'जन्मजात गलथानपणा' असा शब्दप्रयोग केला असता तर खचित खूप वाईट वाटले असते. म्हणून छानपैकी इंग्रजाळलेल्या आपल्या बुद्धिमत्तेला कुठलीही इजा पोहोचू नये म्हणून शिर्षक इंग्रजीत लिहिले आहे. खरंतर अशा प्रकारचे लिखाण किंवा आपलीच असलेली सामाजिक वस्तुस्थिती अन्य कुठल्या तरी प्रकारे वर्णन करूया, मांडूया अशा विचारात गेल्या अनेक दिवसात होतो. परंतु गेल्या आठवड्यात सलग एकानंतर एक असे जीव गमवावे लागलेले अपघात पाहिल्यानंतर मन विषण्ण झाले.
औरंगाबाद आणि पुणे असे दोन्ही शहरात चारपदरी मार्गावरून जाणार्या युवतीला व युवकाला चुकीच्या दिशेने (अर्थात ज्याला आपण 'रॉंग साईड' असे शुद्ध मराठीत म्हणतो) येणाऱ्यांनी अक्षरशः चिरडले.
आपल्या देशातही गंमतच आहे, शुद्धीत असलेले अधिक प्रमाणात जीव गमावतात. अपघातांमध्ये बहुदा त्यांनाच खरी धुंदी चढलेली असते, बेधुंद असतात, खरी शुद्ध हरपलेल्यांपेक्षा. वेगाने वाहन चालवणे, या गोष्टीला क्षणभर जरी बाजूला ठेवले, तरी चुकीच्या दिशेने अत्यंत कमी वेगात येणाऱ्यांना कधीही क्षमा करता येणार नाही. नव्हे एकंदरीत आपली मानसिकता बदलणे अथवा स्वीकारलेल्या तंत्रज्ञाना सोबत प्रगत होणे हे दिवास्वप्न प्रमाणे भासते.
एकंदरीतच आपण वाहतुकीचे सर्व नियम अगदी सामान्यतः देखील पाळत नाही. एव्हाना आपला संयमाचा कालावधी काही सेकंदाचा देखील राहिलेला नाही.
असेच एके दिवशी कार्यालयीन कामानिमित्त पुण्यात जाणे झाले. भल्या पहाटे उतरलो. क्याब बुक केली. पण शेअरिंगमध्ये करावी लागली. माझ्या शेजारी एक परदेशी पर्यटक बसला होता. गाडी थोडी पुढे गेली आणि अचानक ब्रेक चालकाने लावला. तर लक्षात येईल की, रस्त्यात मांजर मरून पडले होते. जे अंधारात दिसले नाही. त्यावर तो विदेशी पर्यटक म्हणाला, "ठाऊक आहे तुम्हाला, असे का घडले?" अर्थातच मांजर रस्त्यात मरुन पडलेल्याचे उत्तर शोधायचे झाले तर आपण शास्त्राचा आधार घेणार. आपल्याला अपशकून घडणार होता तो तिच्याच जिवावर बेतला, असेच काहीतरी. पुढे उत्तरादाखल तो विदेशी पर्यटक स्वतःच म्हणाला, "कारण तुम्ही भारतीय वाहतुकीचे नियम पाळत नाही."
मी आश्चर्याने केवळ पाहतच राहिलो. थोडासा रागही आला. लगेच उत्तर देऊन अस्मिता, अभिमान दर्शवण्याचा विचार होता. पण मुग गिळून गप्प बसलो. आणि लक्षात आले की, 'अनुकरणाचा आचरणात सिंहाचा वाटा आहे'. जो त्या मांजराच्या जीवावर बेतला होता. अत्यंत सूक्ष्म स्तरांवरचा हा विचार आहे. परंतु समाजात सगळीकडेच पाहिले तर लक्षात येते की, आबालवृद्ध अनुकरणातून बहुतांश प्रमाणात आचरण करत असतात.
