त्याने मग तिला खूप विचारपूर्वक अगदी एका ओळीचे पत्र  लिहीले. पत्रातील ती एक ओळ वाचून ती  सुखावलीच नाही तर स्थिरावली देखील. कारण त्याने कोणतेही 'कारण' दिले नव्हते. एक ओळीचा एक छोटासा प्रश्न विचारला होता. ज्याची तिने मूकसंमती देऊन टाकली होती.
आणि तो प्रश्न किंवा ती ओळ होती,
'लग्नानंतर बदलणाऱ्या माणसांकडे जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर येत जाणाऱ्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणारी माणसं, या दृष्टिकोनातून पाहूया का?'


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

Sunday, 12 January 2020

खर्चास कारण की...


बायको.
छे! छे! कृपया गैरसमज करून घेऊ नका.  खर्चास कारण बायको मुळीच असू शकत नाही.
अहो! प्रश्न कधीही अवघड नसतात. त्रासदायक असतात ते मूळ प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर उत्तरातून निर्माण होणारा पोटप्रश्न. म्हणूनच खर्च झाला तर ज्येष्ठ, जाणकार आणि अनुभवी मंडळी म्हणतात, "ठिक आहे. खर्च झाला तर होऊ दे. पण काही बचत आहे का? गुंतवणूक आहे का?" आता हा पोटप्रश्न निरुत्तरित करणारा असतो. अगदी कधीकधी वैफल्यग्रस्त करणारा देखील असतो. पोट प्रश्नाचे उत्तर जर सकारात्मक असेल तर मूळ प्रश्न सहजपणे हाताळल्या आणि सोडवल्या देखील जातो. पण तेच पोटप्रश्नाचे उत्तर नकारात्मक असेल, तर अवघड होऊन बसते.

म्हणून मी निर्माण होणाऱ्या पोट प्रश्नाचे उत्तर आधीच देऊन टाकले. 'गुंतवणूक, बचत आहे का?' या पोटप्रश्नाचे उत्तर आहे, 'होय आहे.' आणि ते उत्तर आहे, 'बायको'.

बायको आपल्या भविष्याची, संसाराची सगळ्यात मोठी गुंतवणूक असते. (असे माझेच नाही तर सगळ्यात संसारवीरांचे प्रामाणिक मत आहे).
या 'गुंतवणुकी'चा परतावा एवढा सुखदायक असतो की, अनेक वेळा संकटाच्या क्षणी नव्हे खर्चाच्या प्रसंगी ती तिच्या कष्टाचं, संयमाचं माप सांभाळून धरते. अगदी आपल्या घरात माप ओलांडून आल्याच्या क्षणापासून. आणि आपल्याला तारते.

तर असे पोटप्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर मूळ प्रश्नाचे उत्तर तर राहिलेच, 'खर्चास कारण की...' अर्थात त्याचे उत्तर 'मीच की' असेच आहे.
क्षमा करा. परत एकदा गैरसमज होण्याला वाव आहे. मी यात बायकोला काहीही म्हणत नाही आहे. 'मी' म्हणजे 'मी'च असे मी हे उपरोधाने, उपहासाने म्हणत नाही आहे.

पोळ्याच्या सणाला हातात पोवत बांधल्यानंतर आई मला पाठमोरा उभा करून, डोक्यावरून अक्षता टाकायची आणि विचारायची, "अतीत कोण?" आणि मला म्हणायला सांगायची, 'मीच की'. अर्थात अतीत म्हणजे सत्व, रज, तम या सगळ्या गुणत्रयींच्या पलीकडील अवस्था. अवधूत अवस्था. 'अतित कोण आहे?' तर 'मीच आहे'. अर्थात या धार्मिक रूढी, परंपरा आपल्यालाच आपणच ते 'परमतत्त्व' आहोत याची जाणीव करुन देत असतात. आणि त्यानुसार मग या सांसारीक जीवनातील बंधनात कार्य करावे, असा उद्देश असतो. असो.

तर असे लहानपणी अशी कधी तरी आलेली समज आणि लग्नानंतर लागलेली सवय 'मीच की' असा मंत्र ध्यास करावा लागेल, याची मुळीच कल्पना नव्हती!
पण सारेच पुरुष असे माहीत असताना या मोहजालात अडकतात. आणि घडलेल्या प्रत्येक घटनांना जवाबदार  'मीच की' असं म्हणत असतात. मी आपला त्या सगळ्यांचा मात्र एक प्रतिनिधी.

