Saturday, 2 March 2019

नवी पिढी


आमची पिढी 81 ची. आमच्या पिढीने किंवा आमच्या पिढीच्या दोन-तीन वर्ष आधी किंवा नंतरच्या पिढीने अनुभवलेलं जग हे वेगळं होतं. विशेष करून बालपणीचा काळ लपंडाव, डब्बा ऐसपैस, लिंगोरचा, विटी-दांडू,लोखंडी सळईची पावसाळ्यातली खूपसा खूपसी, कांदाफोडी, कुरघोडी अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील ज्या आठवल्या तरी देखील आता तेवढाच आनंद देऊन जातात.
अंगत-पंगत, सायकलवरची सहल, मित्राच्या घरी अभ्यासाला जाणे, आपली वही भरली म्हणून मित्राकडून जोडपान मागून घेणे असे अनेक अवर्णनीय आनंदाचे क्षण आमच्या पिढीने अनुभवलेले आहेत.

सायंकाळची प्रार्थना ते सुट्टीत सगळी भावंडे जमल्यानंतरची अंताक्षरी, आई-बाबांनी अभ्यासासाठी दाखवलेला धाक ते इतर सांगितलेली कामे या साऱ्या बालपणीच्या अनुभवांनी खरतर तारुण्य समृद्ध झालं आहे.

पण काळ कोणासाठी थांबत नाही. आमची पिढीही आता मोठी झाली आहे. प्रत्येकजण स्वतःच्या संसारिक जीवनात रममाण झाला आहे. ग्रामीण भागातून शहरी भागात गेलेली आमची पिढी ही डिजिटल युगाची सगळी आव्हाने झेलत आहे.

पण एक आव्हान बाकी सगळ्या आव्हानांपेक्षा वेगळे आहे. पूर्वी पिढी वीस पंचवीस वर्षात एकदा बदलायची. आताची पिढी आठ दहा वर्षातच बदलते आहे. म्हणून आमच्या पिढीने पाल्यांसोबत कसे वागायचे हे तर फार पुढे आहे. परंतु आमचे धाकटे भाऊ बहीण वा नातवंड यामधील सगळेजण ज्यांच्या वयात अंतर साधारण दहा ते बारा वर्षांपर्यंत असेल, त्यांचे जग आमच्या जगापेक्षा फार वेगळ आहे.

कदाचित आम्ही अनुभवलेल्या गोष्टी त्यांनीही काही प्रमाणात अनुभवल्या असतील परंतु तारुण्यातील त्यांचे संदर्भ आमच्या पेक्षा वेगळे आहेत. त्यांची भाषा वेगळी आहे. त्यांची रिती वेगळी आहे. त्यांचं एकंदरीतच अनुभवाचं जग वेगळ आहे.

आमच्या आधीच्या पिढीकडे एक छान अस्त्र होतं. आमचं काही चुकलं, जमलं नाही किंवा मागणं असेल तर आमच्या आधीची पिढी ही पटकन म्हणायची, “आमच्या काळी असं नव्हतं, मग तुम्हाला काय अडचण आहे?’ ही आणि अशा प्रकारची ठरलेली अनेक वाक्य कानी पडायची. आणि ऐकावही लागायचं.

त्याकाळी ते बरोबरही होतं. आम्हाला त्यांच्या बद्दल कोणतीही तक्रार नाही. उलट त्यांचा आदरच आहे की, त्यांच्यामुळे आम्ही इथवर पोहोचलो.

पण अशी वाक्य आता आम्हाला नव्या पिढीसमोर काढता येत नाहीत. क्वचित प्रसंगी प्रयत्न जरी केला, पिढीत फारसे अंतर नसले तरी आम्ही आउटडेटेड होऊन जातो. कदाचित संवादाचा दुरावाही निर्माण होऊ शकतो.

वर प्रसंगी खरी जबाबदारी आमच्या पिढीची आहे . तरीही खरे तर आम्हाला सामावून घेणारी ही नवी पिढी अधिक हुशार, कर्तबगार आणि प्रगल्भ आहे.

आमची पिढी जीवनमूल्य किंवा संस्कार यांचेही संदर्भ नव्या पिढीसमोर काढू शकत नाही कारण नवी पिढी या दोन्ही गोष्टींना जपते. केवळ त्यांचे प्रकटीकरणाचे प्रकार वेगळे आहेत, माध्यम वेगळे आहेत.

अगदी वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे, पूजाअर्चा करणे किंवा कोणत्याही धार्मिक विधी मध्ये एका पारंपरिक चौकटीत बसवून ते करणे, असे नवी पिढी करतही नसेल. पण आदर आणि सन्मान त्यांच्या कृतीत नित्य जपलेला आहे.

नव्या पिढीचे खेळाचे प्रकार आणि माध्यम किंवा अभ्यासाचे प्रकार आणि व्यवहाराची साधनं वेगळी असतील. परंतु यशाचे श्रेय वाडवडिलांच्या पाय ठेवतात, तेव्हा ‘संस्कार’ नावाचे शस्त्र कधीकाळी ऐकलेल्या आमच्या पिढीसमोर नवी पिढी ‘संस्कार नावाचं शास्त्र’च आधुनिक माध्यमातून आचरणात आणताना दिसते आणि एक नवा दृष्टीकोण प्रस्थापित करते.

म्हणून अशा प्रसंगांमध्ये केवळ आनंदच होत नाही तर अभिमान वाटतो नव्या पिढीच्या प्रगल्भतेचा. आणि म्हणून नव्या पिढीला केवळ आमचे वारसदार म्हणण्यापेक्षा आमच्या पिढीची ओळख करून देताना नव्या पिढीचा संदर्भ आमच्या परिचयात करून देणे यात आमची पिढी विकसित होण्यासारखे आहे, एवढेच.

                                                                    ©हेमंत विनोद पोहनेरकर

4 comments:

Unknown said...

VERY NICE HEMANT SIR G

Unknown said...

correct


Shrikrishna said...

खूप छान लेख आहे

Unknown said...

अगदी सरसकट मान्य आहे. खरंय अगदी. अपेक्षा धुळे

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...