‘जगावं की मरावं?’, असा नटसम्राट मधील आप्पा बेलवरकरांना प्रश्न पडला होता. परंतु त्यांच्यासमोर जीवनाविषयीच्या समस्याही तेवढ्याच गंभीर स्वरूपाच्या निर्माण झालेल्या होत्या.
तीच गत अर्जुनाची देखील. महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीलाच आपल्याच स्वकीयांच्या विरुद्ध लढायचं आहे त्यावेळेला ‘कर्तूम, अकर्तूम?’ हा प्रश्न अर्जुनाला देखील पडला होता.
परंतु सामान्य माणसाची मात्र परिस्थिती यापेक्षा खूप भिन्न असते. त्याला अगदीच जीवन मरणाचे प्रश्न निश्चितच निर्माण होत नाहीत. त्याचे प्रश्न अगदी रोजच्या धकाधकीच्या जीवनातले सामान्यच असतात. त्याच्या समस्या ही सर्वसाधारण असतात.
परंतु त्या समस्या समस्यांवर उपाय शोधण्याकरिता मात्र घेतला जाणारा निर्णयाचा कालावधी मात्र हा खूप अधिक असतो. किंवा तो कालावधी विचारात घेतला जात नाही.
खरंतर द्वीधा मन:स्थिती ही सामान्य माणसाची त्याच्या रोजच्या जीवनामधली खूप नियमित अशी अवस्था आहे.
कोणतीही छोट्यातली छोटी गोष्ट करत असताना, करावी का करू नये हा विचार करत असताना कितीतरी वेळ निघून जातो. आणि मग त्याच द्विधा मन:स्थितीमध्ये अनेक वेळ राहावं लागतं. परिणाम द्विधा मन:स्थितीमध्ये होणारी माणसाची एकंदरीत दुःखद अशी परिस्थिती.
म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा निर्णय घ्यायचा असतो. तेव्हा त्या निर्णयाचा कालावधी दोन मिनिटांपेक्षा जास्त असला तर त्रास होतो. दोन मिनिटाच्या आत ज्या ज्या वेळेला निर्णय घेतला जातो त्या त्या वेळेला आत्मविश्वास वाढतो.
खरंतर यामध्ये कुठल्याही प्रकारची घाई नाही. पण एक प्रकारचा ठामपणा आहे. दोन मिनिटांमध्ये मनामध्ये निर्माण होणारी जी आंदोलन आहेत, त्या आंदोलनांकडे पाहिलं तर लक्षात येतं की, आपण किती वेगाने ही निर्णय घेऊ शकतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे नेहमी असे म्हणायचे की, ‘मी आधी निर्णय घेतो आणि मग ते एक खरे करून दाखवतो’.
अर्थात जेव्हा निर्णय घेतला जात असेल त्यावेळेला त्याचा कालावधी दोन मिनिटांपेक्षा जास्त नक्कीच नसणार.
असंही म्हटलं जातं की, एखादा माणूस कसा आहे, हे पाहायचं झाल्यास त्याने त्याच्या आयुष्यात घेतलेले निर्णय पाहायचे.
अर्थातच मोठे निर्णय आपण कसे आहोत हे दर्शवतात. तर छोट्याछोट्या निर्णयांमधील तत्परता ही अचूकतेपर्यंत घेऊन जाणारी आहे, हे दिसतं.
खचित तत्परतेने निर्णय घेऊन पराजय आला तर एक प्रकारचे समाधान आपल्याला मिळत असते की, कमीत कमी मनस्थितीमध्ये निर्णय घेतला. कदाचित परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे त्या गोष्टींमध्ये यश मिळालं नाही.
परंतु निर्णय न घेतल्याची जी पश्चातापाची भावना असते, ती अधिक वाईट असते. किंवा निर्णय घ्यायलाच उशीर झाला तर त्यावेळेस हातातून गेलेला वेळ हा देखील कधीही न कमावता येणार नसतो.
खरंतर आजंच जग धावत आहे. आपण डिजिटल युगातले प्रतिनिधी आहोत. त्यामुळे प्रिसिजन, परफेक्शन, फास्ट अशा प्रकारचे निर्णय जर आपल्याला घ्यायचे असतील तर त्यांचा कालावधी दोन मिनिटांपेक्षा जास्त असू नये. आपल्यालाही या धावत्या युगासोबत बदलावे लागेलच ना…
©️हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
1 comment:
🙏खुपच छान खुप खुप धन्यवाद व अभिनंदन हेमंतजी
Post a Comment