तर हे तर एव्हाना हे स्पष्ट झाले आहे की, 'खर्चास कारण मीच आहे'. पण क्षमा करा, मी आर्थिक खर्चाबाबत बोलत नाही आहे.
अहो! कोणत्या साहित्यीकाचे एवढे धाडस किंवा बुद्धी की, त्याने सुनियोजित अर्थार्जन करावं आणि खर्च करावा. साहित्यीकांचा आणि 'अर्था'चा अर्थाअर्थी संबंध नाही. नव्हे नसतोच. साहित्यीकांच्या जवळ 'अर्था'चे भांडवल नसतेच मुळी. त्यांच्याजवळ असतं ते केवळ शब्दांचे मुद्दल. जे ते खर्च करत असतात. अर्थात म्हणून मी ही शब्दांच्या खर्चा बाबतच बोलतो आहे!
बघा ना 'खर्चास कारण मीच आहे' आणि 'शब्द खर्च करतो आहे' हे सांगण्यासाठी मला आतापर्यंत किती खर्च करावा लागला शब्दांचा.

पण का कुणास ठाऊक या जगाच्या संसारात एवढी सुंदर सुंदर नाती आहेत आणि त्यांना बांधणार्‍या भावना आहेत, ज्यांनी हे जीवन सुंदर होतं. तृप्तता देणारं असतं. आणि नेमकं तेच साहित्यीकांच्या दृष्टीस पडतं आणि ते खर्च करतात तो शब्दांचा.

मुळात अशा सगळ्याच कलाकृती आधीच विद्यमान असतात. थोडीशी शब्दांची जुळवाजुळव झाली की, त्याला एक मूर्त रूप येतं. ज्याला साहित्यकृती म्हटल्या जातं.

संसारातील नाती ही सातत्याने उलगडत जाणारी नाती असतात. कधी दुःखाचे तर कधी सुखाचे अनुभव देणारी ही नाती असतात. म्हणूनच ही सुंदर नाती जोपर्यंत आहेत, तोपर्यंत साहित्यीकांचे शब्द आहेत. जे अशा प्रत्येक प्रसंगाला खर्ची पडत असतात. आणि तरीही ते कधीही संपून जात नाहीत, वाया जात नाहीत. कारण ते जगातील सगळ्या सुंदर नात्यांच्या 'अक्षय थाळी'तून निर्माण झालेले असतात, म्हणून.

एखाद्या साहित्यीकाने उद्योग थाटला असता आणि खर्च केला असता तर काय झाले असते? अर्थातच 'खर्च' शब्दाला समानार्थी 'कर्ज' शब्द जोडला गेला असता. पण साहित्यीकांच्या 'खर्चा'ला 'कर्ज' हा 'वर्ज्य' असतो. प्रसंगी त्यांचा खर्च होणारा शब्द कधीकधी 'खर्जा'तील असू शकतो. अर्थात तो ही आर्जवी असतो.

असं अर्थात शब्दांचं भांडार, मी मागणी घालत असताना बायकोसमोर मांडलं होतं. जी बापूडी त्यात अडकली.

त्यावेळेस माझ्या जवळ 'अर्थ' नाही, हे मी तिला पहिल्या भेटीतच सांगून टाकले होते. पण कदाचित खर्च होणाऱ्या शब्दांच्या अर्थाच्या प्रेमात ती पडली. आणि मूळ 'अर्था'चे तिला भानच राहिले नाही. आणि अडकली. तर अशी माझी एकंदरीत 'गुंतवणुकी'ची सुरुवात तेथूनच झाली.

कोण म्हणतं की, जगातल्या सुंदर साहित्यकृती ह्या लग्नाआधीच्या प्रियकर आणि प्रेयसीच्या निर्माण होणाऱ्या प्रेमातूनच निर्माण होत असतात म्हणून. अहो! लग्नानंतर बायकोला वेळेवर किराणा नाही आणून दिला तरी देखील सुंदर साहित्यकृती निर्माण होत असतात. अर्थात! हा माझा स्वानुभव आहे.

म्हणूनच 'बायको' ही केवळ माझ्या मुलांची जन्मदात्रीच नाही तर माझ्या खर्ची पडलेल्या अनेक शब्दांची देखील जन्मदात्री तीच आहे.

म्हणून लग्न झाल्यानंतर प्रेमाला किंवा साहित्यीकाला ओहोटी लागते, असे जे म्हंटले जाते ते साफ खोटे आहे. माझा अनुभव या बाबतीत पूर्णपणे उलटा आहे, जो माझ्या 'गुंतवणुकी'ने वेळोवेळी सिद्ध केला आहे. आता तर माझी छोटी मुलगी देखील म्हणते, 'बाबा! तू किती बोलतोस रे'. त्यावर तिला देखिली एखादी गोष्ट सांगावी लागते. शब्दांच्या जगात एक फेरफटका मारला की, तिच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद खूप समाधानकारक असतो. अशावेळी खर्ची पडलेल्या शब्दांमुळे तृप्तता लाभते. अर्थात खर्च मात्र वाढतच जातो. याला कारण अर्थातच मीच आहे.
असो तुर्तास थांबतो. 'गुंतवणूकी'ची काळजी घ्यायला हवी ना!


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...