Sunday, 19 September 2021

यशस्वी पुरुषामागे स्त्री नसते

 

'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते'. हे विधान कोण्या एका महान विचारवंताने सांगून ठेवले आहे. जे आपण सर्वांनी केवळ स्वीकारलेच नाही तर त्याची उदाहरणे देखील आपण सांगत, ऐकत असतो. पण अगदी सुरुवातीलाच त्या महान विचारवंताची आणि त्याच्या विधानाचा दाखला घेत उदाहरण सांगणाऱ्यांची मी जाहीर क्षमा मागू इच्छितो.
कारण माझ्या दृष्टीकोनातून नव्हे तर वास्तविकतेच्या दृष्टीकोनातून या विधाना इतके धादांत असत्य विधान यशस्वी पुरुषांबाबत किंवा स्त्रीच्या बाबतीत अन्य कुठलीही नाही.

एक तर त्या महान विचारवंतांला अर्धांगिनी चे महत्व पटले नसेल किंवा प्रत्येक पुरुषाच्या यशस्वीता या दोन्हींची व्याख्याच उमगली नसेल. शिवाय निश्चितच असे विधान कोणत्याही संन्याशाच्या तोंडूनही निघणार नाही. कारण त्या सर्वांनी सर्वज्ञान झाल्यावरच सर्वसंग परित्याग केलेला असतो.

खरंतर 'यशस्वी जीवन' ही भारतीय संकल्पनाच नाही. एक तर ती पाश्चात्य संकल्पना आहे किंवा ती केवळ भौतिक पातळीवरील संकल्पना आहे.
भारतीय तत्वज्ञान 'आनंदी जीवनाचे तत्वज्ञान' आहे. जगातील पहिल्या ग्रंथात अर्थात वेदांमध्ये समग्र मानवी जीवनाच्या आनंदाचा विचार करणारे 'आनंद मिमांसा' हे स्वतंत्र प्रकरण आहे. त्यासंबंधीच्या अनेक ऋचा आहेत.

परंतु आता 'यशस्वी जीवना'ची संकल्पना मांडलीच आहे तर तिचा उपसंहार ही त्याच मार्गाने करावा लागेल. म्हणून हा लेखप्रपंच.

तर वरील संपूर्ण विधानच चूक आहे. शिवाय 'प्रत्येक यशस्वी पुरुष' असा शब्दप्रयोग करत असताना 'यशस्वीता' ही केवळ लौकिक अर्थाने मान्य केलेली आहे. आर्थिक सुबत्ता, मोठी पदवी, मोठा हुद्दा, मोठा व्यवसाय, प्रतिकूल परिस्थितीवर शारीरिक, मानसिक, आर्थिक सामाजिक इत्यादी प्रकारे केलेली मात, असे एकंदरीतच नावारूपाला आलेले कर्तृत्व, असा 'यशस्वीते'चा अर्थ निघतो.

मग अशा कर्तुत्ववान पुरुषाचा संसार सांभाळत, त्याला दाही दिशांना निश्चिंतपणे वावरू देणारी, त्याच्या महत्त्वाकांक्षेला, कष्टाला बळ देणारी त्याची सुविद्य पत्नी असते, असे विधान वरील विधानाच्या उत्तरार्धात जोडलेले आहे. जे देखील पूर्णपणे चुकीचे आहे.

ते याकरिता की, पुरुषाचे लौकिक कर्तृत्व मान्य करायचे आणि तिच्या अलौकिक कष्टाला आणि त्यागाला केवळ पाठीशी घालायचे. कारण काय तर ती एक कर्तव्यदक्ष गृहिणी असते, म्हणून.

वस्तुस्थितीत 'प्रत्येक पुरुषच यशस्वी पुरुष असतो'.
आनंद जसा वस्तूंवर अवलंबून नसतो. अगदी तसेच यशस्विता देखील लौकिकतेवर आधारित नसते.
म्हणूनच झोपडपट्टीत राहून संसार करणाऱ्या पुरुषापासून ते राजवाड्यात राहणाऱ्या पुरुषांपर्यंत सर्वच यशस्वी पुरुष आहेत. त्या प्रत्येक पुरुषांनी त्यांच्या जीवनातील त्यांची नोकरी, त्यांचा व्यवसाय, उद्योग इत्यादी करत असताना ते अपार कष्टाने आणि जिद्दीने पार पाडलेले असतात.

