Sunday, 17 March 2019

दहापट


एका मित्राच्या घरी नुकतेच लग्न पार पडले होते. लग्नात खर्च खूप झाला होता. परंतु परिस्थिती बेताचीच होती. त्याच्याशी सहज गप्पा झाल्या नंतर लक्षात आले की, सगळ्या कुटुंबाचा मिळून मासिक पगार वीस हजार आणि लग्नातील खर्च मात्र पाच लाखांपेक्षा अधिक झाला होता.
हा एक प्रसंग.
आणि आता दुसरा प्रसंग.
अशाच एका मित्राची भेट बऱ्याच दिवसानंतर झाली. जुन्या आठवणी गप्पाटप्पा झाल्या नंतर न राहुन त्याने त्याचं दुःख व्यक्त केलं. घरात कमावता तो एकटाच. बायको गृहिणी. आईला हाय डायबिटीजमुळे दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदूचे नुकतेच झालेले ऑपरेशन आणि वडिलांना किडनीच्या त्रासापायी सुरू झालेले विकली डायलिसिस. शिवाय मुलांच्या शाळा व शिक्षणाचा खर्च वेगळाच. तो म्हणाला, “पगारापेक्षा जास्तच खर्च होतो”.

वरील दोन्ही प्रसंग अंगावर शहारे आणणारे होते. दोन्ही मित्रांचे कष्ट अपार होते. आर्थिक नियोजनाला अर्थातच कुठेही संधी नव्हती. पण एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अपरिमित होती.
पण ही शक्ती आली कुठून? आणि मग या प्रश्नाचे उत्तर इतरत्र aअनेक प्रसंगांमधून शोधायला लागलो. आणि अशा आशयाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, असे दिसायला लागले. संकटे नाही अशी व्यक्ती अर्थातच नाही. परंतु संकटांमुळे पुरते संपून जाऊ असे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात आहे, असे लक्षात आले. विशेष म्हणजे अशा अवघड संकटांमधून तरून गेलेले प्रसंगी खूप आहेत हेही लक्षात आले.

पण मग याच रहस्य काय? ही उत्सुकता वाढली. आणि विचार करताना लक्षात आलं की, उत्तर प्रसंगांमधे नाही. संकटांमधे तर नाहीच नाही. तर उत्तर त्या त्या व्यक्तींमध्ये आहे.
अस्तित्व, स्वत्व पणाला लावणाऱ्या संकटे आल्यामुळे की काय, त्या त्या व्यक्तीने आपली अंतर्भूत शक्ती ‘दहापटी’ने उपयोगात आणली आणि संकट टळलं.
स्वतःतच अंतर्भूत असलेली गोष्ट किमान 'दहापट' अधिक प्रयत्नाने केली तर हा परिणाम होऊ शकतो हे लक्षात आलं.

आणि मग वाटलं 'दहापट'च का ?
तर एक जुना प्रसंग आठवला, आमचे काका म्हणायचे - कार्य यशस्वी करायचा असेल तर प्रयत्न किती करावा लागतो याचे उदाहरण पहायचं असेल तर दहावीचं मराठीचं पाठ्यपुस्तक पहावं. दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील एकूण प्रश्नांची गोळाबेरीज केली तर ती 1065 येते आणि परीक्षा त्यापैकी 100 गुणांची असते आणि त्यातही उत्तीर्ण होण्याची मर्यादा केवळ 35 गुणांची’.

खरंच आपण दहापट तर फार आधीपासून आपण आचरणात आणतो. पण तिची आठवण फक्त परीक्षेच्या काळात येते. म्हणून वरील दोन्ही प्रसंगांमधून मित्रांचा अभिमान वाटला. त्यांनी केलेल्या कष्टाचा अभिमान वाटला.

आणि पुढचा प्रश्न ही पडला की, ही दहापट आपण प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीत का आणत नाही? केवळ संकटातच का आणतो? खरंतर दहापट हे काही वज्रास्त्र नाही की महत्त्वाच्या संकटावर मात करण्यासाठी उपयोगात आणलं आणि संपलं. दहापट ही खरंतर एक अक्षय थाळी आहे. आपलं तर नित्य भागतेच शिवाय अचानक येणाऱ्या मोठ्या संकटांना पण सामावता येतं.
पण नित्याचे भागणे किंवा संकट टाळणे हे देखील फारच तांत्रिक होऊन जाते. एकच शक्ती जर जी व्यक्ती कडून महत्त्वाच्या क्षणांमधे व्यक्तीला तारुन नेत असेल तर ती नित्य का असू शकत नाही?
कदाचित हा आत्मविस्मृतीचा शाप तर नाही ना?
होय. आपण हनुमंताचे वंशज आहोत. समुद्र उल्लंघून जाऊ शकतो, हे सांगण्यासाठी कुणी एक जांबुवंत लागतोच आपल्याला.
किंवा यक्षाने धर्मराजाला विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर आपण एव्हाना विसरलो आहोत. यक्षाचा प्रश्न होता की, मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? त्यावर धर्मराज युधिष्ठिराचे उत्तर होते, “दक्षता”. अर्थात अखंड सावधानता. बहुदा ही अखंड सावधानता केवळ महाभारताच्या कथेतच राहिली. आणि प्रत्यक्षात आपण आपल्या जीवनात, आहे त्या वातावरणात आणि परिस्थितीत रममाण झालो.

म्हणून वाटतं दहापटीचा उपयोग काहीसा वेगळा करता का?
दुःखाच्या दिवसात प्रकट होते तिला सुखाच्या, आनंदाच्या दिवसात सादर करता येईल का? कारण दुःखाच्या दिवसात पावणारा भगवंत सुखाच्या दिवसात अधिक आनंदाने पावेल ना!
म्हणून मग आनंदाची दहापट. दहापट आनंद. जमेल ना! 
स्वप्न पूर्ण करण्यासाठी घ्यावयाच्या प्रयत्नांची दहापट. प्रिय व्यक्तीच्या सहवासाची दहापट. समजून सांगण्यापेक्षा समजूतदारपणाची दहापट. नातं टिकवण्यापेक्षा यशस्वीपणे निभावून नेण्याच्या प्रयत्नांची दहापट.
आणि अगदी शेवटी प्रेमात कोणत्याही नात्यातील ओलावा जपण्यासाठी, जिवंतपणा आणण्यासाठी वेळप्रसंगी आपलं खरं असतानाही समोरच्यासाठी माघार घेण्याची आपल्या मनाची दहापट तयारी.
कदाचित हे सारं झालं तर जीवन दहापट सुंदर होईल. हे निश्चितच.

©हे. वि. पोहनेरकर


No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...