श्री नरहर कुरुंदकर यांचे एक प्रसिद्ध विधान आहे, 'एखाद्या व्यक्ती विषयी मनात आदर असणे आणि त्या व्यक्तींची मते निदान प्रमुख मते अजिबात मान्य नसणे, या दोन गोष्टी एकत्र संभवतात. हेच आपण विसरून गेलो आहोत.'
या विधानाचा दाखला साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देण्याचे कारण असे की, एवढा मोठा समारंभ होणार आहे, असे म्हटल्यानंतर साहित्य संमेलनामध्ये काही न पटणार्या गोष्टीची घडणारच. आणि त्या आपण मोठ्या मनाने स्वीकारल्या पाहिजे. परंतु सोबतच ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या आहेत त्या दाखवून देणे ही देखील प्रत्येक साहित्यिकाची वाचकाची प्रमुख जबाबदारी असते.
मुळात नाशिक येथील साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात अडकले ते प्रामुख्याने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना डावल्याने. एकीकडे कुसुमाग्रज यांची जन्मभूमी म्हणून प्रत्यक्ष साहित्य संमेलननगरीला 'कुसुमाग्रज नगरी' असे नाव दिले जाते. तर दुसरीकडे प्रत्यक्ष साहित्यसंमेलनाच्या गीतांमध्ये सावरकरांचा उल्लेख देखील नसतो. आणि 'स्वातंत्र्य सूर्य' याचा अर्थ तुम्ही सर्वजण समजून घ्या, अशा पद्धतीने तो विषय मांडला जातो. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष सर्व वाचक वर्ग, नागरीक या विरुद्ध बंड करुन उठला त्या वेळेला मात्र नाईलाजास्तव कुठेतरी सावरकरांचं नाव परत या संमेलनाच्या गीतांमध्ये घेतले. ही खरंच खूप साहित्याच्या दृष्टिकोनातून वाईट अशी बाब आहे. सावरकरांचे हिंदुत्व न आवडणं, न झेपणं, न स्वीकारणं हा भाग एकीकडे ठेवून एक साहित्यिक म्हणून सावरकरांना स्वीकारणं हे खरंतर नाशिककरांच्या आणि तथाकथित राजकारण्यांनी ज्यांनी संमेलनामध्ये अधिक सहभाग घेतला त्यांना स्वतःच्या मनाचा उदारपणा दाखवण्याची ही खरं तर फार मोठी संधी होती. परंतु मुख्य प्रवेशद्वाराला आणि गीतांमध्ये त्यांचं नाव न घेता तो स्वतःचा रेटा पुढे ढकलणे यातच त्यांना धन्यता वाटली.
पण नाईलाजास्तव की काय म्हणून कवी कट्ट्याला स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांचे नाव दिलं. आणि त्यांनी शेवटी एका पद्धतीने सावरकर प्रेमींची बोळवण केली. खरे तर शिकागोची धर्म परिषदेमध्ये स्वतःचे भाषण मांडण्यासाठी विवेकानंदांना जेव्हा पत्राची गरज होती, त्यावेळेस प्राध्यापक राईट यांनी विवेकानंदांना उद्देशून म्हणाले होते की, 'तुम्हाला संमेलनात भाषण करण्यासाठी पत्र देणे म्हणजे प्रत्यक्ष सूर्याला प्रकाशन्यासाठी परवानगी देण्यासारखे आहे.' तसेच सावरकरांचे देखील आहे.
सावरकरां चे नाव प्रवेशद्वाराला असो किंवा त्यांच्या संमेलनाच्या गीतातील त्यांचा उल्लेख असो अथवा नसो यामुळे सावरकरांच्या एकंदरीतच प्रतिमेला, त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीला कुठेही तडा बसत नाही. उलट बहुदा मराठी साहित्यामध्ये सावरकर हे असे व्यक्तिमत्त्व आहे की, ज्यांच्या स्वतःच्या नावाने साहित्य संमेलन होतात. त्यामुळे अशा अलौकिक व्यक्तिमत्त्वाला डावलणे म्हणजे खरं तर स्वतःच्या बौद्धिक पातळी चा देखावा मांडण्यासारखे आहे.
तसे पाहता भुजबळांनी आणि पवार साहेबांनी सावरकर यांचा उल्लेख स्वतःच्या भाषणामध्ये केला, ही देखील उल्लेखनीय बाब आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवादच.
दुसरा मुद्दा म्हणजे संमेलनामध्ये अनेक साहित्यिक स्वतःला 'सारस्वत' म्हणून मोठ्या आनंदाने संबोधून घेत होते, एकमेकाला संबोधत होते. परंतु 'वदतो व्याघ्यात' या उक्तीप्रमाणे अगदी संमेलनाच्या सुरुवातीलाच सरस्वतीपूजन नाकारून त्यांनी परत एकदा स्वतःची बौद्धिक पातळी दाखवलेली आहे.
मराठी साहित्य संमेलनामध्ये जावेद अख्तर यांच्या सारख्या थोर गीतकाराला बोलावणे यामध्ये आक्षेपार्ह गोष्ट अशी मला तरी कोणतीही जाणवलेली नाही. त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे, या त्यांच्या विधानाला पुरताच जर विचार केला तर निश्चितच तो राष्ट्रद्रोह आहे. याबद्दल शंका नाही. त्याकरता त्यांनी पाकिस्तान सारख्या देशांमध्ये निश्चितच जाऊन राहू वास्तव्य करायला हवं.
