लहानपणी कधीतरी एकदा काटा पायात रुतल्याचे आठवते. त्यानंतर मी स्वतः तो काटा काढायचा प्रयत्न केला. परंतु त्याचा एक छोटासा भाग पायातच राहिला. तो काही केल्या निघाला नाही. आणि नंतर नंतर त्या काट्याचे 'गुदगुद होणे' बरे ही वाटू लागले होते.
हा सगळा प्रसंग याकरिता आठवला की, झालेला त्रास, असलेलं दुःख कुरवाळले की कालांतराने बरे वाटायला लागते. ते दुःख समूळ नष्ट झाले तर कदाचित इतरांसमोर व्यक्त करण्याकरता काहीच शिल्लक राहणार नाही. दुःखाचे ही भांडवल करता येतं, हा खरंतर व्यावहारिक जीवनात पदार्पण केल्यानंतर लागलेला शोध. पण वास्तविक सत्य.
जे दुःख वाट्याला येते किंबहुना ज्या व्यक्तीमुळे येतं खरंतर ते प्रासंगीकच असतं. पण त्या व्यक्ती बाबतीत ते सदैव धरवून ठेवल्या जातं. त्या दुखाच्या प्रसंगानंतर किंवा आधी ती व्यक्ती नेहमीच चांगली वागत आलेली असते. परंतु ही गोष्ट अगदी सोईने विसरली जाते.
दुःखाचे प्रसंग सदैव छोटेसेच असतात. परंतु 'दुःख पर्वताएव्हढे' या उक्तीप्रमाणे त्याला सार्थ केले जाते. आणि 'सुख जवसाचा एव्हढे' असे नाही हे माहित असताना देखील त्यावर प्रयत्न केले जात नाहीत.
किंबहुना दुःख तेरा दिवसांच्या पलीकडे करायचे नाही, हे जणू परंपरेने आपल्याला आजवर शिकलेले आहेच. परंतु गेलेल्या व्यक्ती साठी ही गोष्ट तर लागू होते. आणि जिवंत व्यक्ती बद्दल मात्र मनात ठेवली जाते.
हे दुःख असे सातत्याने मनात राहण्याचे आणखी एक विशेष कारण आहे.'आपण दुःखाला मोकळी वाट करून देत नाहीत'.
ज्याच्यामुळे दुःख वाट्याला आलेले असते त्याच्याजवळच ते थेट मांडत नाहीत. तर ते दुःख इतरांजवळ मांडतो. 'आपणच कसे बरोबर आहोत आणि ती व्यक्ती कशी चुकीची आहे', असे दाखवून एक प्रकारे सहानुभूतीच आपल्याला मिळवायची असते.
खरेतर ती व्यक्ती चुकली आहे किंवा त्या प्रसंगात तसं वागण्याचा अन्य काही हेतू होता का? हे जाणून घेण्याचा प्रयत्नच होत नाही. आणि शिवाय अशाप्रकारे परत तशी चूक होऊ नये असे त्या व्यक्तीला कळणार तरी कसे?
म्हणून खरेतर अशाप्रकारे आपले दुःख ज्याच्यामुळे वाट्याला आले आहे, त्याच्याजवळच थेट मांडल्याने जेवढं मन हलकं होतं तेवढं ते इतरांसमोर कुरवाळल्याने वाढतचं जातं. आणि थेट त्या व्यक्तीजवळ ते दुःख मांडण्याचं धाडस होत नसेल तर अजूनही मार्ग शिल्लक आहेतच.
'त्या व्यक्तीला माफ करणे'. हा खूप मोठ्या मनाचा मार्ग आहे. अत्यंत अवघड मार्ग आहे.
परंतु यापेक्षाही एक सोपा मार्ग आहेच. झालेल्या प्रसंग आणि ती व्यक्ती या दोन्हींकडे दुर्लक्ष करणे. काही घडलेच नाही या आविर्भावात वावरणे.
'कुरवाळीन दुःखाला' पासून 'सांभाळीन आणि वाढविणं सुखाला' असे तरच म्हणता, करता येईल...
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९