‘हर हर गोदा
हर हर गंगे’,
असा आरतीच्या प्रारंभीस निवेदिकांनी मंत्रघोष केला, तो नाशिक येथील राम घाटावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू झालेल्या गोदामाईच्या आरतीच्या वेळी. गोदावरीस दक्षिणगंगा म्हणतात हे जरी सत्य असले तरी गोदावरी ही भारतातील प्राचीन नद्यांपैकी एक आहे. शिवाय गोदावरीचे स्थान हे नित्य स्नानाच्या वेळी ज्या सात नद्यांचा श्लोक म्हटला जातो त्या मध्ये समाविष्ट आहे. अर्थात गंगाप्रमाणे तिची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे, महती आहे.
‘गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती…’ हा श्लोक स्नानाच्या वेळी म्हणत असताना स्नानाच्या पाण्यात प्रत्यक्ष गोदावरी आणि अन्य नद्या आहेत हा भाव समस्त भारतीयांच्या मनामध्ये असतो. अशी गोदावरी अतिप्राचीन आहे.
गोदामाईच्या आरतीच्या सुरुवातीस गोदामाईचा संपूर्ण इतिहास मांडला जातो. ज्यात गौतमऋषींच्या मार्फत नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीचा उगम झाला.
इथ पासून ते प्रभू रामचंद्रांचा सहवास, सातवाहन राजांच्या काळातील संपन्न राज्य, शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांची
धर्मसेवा ते अगदी अलीकडच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म ते बालपण देखील गोदामाईच्या काठावरीलच होय.
पूढे समंत्र गोदामाईची आरती होते. खरेतर अशी आरती ही काही काशीवरून नाशिकपर्यंत आलेली आहे, असे वाटू शकते. परंतु कृष्णाकाठी राहणाऱ्या भक्तजणांना ठाऊक आहे, केवळ कृष्णेची आरतीच नाही तर कृष्णामाईचा स्वतंत्र उत्सवही होत असतो. अशी महाराष्ट्राची समृद्ध पारंपरिकता आहे.
गोदामाईची आरती सुरू झाली आहे हे ऐकले होते, परंतु पहिल्यांदाच आरती पाहायला जाताना आरती देखील करायला मिळेल याची कल्पना केली नव्हती.
ती संधी मिळाली आमच्या भाऊजींमुळे.
पितृपक्षातील दिवस होते. क्षणभर विचार आला ‘प्रभू रामचंद्र यांनी वडिलांच्या अस्थि विसर्जन करून त्यांच्या मोक्षाची कामना केली. तशीच आपणही आपल्या समस्त पितरांच्या मोक्षांचा संकल्प करावा.’
या विचारांनी भारावून गेलो. कदाचित असा विचार स्वतंत्रपणे कधी मनात आलाच नाही. तो संकल्प बाहेर पडण्यास देखील तीर्थक्षेत्रच असावे लागते. आणि तो ही गोदामाईच्या तीरावरील एक दैवी योग होता.
मी हा संकल्प सोडून भाव विभोर होऊन गोदामाईची आरती करत होतो. परंतु माझा हा विचार किती स्वार्थी आहे, हे पुढील काही क्षणात कळाले.
मी याकरिता आयोजकांचा जीवनभराचा ऋणी आहे.
माझ्या मनातील संकल्प सोडून झाला होता. तसा आयोजकांनी निवेदन करताना गोदामाईकडे प्रार्थनाकेली ‘समस्त हिंदू बांधवांच्या पूर्वजांचा उद्धार होवो. आणि गोदामाईची सेवा करत वर्तमानातील तसेच भविष्यातील हिंदू बांधवांना सुख, शांती आणि समृद्धी मिळो.’
मी क्षणभर खजील झालो.
नि पुढील काही क्षणातच जाणीव झाली की, खरंच प्रदीर्घ काळ चाललेल्या यावनी आक्रमणाच्या काळात आपला धर्म टिकवून ठेवत बलिदान करणाऱ्या हिंदू बांधवांची कृतज्ञता व्यक्त करायची राहिली होती. ती गोदामाईच्या आरतीच्या निमित्ताने पूर्ण झाली.
आणि हो एवढ्यावरच थांबून चालणार नाही हेही कळून चुकले. आणि पुढील संकल्प देखील गोदामाईच्या साक्षीने केला. ‘आता इथून पुढे आपल्या पूर्वजांचा वारसा चालवत भावी काळातील हिंदू बांधवांपर्यंत ही परंपरा, वारसा, समृद्ध इतिहास नेण्याची जबाबदारी आपलीच आहे. ती पूर्ण करण्याची शक्ती दे. बुद्धी दे.’
‘हर हर गोदा
हर हर गंगे…’
©️हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
No comments:
Post a Comment