परंतु एक साहित्यिक म्हणून, गीतकार म्हणून त्यांची उंची आणि त्यांचे कौतुकच आहे. त्यांनी संमेलनामध्ये एक अत्यंत सुंदर असा मुद्दा मांडला. आणि तो मुद्दा म्हणजे 'मराठी ही जगातील एकमेव अशी भाषा आहे की, ज्या भाषेमध्ये आठशे वर्षांपूर्वी एक कवयित्री होऊन गेली. आणि तिचे नाव मुक्ताबाई'. पुढे त्यांनी उल्लेख केला की, 'याच कालावधीमध्ये जगभरात साहित्य लिहिल्या जात होते आणि खूप मोठी वैचारिक आणि वैज्ञानिक अशी प्रगती होत होती, त्या वेळेला जगातील महिलांना स्वतःचे साहित्य प्रकाशित करायचे असेल तर ते पुरुषांच्या नावाने करावे लागायचे. अर्थात मराठी भाषा ही किती समृद्ध होती आणि मराठी समाज हा स्त्री-पुरुष या दोघांनाही समान लेखणारा असा होता' असा मराठीचा गौरव जावेद अख्तर यांनी केला, जो कौतुकास्पद आहे.
संमेलनाध्यक्ष नारळीकरांनी मराठी साहित्यामध्ये वैज्ञानिक साहित्य हे तुलनेने अत्यल्प आहे आणि ती मराठी भाषेची कमतरता, उणीव आहे, असं त्यांनी नमूद केलं. वास्तवाला नाकारता तर निश्चित येणार नाही. पण असं साहित्य का नाही, याचं कारण मात्र त्यांनी सांगितले नाही. किंवा त्यांनी त्या कारणाचा विचारही केला नाही.
सुमारे आठशे-नऊशे वर्ष सातत्याने होणाऱ्या आक्रमणामध्ये भारतीय समाज पूर्णपणे अडकलेला होता. स्वतःचं अस्तित्व टिकवणे हा प्रत्येकाचा एकमेव उद्योग होता. मग या सगळ्या कालावधीमध्ये विज्ञानाची प्रगती कशी होणार? जिथे तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकणार का नाही हे माहीत नाही, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या विज्ञानाचं प्रदर्शन कसं करणार? आणि जिथे प्रदर्शनच होणार नाही तिथे त्याची प्रात्यक्षिक कसे होणार आणि मग तिथे विज्ञान साहित्याच्या माध्यमातून येणार तरी कसं? नारळीकरांची विद्वत्ता प्रचंड आहे. परंतु साहित्यिक म्हणून वैज्ञानिक म्हणून काही गोष्टी लोकांच्या समोर मांडत असताना त्या का नाही झाल्या हे देखील मांडणे ही त्यांची जबाबदारी होती, असे मी अत्यंत आदराने आणि नम्रपणे सांगू इच्छितो.
उर्वरित संमेलनातील सर्वच कवी कट्टा, गझल कट्टा, सर्व संवाद, परिसंवाद देखील चांगल्या पद्धतीने झाले. श्री गिरीश कुबेर यांच्या तोंडावर शाई फेकून त्यांना विरोध करणे ही मात्र खरंच वाईट अशी घटना साहित्य संमेलनात घडली. विरोध साहित्यिक मार्गाने व्हायला हवा होता. असो.
संमेलनामध्ये एक अत्यंत सुंदर असे दालन होते. प्रामुख्याने मराठी भाषेची एक खूप छान प्रकाप्रकारे मांडणी केली गेलेली होती. ज्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी बहुदा आयोजकांनी, महाराष्ट्र सरकारने कोणी ते नेमकं ठाऊक नाही परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता हा उपक्रम केला होता.
२००४ पासून चे भारत सरकारने प्रत्येक भाषेला अभिजात दर्जा देऊ केलेला आहे. त्यासाठी मराठी भाषेविषयीची सर्व प्रकारची मांडणी एका पंधरा ते वीस मिनिटांच्या व्हिडीओ क्लिप मध्ये सादर केली होती. ज्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामधील मुद्देसूद मांडणी ही सर्व रसिक, प्रेक्षक, वाचक आणि साहित्यिकां समोर करण्यात आली होती. मराठी भाषेला दोन हजार दोनशे पन्नास वर्षांचा इतिहास आहे, आणि त्यामधील साहित्यिकांचा उल्लेख आहे, ही मांडणी पाहून खूप अभिमान वाटला. आणि अशा प्रकारची मांडणी 'शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे...' या छोट्याशा पंधरा पंधरा वीस मिनिटांच्या नाटकाच्या माध्यमातून आयोजकांनी केली होती. ही खरंच खूप कौतुकास्पद, आनंदाची आणि अभिमानाची अशी बाब आहे.
एकंदरीतच एक लेखक या नात्याने मराठी साहित्य संमेलनामध्ये काय अनुभवलं ते नि:पक्षपातीपणे मांडावं याच उद्देशाने हा लेख प्रपंच.
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
10 comments:
कृपया आपल्या प्रतिक्रिया आपल्या नावासह अवश्य नोंदवणे.
well said
साहित्य संमेलनात सावरकर नामक सूर्यप्रकाश येऊ न देण्याचे प्रयत्न केले त्यामुळे पूर्ण संमेलन अज्ञान रूपी अंधारात लुप्त झाले.
एकूण संपूर्ण साहित्य सम्मेलन अगदी मोजक्या शब्दात सविस्तर पणे मांडले. यामुळे आमच्या माहितीमध्ये भर पडली. खुप खुप मनापासुन आभार, असच आम्हांला अवगत करतं राहा. 🙏
अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्वाच्या मुद्यांना सहजपणे उलगडून नेमकेपणाने मांडणी केली आणि धन्यवाद यासाठी की संमेलनामध्ये न जाता संमेलनाचा थोडक्यात आढावा कळला
खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻🙏🏻
खरे आहे...
खूप खूप धन्यवाद, मनोजराव
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद, प्रतिभाताई
🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्तम लेख.
Post a Comment