मग कधीही लाल, हिरवा, पिवळा दिवा न पाहता रस्ता ओलांडणारे आपण. आपण रस्ता ओलांडताना येणाऱ्या वाहनांनाच तिकडे दिवा कोणताही लागलेला असो, त्या वाहनांनाच 'थांबा' असा हात दाखवून रस्ता ओलांडतो. तेव्हा परिणाम सर्वांवरच होणार. तसा बहुदा प्राण्यांवरही झालेला असेलच. अर्थात विदेशातही प्राण्यांच्या रस्त्यावरील मृत्यूचे प्रमाण असणार, पण बहुदा अत्यंत नगण्य.
एकदा असेच परदेशातील एक व्हिडिओ यूट्यूब वर पाहण्यात आला, ज्यात 'एक मांजर काही व्यक्तींच्या मागे दिवे लाल झाल्यानंतर झेब्रा क्रॉसिंग वरून चालत जाते'. अर्थात आपल्याला 'शिस्त' ही नेहमी विदेशी उदाहरणांमधूनच द्यावी लागते, तरच ती आपल्याला पटते.
खरंतर आपली बेशिस्त किंवा गलथानपणा असा चव्हाट्यावर मांडणे हा उद्देश नसून जाणिव होणे हा आहे. आणि शिवाय असे जीव गमवावा लागणारे अपघात काही केवळ आज घडलेले नाही आहेत. ते अनेक वर्षांपासून असेच घडत आहेत, अशा चुका अनेक वर्षांपासून होत आहे. आणि शिवाय हा गलथानपणा एकंदरीतच सर्वप्रकारच्या सार्वजनिक जीवनांत आपणांस पाहायला मिळतो. वाहतुकीचे गांभीर्य अधिक आहे, कारण येथे थेट जीव गमवावा लागतो, खचित कोणतीही चूक नसताना. तर अन्य सर्व प्रकारांत 'सभ्यते'चा अर्थात 'सार्वजनिक सभ्येते'चा भाग येतो. परंतु विपर्यास इतका भयंकर आहे की, एक भारतीय म्हणून आपण आपल्या वैयक्तिक जीवनात स्वतःसाठी सर्व काही व्यवस्थित करतो, पाळतो. परंतु तोच व्यवहार सार्वजनिक जीवनात आल्यानंतर 'मला काय त्याचे' प्रमाणे वागतो. किंवा आपण सातत्याने काहीतरी मिळवण्याच्या वेगात एकंदरीतच जीवनात धावत असतो. म्हणून जे बाळकडू मिळायला हवे ते हरवले आहे.
'जपानी लोकांच्या वीस उत्कृष्ट गोष्टी' असा युट्युबवर अत्यंत सुंदर व्हिडीओ उपलब्ध आहे. आत्ताच्या या विषयाच्या संदर्भात एक गोष्ट त्यात आहे. जपानी माणसे मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या तीन वर्षात केवळ आणि केवळ 'सभ्यता' शिकवतात. हात धुऊन जेवायला बसणे, आपल्या वस्तू स्वतःहून आपआपल्या जागेवर ठेवणे, थोरामोठ्यांच्या आज्ञेचे पालन करणे इत्यादी. म्हणजे ज्या तीन वर्षात आपण एक भारतीय म्हणून आपल्या पाल्याला एक कारकून किंवा कर्मचारी किंवा फारच झाले तर एक प्रगत इंग्रजी बोलणारा नागरिक बनण्याच्या दिशेने 'नर्सरी'मध्ये पाठवत असतो, त्याच ठिकाणी जपानी लोकांची मुले भविष्यातील समजूतदार आणि जबाबदार नागरिक बनत असतात.
खरंतर आपल्या जागृत होण्याची आवश्यकता आहे. 'संस्कारां'पासून सुरु झालेल्या या प्रवासाला कवटाळून न बसता 'जवाबदार नागरिक' बनण्यापर्यंत नेण्याची खरी आवश्यकता आहे...
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
1 comment:
काही गोष्टी सहजपणे घेणे कसे जीवावर बेतते हे जाणून देणारे लिखाण....
Post a Comment