Friday, 14 December 2018

सोपं आणि चांगलं

सोपं आणि अवघड. चांगलं आणि वाईट.

या दोन्ही प्रकारच्या गोष्टींमधे काहीतरी एक निवड करण्याचे प्रसंग नेहमीच येत असतात.

सोपं  आणि अवघड यामधे सोपं निवडतो तर चांगलं आणि वाईट यामधे आपण चांगल्याची निवड करतो. नव्हे तसा सहज मानवी स्वभावही असतो.

परंतू सोपं आणि चांगलं या मधे निवड करायची झाली तर वाईट वाटतं की, काय हा अवघड प्रसंग ओढवला आहे.

तरीही स्वभावतः सोपंच निवडल्या जातं. चांगलं प्राधान्यक्रमावर तेंव्हाच येतं जेंव्हा सोपं अवघड वाटायला लागतं.

सोपं सोयीच असतं. परंतू सोपं चांगलं असतंच याची शाश्वती देता येत नाही. आणि चांगलं सोपं नसतं याची खात्री मात्र नक्की देता येते.

चांगल्याची सांगड अवघाडासोबातच आजवर झालेली आहे. कारण चांगलं चांगल्या गोष्टींना वाईटापासून सहजपणे दूर ठेवतं.

खरं तर चांग्ल्याला सोपं करणं ही एक अवघड कला आहे.

अन्यथा अवघड वाईटाच्या संगतीत राहणे हे नेहमीच सोपं वाटत आले आहे.

तात्पर्य सोपं चांगलं आणि अवघड वाईट वाटण्यापेक्षा चांगलं सोपं आणि वाईट अवघड वाटले पाहिजे.

असं झालं तर अवघडही सोपं वाटायला लागेल आणि वाईट कधीच चांगलं वाटणार नाही.

यावरही चांगलं वाईट वाटत असेल तर समजावं की आता सगळं सोपं अवघड झालं आहे.

आणि अगदी 'चांगलच वाईट वाटलं' असा प्रसंग ओढवला तर नक्की खात्री देता येते की, आता कोणतही अवघड सोपं होऊ शकतं.

 ©हेमंत विनोद पोहनेरकर


Sunday, 2 December 2018

पत्र





शेवटचं पत्र कधी लिहिलं?’, असं जर कोणाला विचारलं तर किमान पंधरा-वीस वर्षे झाली असतील, असे उत्तर मिळेल. कदाचित कोणाचंतरी पत्र आलं होतं, या गोष्टीलाही त्यापेक्षा अधिक कालावधी झालेला असेल.

आता पत्र खेळातही राहिलेलं नाही. मामाच पत्र हरवलं तेच आम्हाला सापडलं’, असं खेळणारी मुलं मोठी झाली आहेत. पत्रातील छोटसं आकाश शोधण्यासाठी जणू ती बाहेर पडली आहेत.

पूर्वी आठवण आली, आनंदाचा किंवा दुःखाचा प्रसंग घडला, साधा निरोपही जरी असला तरी पंधरा पैशांचं पोस्टकार्ड पाठवला जायचं. अगदीच दहा-पंधरा वाक्यात मांडलेल ते पत्र कितीदा तरी वाचलं तरी प्रत्येक वेळेला अधिकच आनंद देऊन जायचं.

प्रेमीयुगालांनी तर पत्राचा आधार सर्वाधिक घेतला. आता व्यक्त होण्याची साधनं बदलली आहेत. स्वरूप बदललं आहे. पण आजही कोणाला पत्र वाचायला मिळालं तर तोच आनंद होणार किंबहुना जुन्या आठवणी अधिक जिवंत होतील.

पत्र जीर्ण होऊ शकतं पण पत्रातील ओलावा कधीच आटत नाही.

‘पत्राची परंपरा परत सुरू होईल का?’, तर कदाचित उत्तर ‘नाही’ असं असेल. परंतु ‘कुणाचं पत्र आलं तर कसे वाटेल?’, याचे उत्तर मात्र स्वाभाविकच ‘आनंद होईल’ असेच असेल.

पत्र पाठवण्याचा एक लाभ मात्र सर्वांना नक्कीच झालेला आहे. आनंदाला भाषा असते, हे  पत्रामुळेच तर कळालं. आनंदला शब्दाचा आकार देता येतो. तो आनंद कधीही ही इच्छा झाली की पुन्हा अनुभवता येतो, हे पत्रामुळेच तर शक्य झालं.

अशा न संपणाऱ्या आनंदाचा नित्य स्त्रोत म्हणजे पत्र.
काळ कितीही पुढे सरकला तरी पत्र आपलं स्थान अबाधित ठेवून आहे. कारण व्यक्ती कालसापेक्ष असते. पण पत्रातून व्यक्त केलेली भावना कोणत्याही काळात आनंद देणारी राहिलेली आहे आणि राहील देखील.

©हेमंत विनोद पोहनेरकर 

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...