कुणा एका महान संतांचे वचन आहे, 'तीच व्यक्ती सर्वोत्तम जिच्या माघारी देखील तिच्याविषयी चांगलेच बोलले जाते'. गीतेतील 'उत्तम पुरुषा'ची लक्षणे सांगितली आहेत बहुदा त्याचे हे वचन म्हणजे अगदी प्रत्येक सांसारीकासाठीचे अगदी साध्या भाषेत मांडलेले सर्वोत्तम तत्त्वज्ञान आहे. पण मग विचार येतो, हे वचन संतांसाठी सामान्य असेल पण सामान्यांसाठी असे राहणे, वागणे जरा दुर्मिळच. तरीदेखील हे वचन सामान्य नागरिकांसाठी तर सांगितले गेले आहे.
'सज्जन' हा शब्द बऱ्यापैकी रुढ झालेला आहे. पण त्यामागे अशी पार्श्वभूमी असेल अशी कल्पना करण्यास मन तितकेसे तयार होत नाही. कारण एक तर 'दोष नाही' अशी व्यक्ती सापडणे अशक्य. आणि त्यातल्या त्यात 'दोषांवर चर्चा होणार नाही', ही अपेक्षा देखील चुकीची. अर्थात व्यक्तीच्या दोषांवर माघारी चर्चा होणे स्वाभाविकच.
परंतु इथे 'माघारी होणारी चर्चा' केवळ व्यक्तीच्या दोषांवर हा विषय अपेक्षित नाही. तर त्या व्यक्तीने जे नकळतपणे आपल्याला दिलेले दुःख असते त्यावर इतरांच्या समोर त्या 'व्यक्ती विषयी होणारी चर्चा' हे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे.
खरेतर मराठीत त्याकरिता अत्यंत सुंदर असा शब्द आहे - 'उखाल्या पाखाल्या'.
मनावर झालेले आघात अत्यंत क्लेशकारक असतातच. एक तर ते दिसत नाहीत आणि कदाचित याच कारणामुळे ते अशा पद्धतीने मांडले जातात व व्यक्त केले जातात, ज्यामुळे देखील होणारी हानी भरून निघणारी नसते.
पण परिणामांचा फारसा विचार न करता ही चर्चा करणे फार महत्त्वाचे आहे, असे वाटून ती सुरू राहते, ठेवली जाते. आणि नकळत दुःख अधिक वाढत जाते.
माघारी होणाऱ्या चर्चा मागे त्या व्यक्तीने आपल्याला दिलेला त्रास, हे दुःख मोठे असतेच. पण ते मनात अक्षरशः साठवून ठेवले जाते. ते सोडून दिले जात नाही. मोकळी वाट करून दिली जात नाही. आणि जेव्हा मोकळी वाट करून दिली जाते ती नेमकी दुसऱ्या इतर कोणत्यातरी व्यक्तीच्या समोर.
परंतु या ठिकाणी एक मेख आहे, ज्या व्यक्ती समोर आपण ते दुःख व्यक्त करत असतो. त्या व्यक्तीला तसा अनुभव, त्रास त्या त्रास देणाऱ्या व्यक्ती कडून झालेला असेलच असे नाही. अर्थात दुःखाचा प्रसंग, ती घटना व्यक्तीसापेक्ष असते. अर्थात त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव तसा असेलही असे ठामपणे सांगणे चुकीचे. परंतु ते केले जाते. आपल्या मनातील 'खदखद' इतरांसमोर मांडली जाते.
आणि कधी कधी ती तर अत्यंत रंगवून दाखविले जाते. या सगळ्या प्रकारात हा देखील उद्देश असतो की, आपल्याला स्वतःला देखील सहानुभूती मिळवायची असते.
पण दुःख इथे संपत नाही तर ते अधिक वाढत जाते. किंबहुना ते आपण स्वतःहून द्विगुणित करत असतो. आणि कदाचित ज्या व्यक्तीला आपण ते सगळे ऐकवले त्याच्या मनात देखील ते खूप खोलवर फसते.
खरेतर 'मोक्षप्राप्ती', 'स्वर्गप्राप्ती' ही मानवी जीवनाचे अंतिम ध्येये असतीलही. पण ती मृत्यूनंतरची. अर्थात ती मिळावी यासाठी सगळेच प्रयत्न करणार. पण ती मिळाली का नाही, हे कधीच कोणाला सांगता येत नाही. म्हणूनच जिवंतपणाचे ध्येय लक्षात घेणे महत्त्वाचे. आणि कदाचित ते असेल तर ते एक मात्र म्हणजे 'निर्भेळ आनंद'.
आणि हा असा 'निर्भेळ आनंद' मिळवायचा असेल. तर नात्यात गोडवा निर्माण करावा लागणार. तरच तो संपूर्ण जीवनात पसरेल. आणि मग स्वाभाविकच ज्याला हे प्रेमळ नातं निर्माण व्हावं असं वाटतं त्याला ते दुःख देखील विसरावे लागणार. तो कटू अनुभव सोडून द्यावा लागणार. त्याची इतरांच्या समोर केली जाणारी अर्थात माघारी होणारी चर्चा सोडावी लागणार.
परंतु सुखापेक्षा मनुष्याला दुःख कुरवाळायला अधिक अधिक आवडतं. आठवून पहा, एखाद्या छानशा विनोदावर आपण पहिल्यांदा अगदी खळखळून हसतो. पण दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा आपण त्यालाच 'रटाळवाणा' म्हणतो. पण हेच दुःखाच्या बाबतीत मात्र होत नाही!
म्हणून अशा प्रसंगात परत एकदा 'संत वचनच' कामाला येतं. समर्थांचे वचन आहे, 'मना बोलणे नीच सोशीत जावे'. किंवा शारदामातांनी देखील अगदी सोप्या शब्दात सांगून ठेवले आहे, 'प्रेमात सदैव नमतं घ्यावं म्हणजे नातं टिकतं.' अर्थात कोणत्याही नात्यात माघार घ्यावी पण माघारी चर्चा करू नये.
शिवाय अजून एक गोष्ट महत्त्वाची आपल्या मनातील दुःख मोकळे करायचे झाल्यास ते थेट त्याच व्यक्ती जवळ केले जीने आपल्याला त्रास दिला आहे, तर! बहुदा अशा वागण्याने आपल्या मनातील कटुता वाढणार नाही. आणि नेमकेपणाने त्या व्यक्तीलाही सुधारण्याची संधी दिल्यासारखे होईल...
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

No comments:
Post a Comment