या सगळ्याच पुरुषांना प्रसंगानुसार सर्व प्रकारच्या संकटातूनही जावे लागलेले आहे. व्यापक स्तरावर विचार करत असताना, अनेक वेळा आर्थिक क्षमता नसताना देखील सांसारीक व व्यावहारिक जीवनातील कार्य पूर्ण केलेले पहायला मिळते.
मग अशा प्रकारे संकटांवर मात करणारा पुरुष एकटा कसा असेल? किंवा केवळ त्या पुरुषाच्या पाठीशी राहुन एका स्त्री मूळे तो यशस्वी कसा होऊ शकेल?
तर अर्थातच अशा प्रत्येक यशस्वी पुरुषासोबत, त्याच्या खांद्याला खांदा लावून, त्याच्या पाऊलाला पाऊल जोडत त्याची 'सोबत करणारी एक स्त्री' असते.

कपाळावरचं कुंकू पुरुषाच्या नावाचं, गळ्यातील मंगळसूत्र पुरुषाचं, मुलांच्या शाळेतील दाखल्यापासून ते घराच्या कागदपत्रांवर सगळ्या ठिकाणी नाव
पुरुषाचं, अर्थात त्याचं कर्तृत्व असलं किंवा यश असं असलं तरी देखील अगदी एका पाऊलानी देखील स्त्री ही पुरुषापेक्षा मागे नसते. नव्हे त्याच्या पाठीशी राहून
तिला 'श्रेयस' ही व्हायचे नाही आहे.

प्रसंगी संकटकाळी ती अनेकवेळा पुरुषाच्या पूढे असते. नव्हे तशी तिने सप्तपदीच्या चौथ्या फेरीनंतर प्रतिज्ञा घेतलेली असते. ज्याचे ती पालन करत असते, केवळ 'प्रेयस' राहून.
ती कधी गृहिणी असते तर कधी नोकरी व्यवसाय करणारी व्यवसायीकदेखील असते. नोकरी आणि व्यवसाय करत असताना, मुलाबाळांना पासून सासु-सासर्‍यां पर्यंत सगळ्यांसाठी राबत असताना, ती कधीही स्वतःचे कष्टाचे पाढे वाचत नाही किंवा कारणं पण सांगत नाही.

आणि कधी कधी तर पुरुषाच्या अकाली निधनानंतर स्त्रीनेच पुरुषाचा संसार यशस्वीपणे सांभाळलेला पाहायला मिळतो. आणि वरती आपण तिचा तो 'पुरुषार्थ'असे संबोधतो, तिला श्रेय देतो.

कदाचित म्हणूनच तिला शक्ती आणि अर्धांगिनी म्हणत असावेत. जी केवळ आनंदाच्या क्षणातच नाही तर संकटाच्या दिवसातही त्याच्या सह संकटाचा सामना करते आणि संकटांवर मात करते. याच गोष्टीची जाणीव प्रत्यक्ष अर्धनारीनटेश्वराला असावी म्हणून त्यांने हे त्याचं धारण केलेलं रूप जगासमोर ठेवलं असावं. पण आपण नेमकी त्याची पूजा करुन त्याचे आचरण करायचे विसरून गेलो आहोत.

अजून एक विशेष करून सगळ्या भारतीय पुरुषांच्या बाबतीत असलेले एक त्रिकालाबाधित सत्य आहे. ( होय. केवळ भारतीय पुरुषांच्या बाबतीत, कारण पाश्चात्य जगात एकाच स्त्री किंवा पुरुषाबरोबर जीवनभराच्या संसाराची संकल्पनाच नाही).
'सगळ्या पुरुषांचा संसार हा सुखाचा आणि आनंदाचा किंवा यशस्वी झाला आहे, त्याला एकमेव कारण ही स्त्री आहे.'
आणि असं कर्तृत्व असणाऱ्या सर्व स्त्रियांच्या तोंडून एक सामान विधान ऐकयला येत असतं, ते म्हणजे, 'माझा नवरा आहे लाखात एक आहे.'
अर्थात परत सगळी यशस्वीता ती पुरुषाला देते आणि स्वतः नामनिराळी राहाते.

म्हणूनच 'प्रत्येक पुरुष यशस्वी पुरुष
असतो आणि त्याच्यासोबत (मागे नाही) एक यशस्वी स्त्री असते.'

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

4 comments:

Unknown said...

भरतासारखी संस्कृती व कुटुंब संस्था जगात मिळणार नाही .धन्य ते ऋषी मुनी ज्यांनी ही संस्कृती व परंपरा आपल्याला दिली . आपले विचार मांडणी छान

संजीव देशपांडे said...

छान

Unknown said...

छान

गिरीश प्रभाकर जोशी said...

खूप सुंदर, आदिशक्तीला नमन

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...