Sunday, 29 November 2020

अलक


 भांडण

लग्नानंतर नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले. दोघांत कडाक्याचे भांडण झाले. दोघेही आपापल्या मतांवर ठाम होती. तशी ती रागारागात घर सोडून बाहेर पडली. त्यानेही तिला अडवले नाही.

थोड्या वेळानंतर मात्र तो अस्वस्थ झाला. पण स्वतःहून तिला फोन करण्याचे त्याला धाडस झाले नाही. नंतर जवळ जवळ सहा-सात तासानंतर ती घरी परतली. नि सोबत भलेमोठे सामान होते.

म्हणाली, "मला राग आला की, मी मन शांत होईपर्यंत मी शॉपिंग करण्यासाठी जात असते, आजही असेच केले."

त्यानंतर लग्नाला खुप वर्षे उलटली तरी दोघांत कधीही भांडण झाले नाही. अगदी एका अक्षराचे देखील...

एकता

'एकता', त्याने 'उत्स्फूर्त वक्तृत्व' स्पर्धेकरीता चिठ्ठी उचलली त्यावेळेस आलेला हा विषय.

मग पुढील तीन मिनिटांत त्याने 'एकसंघ भारताच्या एकतेतील विविधता मांडली...'

मुहूर्त

एकदा एका भक्ताने सद्गुरुंना प्रश्न विचारला, "एखादी चांगली गोष्ट सुरू करण्याचा मुहूर्त कसा पहावा?"

त्यावर ते सद्गुरू म्हणाले, "खरंतर मुहूर्त पाहून कार्य करणे, ही एक तांत्रिक बाब आहे. पण खरा मुहूर्त तोच ज्याक्षणी तुमच्या मनात ती चांगली गोष्ट करण्याची इच्छा निर्माण झाली..."

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९



Sunday, 1 November 2020

कुरवाळीन दुःखाला

लहानपणी कधीतरी एकदा काटा पायात रुतल्याचे आठवते. त्यानंतर मी स्वतः तो काटा काढायचा प्रयत्न केला. परंतु त्याचा एक छोटासा भाग पायातच राहिला. तो काही केल्या निघाला नाही. आणि नंतर नंतर त्या काट्याचे 'गुदगुद होणे' बरे ही वाटू लागले होते.

हा सगळा प्रसंग याकरिता आठवला की, झालेला त्रास, असलेलं दुःख कुरवाळले की कालांतराने बरे वाटायला लागते. ते दुःख समूळ नष्ट झाले तर कदाचित इतरांसमोर व्यक्त करण्याकरता काहीच शिल्लक राहणार नाही. दुःखाचे ही भांडवल करता येतं, हा खरंतर व्यावहारिक जीवनात पदार्पण केल्यानंतर लागलेला शोध. पण वास्तविक सत्य.

जे दुःख वाट्याला येते किंबहुना ज्या व्यक्तीमुळे येतं खरंतर ते प्रासंगीकच असतं. पण त्या व्यक्ती बाबतीत ते सदैव धरवून ठेवल्या जातं. त्या दुखाच्या प्रसंगानंतर किंवा आधी ती व्यक्ती नेहमीच चांगली वागत आलेली असते. परंतु ही गोष्ट अगदी सोईने विसरली जाते.

दुःखाचे प्रसंग सदैव छोटेसेच असतात. परंतु 'दुःख पर्वताएव्हढे' या उक्तीप्रमाणे त्याला सार्थ केले जाते. आणि 'सुख जवसाचा एव्हढे' असे नाही हे माहित असताना देखील त्यावर प्रयत्न केले जात नाहीत.

किंबहुना दुःख तेरा दिवसांच्या पलीकडे करायचे नाही, हे जणू परंपरेने आपल्याला आजवर शिकलेले आहेच. परंतु गेलेल्या व्यक्ती साठी ही गोष्ट तर लागू होते. आणि  जिवंत व्यक्ती बद्दल मात्र मनात ठेवली जाते.

हे दुःख असे सातत्याने मनात राहण्याचे आणखी एक विशेष कारण आहे.'आपण दुःखाला मोकळी वाट करून देत नाहीत'.

ज्याच्यामुळे दुःख वाट्याला आलेले असते त्याच्याजवळच ते थेट मांडत नाहीत. तर ते दुःख इतरांजवळ मांडतो. 'आपणच कसे बरोबर आहोत आणि ती व्यक्ती कशी चुकीची आहे', असे दाखवून एक प्रकारे सहानुभूतीच आपल्याला मिळवायची असते.

खरेतर ती व्यक्ती चुकली आहे किंवा त्या प्रसंगात तसं वागण्याचा अन्य काही हेतू होता का? हे जाणून घेण्याचा प्रयत्नच होत नाही. आणि शिवाय अशाप्रकारे परत तशी चूक होऊ नये असे त्या व्यक्तीला कळणार तरी कसे?

म्हणून खरेतर अशाप्रकारे आपले दुःख ज्याच्यामुळे वाट्याला आले आहे, त्याच्याजवळच थेट मांडल्याने जेवढं मन हलकं होतं तेवढं ते इतरांसमोर कुरवाळल्याने वाढतचं जातं. आणि थेट त्या व्यक्तीजवळ ते दुःख मांडण्याचं धाडस होत नसेल तर अजूनही मार्ग शिल्लक आहेतच.

'त्या व्यक्तीला माफ करणे'. हा खूप मोठ्या मनाचा मार्ग आहे. अत्यंत अवघड मार्ग आहे.

परंतु यापेक्षाही एक सोपा मार्ग आहेच. झालेल्या प्रसंग आणि ती व्यक्ती या दोन्हींकडे दुर्लक्ष करणे. काही घडलेच नाही या आविर्भावात वावरणे.

'कुरवाळीन दुःखाला' पासून 'सांभाळीन आणि वाढविणं सुखाला' असे तरच म्हणता, करता येईल...

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...